Wednesday, December 31, 2008

नवे वर्ष

आणखी एक वर्ष सरले.तसे, काही तास अजून शिल्लक आहेत. माणसाने कालगणनेसाठी निर्मिलेली एक अदृश्‍य रेषा कालपटलाच्या अथांग, अनंत छाताडावर आखली जाणार आहे.ती रेषा दिसणारी नसली तरी सर्वांना कळणारी आहे. त्यापलीकडे दुसऱ्या संवत्सराची पहाट उगवणार आहे.त्याची पावले नंतर येणाऱ्या दिवसागणिक आकार वाढवीत अवकाश व्यापत जातील, वामनाच्या पावलांसारखी; येणाऱ्या संवत्सराच्या मर्यादेच्या दुसऱ्या अदृश्‍य रेषेपर्यंत. त्यानंतर पुन्हा तसेच .. एक संध्याकाळ आणि त्यानंतर एक पहाट ... मध्ये एक विभाजक अदृश्‍य रेषा. ते वर्ष या वर्षापासून वेगळे करणारी. काळाची पावले अव्याहत पुढे पुढे पडतच राहणार आहेत. कुठवर ? अनाकलनीय आहे. कुणाला आजवर सांगता आलेले नाही, पुढे कुणी सांगू शकणार नाही.अव्याहत चालणाऱ्या काळाबरोबर जीवनही चालत राहणार आहे.मध्ये किती आयुष्ये उगवतील, खपतील; चालतील, थांबतील ! काळाच्या चालीला आणि जगण्याला अंत नसेलच. त्याचे गणित मांडणे मानवी मेंदूच्या आवाक्‍यापलीकडचे आहे. आकलनात येते, ते सुटे सुटे आयुष्य; आणि अशा अनेक आयुष्यांची भेंडोळी. तीही सगळीच्या सगळी नाहीच कळत. आपले आयुष्य तरी आपल्याला कुठे नीट कळते, आकळते? काही तुकडे तेवढेच नजरेच्या आणि बुद्धीच्या आवाक्‍यात येतात.तेही कधी एवढे स्वतंत्र निघतात, की त्यांचेही पूर्णांशाने आकलन होत नाही. तरी आयुष्य आणि जीवन कळले, अशा थाटात आपण वागत असतो.काळाच्या प्रवाहात काही पावले पुढे टाकत जातो. तेवढे थोडे दिसणारे वेगवेगळ्या परिमाणात मोजले जाते. तशी वहिवाट आपण स्वीकारलेली आहे. दिवसांची, महिन्यांची, वर्षाची गणती या वहिवाटाचा भाग आहे.म्हणून एक वर्ष संपले,की येणाऱ्या वर्षासाठी शुभेच्छा देण्याचा प्रघात आपणच घातलेला आहे. त्याला स्मरून सरत्या वर्षाच्या आजच्या शेवटच्या दिवशी माझ्यासह सर्वांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

आजचा दिवस संपला, की उद्याचा दुसरा दिवस उजाडेल.. बुधवार ... नंतर गुरुवार ....नंतर शुक्रवार ... आणि आणखी सहा दिवसांनी पुन्हा बुधवार ... नंतर गुरुवार ....नंतर शुक्रवार ... हे चक्र सुरूच राहणार आहे. दर सहा दिवसांनी पुन्हा तोच दिवस येतो. पण उजाडणारा दिवस तोच असतो का ? आणखी सहा दिवसांनी पुन्हा बुधवार उजाडेल. तो बुधवार असेल, पण आजचा दिवस असेल का ? निश्‍चितच नाही. आपल्या सोयीसाठी काही मुखडे ठरवून घेतले आहेत. नियत काळाने येणाऱ्या दिवसाला आम्ही तो मुखडा घालतो. त्याचा आणि या मुखड्याचा काही संबंध नसतो. तो जोडतो. उजाडणारा प्रत्येक दिवस हा नवा असतो. त्याचा आत्मा आणि अंतरंगही नवे असतात. त्या नवेपणाने तो आपल्याला भेटतो. आपण मात्र जुन्या मुखड्यात त्याची ओळख धुंडाळत असतो.तीच त्याच्यावर थोपतो आणि निवांत होतो. नव्याचे नवेपण जाणायला जात नाही. कदाचित त्यामुळे त्याने आणलेले नवेही आपल्या भेटत नाही. नवेपण न कळल्याने कदाचित फसगतही होते. कधी अवचित लाभही होत असेल. लाभाचा आनंद मिळतो.त्यात गुरफटून जातो.तो कसा झाला ते जाणून घ्यायला जात नाही.ते समजून घेता आले तर लाभाची पुनरावृत्ती करता येऊ शकते. तसा विचार डोक्‍यातच येत नाही.फसगत झाली असेल तर काय गमावले किंवा काय कमावता आले असते,हे लक्षातच येत नाही. ती टाळायचा कशी हा विषय मग आपसूकच बाजूला पडतो.आपण जुन्या मुखड्याच्या परिचयात गुंतून पडतो. नेहमीचा परिपाठ चालू राहतो.त्यात खूष असतो. ही वंचनाच असते. तिच्या मुळाशी कोण जातो ? अज्ञानातही सुख असते, असे म्हणतात. सुख मिळाले, की ते अज्ञानामुळे आहे की कसे, याची चिकित्सा करायला कोण जाते. सुखाशी मतलब असतो. त्यात आत्मसंतुष्ट राहायचीही सवय जडलेली आहे.आयुष्याला लगडून राहिलेल्या या सवयीने आपले मन आणि बुद्धी व्यापली आहे. एका परिपाठात आपण भोवंडून स्थिरावतो आणि नवे वर्ष आले, की सवयीनेच ठोक शुभेच्छा देऊन टाकतो.

उगवणारा प्रत्येक दिवस नवा आहे. जगण्याच्या नव्या नव्या संदर्भाची तो आपल्यासमोर पखरण घालीत असतो. प्रत्येक दिवसाचे भागधेय वेगळे,स्वतंत्र आहे.सूताच्या गुंडाळीला भोवऱ्यासारखी गती देऊन उलटी दिशा दिली तर सूत मोकळे होत खुलत जाते. परिक्रमेत बांधलेले जीवन स्वतःभोवती पिंगा घालीत घालीत फिरत पुढे सरकताना आयुष्याच्या भागधेयाचा दोर मोकळा करीत जाते. तो प्रत्येक दिवस एक प्राक्तन घेऊन उजाडत असतो.दडलेल्या त्या प्राक्तनाला भेटण्यासाठी दिवसाच्या नावाच्या मुखड्याखाली डोकावावे लागेल. शोध घ्यावा लागेल.ते जाणणे आणि जगणे आयुष्याला अर्थ देणारे ठरेल. म्हणून उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी शुभेच्छा !

Wednesday, December 24, 2008

अंतुले यांचीच चौकशी हवी

महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूसंदर्भात बेताल विधान करून निष्कारण वाद निर्माण करणाऱ्या अ. र. अंतुले यांना कॉंग्रेस पक्षाने एक प्रकारे अभय दिले आहे. अंतुले यांचे विधान खेदजनक असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यांची चूक सौम्यपणाने त्यांच्या पदरात टाकली. त्याचवेळी मालेगाव बॉंम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीच्या खरेपणाविषयी शंका उपस्थित करण्याची भाजपची कृतीही योग्य नसल्याचे सांगून अंतुले यांच्याबाबतीतल्या त्यांच्या आक्रमक भूमिकेतील धार काढून घेतली. दोन्ही बाबी केवळ खेदजनक म्हणून मागे सोडून देण्याइतक्‍या साध्या नाहीत. त्यांची कठोरपणे निर्भर्त्सना व्हायला हवी होती. दोन्ही बाबी एका पारड्यात ठेवण्याइतपत गंभीर होत्या,तर त्याची दखल तशाच गंभीरपणाने घेऊन सर्व घटकांना सज्जड दम देणे आवश्‍यक होते.परंतु, अंतुले यांच्या बचावासाठी कॉंग्रेसने दोन गोष्टींची सांगड घातली. चिदंबरम यांचे संसदेतील याविषयीचे निवेदन हे याच राजकीय चतुराईचा भाग होता. अंतुले यांनीही आपली खुर्ची सांभाळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवेदनाने समाधान झाल्याची भूमिका मोठ्या कौशल्याने वठविली.

करकरे यांचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला, त्याविषयीचे सविस्तर निवेदन चिदंबरम यांनी केले. तो सारा घटनाक्रम आणि माहिती या निवेदनाआधीच जगजाहीर झाली होती. अंतुले यांनी शंका उपस्थित केली, तेव्हाही तो तपशील प्रसारमाध्यमांतून उपलब्ध होता. त्यासंबंधीचे पुरावेही उघड झाले होते.तरीही अंतुले यांनी दहशतवादी आणि पाकिस्तानला हत्यार करता येईल, अशी विधाने केली. त्याविषयी त्यांना अजिबात खेद नव्हता. त्यांच्या विधानावर इतका गदारोळ माजूनही अतिशय उद्दामपणे ते आपल्या बोलण्याचे समर्थन करीत होते. उलटपक्षी गदारोळ माजण्याला माध्यमांना जबाबदार धरीत होते. त्यांच्या बेजबाबदारपणाच्या विधानाशी सुरवातीला फारकत घेणाऱ्या कॉंग्रेसने अधिकृतपणेही अंतुले यांनी मांडलेला "कटकारस्थाना'चा सिद्धांत फेटाळून लावला आहे. पण, याच कॉंग्रेस आघाडी सरकारात असूनही जाहीरपणे शंका उपस्थित करून सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वाला हरताळ फासल्याबद्दल त्यांना शिक्षा देण्याचे टाळले गेले आहे. देश ज्या मानसिकतेतून जात आहे, ज्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकजुटीने उभा राहत आहे, त्यालाच अपशकून करण्याचा प्रयत्न अंतुले यांनी केला.त्याविषयी त्यांच्यावर कारवाई झाली नाही. काही न घडल्यासारखे अंतुले सहीसलामत बाहेर पडले, ही बाब कॉंग्रेससाठी लाजीरवाणी आहे.

करकरे आणि त्यांच्यासोबतच्या दोन अधिकाऱ्यांच्या मृत्यूसंदर्भात चिदंबरम यांच्या निवेदनाने समाधान झाल्याचे सांगून अंतुले यांनी वेगळ्या चौकशीची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. करकरे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हातून ठार झाला नाही, असे कोणता भारतीय म्हणू शकेल, असा उलट सवालही त्यांनी केला; तो त्याच्या आधीच्या विधानाच्या पार्श्‍वभूमीवर निलाजरेपणाचा आहे. सरकारने त्यांना वाचविले असले, तरी काही प्रश्‍न उरतातच. करकरे यांना कामा इस्पितळाकडे कुणी पाठविले, कोणाच्या आदेशाने ते तिथे गेले, असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते. अतिशय जबाबदार पदावर असलेल्या, सरकारचा घटक असलेल्या एका व्यक्तीने असे प्रश्‍न उपस्थित करणे अतिशय गंभीर आहे. करकरे यांना तिथे जायला कुणी सांगितले याची, आणि तिथे जायला सांगणाऱ्याच्या त्यामागील हेतूची कल्पना असल्याशिवाय किंवा आपल्या काही वैयक्तिक स्वार्थासाठी कुणाला तरी लक्ष्य करण्याचा हेतू असल्याशिवाय असे प्रश्‍न उपस्थित होऊ शकत नाहीत.ते प्रश्‍न का उपस्थित केले,याविषयी अंतुले यांनी कोणतेच स्पष्टीकरण केलेले नाही. कटकारस्थानाचा संशय व्यक्त करून आकांडतांडव करणाऱ्या अंतुले यांनी त्या प्रश्‍नांची उत्तरे देणे आवश्‍यक आहे. किमानपक्षी कॉंग्रेसने त्यांच्याकडून ती उत्तरे घ्यायला हवीत. त्यासाठी अंतुले यांचीच चौकशी केली जायला हवी.त्याची त्यांना शिक्षाही द्यायला हवी.अन्यथा, राष्ट्रीय पेचप्रसंगाच्या वेळी वातावरण गढूळ करून देशाच्या मनोधैर्यावर ओरखडे काढणाऱ्या प्रवृत्तीचे फावेल,त्या फोफावतील.

Monday, December 22, 2008

ट्रायडंटचा पुनरारंभ

दहशतवादी हल्ल्याच्या घायाळ आणि कटू आठवणी मागे सोडून मुंबईतील हॉटेल ट्रायडंट रविवारी पुन्हा सुरू झाले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर तीनेक आठवड्यांतच पुन्हा हॉटेलचे व्यवस्थापन,कर्मचारी पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज झाले. 26 नोव्हेंबरच्या त्या दुर्दैवी दिवशी रात्रपाळीत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी हसतमुखाने पाहुण्यांचे स्वागत केले. दहशतवादाच्या हैदोसाला पुरून उरण्याइतकी जीवनाची ऊर्जा आणि जिगरबाजपणा या देशातील जनतेत आहे, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. हॉटेलमध्ये नेहमी येणाऱ्यांपैकी काहींनी काल हजेरी लावून आणि यापुढेही आधीप्रमाणेच हॉटेलमध्ये मुक्कामाला येण्याचा इरादा व्यक्त करून अदम्य हिमतीचा पुरावा दिला आहे. हॉटेलच्या पुनरारंभाच्या प्रसंगी आठ धर्माच्या धर्मगुरुंनी आपापल्या धर्मग्रंथातील मंत्रांचे पठण करून देशात नांदणाऱ्या धार्मिक सलोख्याचे प्रतीकात्मकरीत्या दर्शन घडविले आहे.

मुंबईत हॉटेलमध्ये आणि रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळी हल्ला करून भारतीय मानस बिथरवून टाकण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. विविध धर्माच्या अनुयायांमध्ये विद्वेष चेतविण्याचा हेतू त्यामागे होता. त्यातून हिंसाचाराची आग भडकावी, असेही त्यांचे मनसुबे होते. यातले काही घडले नाही. भारतीय जनमानस चिडले, संतप्त झाले. मृत्यूचे थैमान माजविणाऱ्या शक्ती आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर निर्णायक प्रहार करण्याचा संदेश त्याने संतापातून या देशाच्या राज्यकर्त्यांसाठी व्यक्त केला. पण, संयम सोडला नाही.धीर गमावला नाही.अतिशय तणावाचे वातावरण असूनही भारतीय लोकशाहीच्या प्रगल्भतेचे दर्शन साऱ्या जगाला घडविले.दहशतवाद्यांच्या नृशंसतेचे घाव झेलूनही संयम न गमावण्याचा धीरोदात्तपणा दाखवला आणि जगणे विद्‌ध्वंसावर मात करूनही दशांगुले वरच राहते याचाही प्रत्यय दिला. ट्रायडंटचे पुन्हा सुरू होण्यात या साऱ्याचे सार आहे. म्हणूनच या प्रसंगाला विशेष महत्त्व आहे.

जनता अशी प्रगल्भपणे वागत असताना अंतुले आणि त्यांना पाठिंबा देणारे दिग्विजयसिंह यांच्यासारखे राजकारणी संकुचित मानसिकतेत अडकून उथळपणाचे दर्शन घडवीत आहेत. जनतेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आपल्या शहाणपणाचा,बुद्धीचा वापर करण्याऐवजी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करीत आहे. आपल्या या वागण्याने एकप्रकारे दहशतवादी शक्तींना फूस मिळते आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानची भलावण होते,याचेही भान त्यांना राहिलेले नाही. देशाच्या अस्मितेला, सार्वभैमत्वाला घायाळ करणाऱ्या हल्ल्याचेही त्यांनी राजकारण चालविले आहे. राजकीय स्पर्धेत क्षुद्र लाभ मिळविण्यासाठी आपण कशाचे साधन करतो आहोत,याचा विवेक त्यांनी गमावलेला दिसतो. आपल्या वागण्या-बोलण्याची दिशा त्यांनी जनतेकडून समजून घ्यायला हवी.ट्रायडंटचा पुनरारंभ हा अशांसाठीही महत्त्वाचा आहे.

Sunday, December 21, 2008

बंदीचे स्वागत

गोवा हे देशभरातील आणि जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण. देशी- विदेशी पर्यटकांची इथे बारमाही वर्दळ असते.वर्षअखेरीला आणि नववर्ष प्रारंभाला इथला माहोल अद्‌भुत बनलेला असतो. सामान्य पर्यटकांबरोबर बड्या सिलेब्रेटिजना, चित्रपट जगतापासून उद्योगजगतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बरांनाही हे दिवस गोव्यात घालवायचे आकर्षण वाटते. गेल्या काही वर्षांत या काळात गोव्यात येणाऱ्या मातब्बरांची संख्याही वाढलेली दिसते. वेगळ्याच जल्लोषाने भारलेले हे दिवस असतात. यंदा मात्र या जल्लोषावर निर्बंधाचे विरजण पडले आहे, ते गोवा सरकारने बीच पार्ट्यांवर बंदी घातल्याने. जल्लोषाच्या केंद्रवर्ती ठरलेले आकर्षणाचे अंग त्यामुळे आक्रसून जाणार आहे. त्या प्रमाणात जल्लोषात रमणाऱ्यांच्याही उत्साहालाही ओहोटी लागणार आहे. देशातील एकूण वातावरण पाहता ही बंदी अपरिहार्यच म्हणावी लागेल.मात्र, बंदीचा अंतिम निर्णय होण्यापूर्वी त्याबाबत जो घोळ घातला गेला तो अपरिहार्य तर मुळी नव्हताच, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांतून शहाणपणा शिकायच्या आणि स्वीकारायच्या बाबतीत आपल्या प्रशासनाची मानसिकता इंजिनातील बिघाडामुळे गचके खात चालणाऱ्या गाडीसारखी हेलकावत असल्याचा अनुभव देणारी होती.

तीन दिवसांपूर्वी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी दक्षिण गोव्यात 23 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत बीच पार्ट्यांवर बंदी घालण्यात आल्याचा आदेश जारी केला. दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याने हा निर्णय करण्यात आला. संध्याकाळी तो आदेश मागे घेण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात आदेश जारी झाला की नाही, याविषयी माजलेला गोंधळ कायम राहिला. मुख्यमंत्र्यांनी बंदी नसल्याचे सांगितले. गृहमंत्र्यांनीही भीतीचे कारण नसल्याचे सांगून टाकले. शनिवारी उच्चस्तरीय बैठकीत निर्णय होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्या बैठकीत संपूर्ण गोव्यात बीच पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय करण्यात आला. तो जाहीर झाला. या सगळ्या गोंधळामुळे आपल्याकडची निर्णयप्रक्रिया नेमकी कशी चालते, याविषयी मनात शंका उपस्थित झाल्यावाचून राहत नाही. पोलिसांकडे आलेल्या माहितीच्या आधारे एक जिल्हाधिकारी काही निर्णय घेऊन जाहीर करतो. मुख्यमंत्री, गृहमंत्री या निर्णयप्रक्रियेत असल्याचे दिसत नाही. उलटपक्षी त्यांच्या वक्तव्यांतून बंदीचा निर्णय करण्याइतपत गंभीर परिस्थिती नसल्याचे जाणवू लागते आणि दुसऱ्या दिवशी याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीत बंदीचा निर्णय होऊन आदल्या दिवशी दिसणारे चित्र नेमके उलटे होते. हा प्रकार उद्वेगजनक आहे.

दहशतवादाचा धोका असेल, तर तो संपूर्ण गोव्याला आहे. त्यासाठी निर्णय करायचा झाला तर तो सगळ्या गोव्यासाठी व्हायला हवा, जसा व ज्या पद्धतीने तो तो नंतर झाला. मग त्याआधी उलटसुलट चर्चेला वाव देणारी गोष्ट कशी घडली ? मंत्री आणि प्रशासन परस्परांशी अलिप्तपणाने निर्णय घेतात, असे चित्र का दिसले ? तेही दहशतवादासारख्या मोठ्या आपदा निर्माण करणाऱ्या विषयासंदर्भात ? निर्णय घेताना आवश्‍यक असणारा ताळमेळ का दिसत नाही ? मुंबईसारख्या महानगरात एवढे हत्याकांड घडूनही आपण काहीच शिकायला तयार नाहीत, असा त्याचा अर्थ घ्यायचा का ? पाण्यावर एकामागून एक उठणाऱ्या तरंगासारखे काही क्षण असे अनेक प्रश्‍न मनात उमटले.सावधगिरीचा संदेश निर्णायकपणे आणि निःसंदिग्धपणे द्यायच्या वेळी अशा तऱ्हेचा घोळ लोकांना, निर्णयामागील पार्श्‍वभूमी व कारणाबाबत गोंधळवून टाकणारा आणि पुढील स्थितीसंबंधी आकलनाबाबत संभ्रमात टाकणारा आहे. प्रत्यक्ष घडू शकणाऱ्या विपरिताइतका तो अधिक धोक्‍याचा आहे. यासाठी राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असे विषय अधिक परिपक्वतेने हाताळणे गरजेचे आहे.

गोवा दहशतवाद्यांच्या नजरेत आल्याचे किमान तीन चार वर्षापूर्वी उघड झाले आहे. समुद्रकिनाऱ्यांसारखी गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांची लक्ष्य होण्याची बाबही याआधी उघड झाली आहे. मध्यंतरी पकडल्या गेलेल्या काही विद्‌ध्वंसक घटकांकडूनही दहशतवाद्यांची नजर गोव्याकडे वळल्याची माहिती उघड झाली होती. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर विदेशी पर्यटकांची होणारी वर्दळ, त्यातही इस्त्राईली नागरिकांचा असलेला वावर, गोव्याला असणाऱ्या संभाव्य धोक्‍यामागची कारणे आहेत. देशातील गुप्तचर यंत्रणानांही दहशतवाद्यांच्या अशा कारस्थानाची माहिती मिळालेली आहे आणि त्या त्यावेळी गोव्याला सावधानतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील हल्ल्यानंतर तर कुठल्याही स्वरूपाची, थोडीशीही जोखीम पत्करणे संकटाला आमंत्रण देण्यासारखेच आहे.त्यामुळे सरकारने केलेला बंदीचा निर्णय समर्थनीय ठरतो.

वर्षअखेर, नववर्षदिन साजरा करण्याच्या निमित्ताने वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात जल्लोषाचे वातावरण असते, हे खरे असले,तरी तो जल्लोष सगळाचा सगळा निकोप असतो, असे मानायचे काही कारण नाही. जल्लोषाच्या मलमली वातावरणाच्या पडद्याआड अमली पदार्थाचा व्यापार, सेवन, व्यसन आणखीनही काही हिडीस प्रकार यांचाही फड रंगलेला असतो. जल्लोषाच्या वातावरणामुळे एरव्हीचे नियंत्रण, तपासणीचा काचही काहीसा सैलावलेला असतो.त्याचा फायदा घेऊन आत शिरणारे असतात आणि नव्याने जाळ्यात अलगद अडकणारेही असतात. त्यात देशी, विदेशी पर्यटकही सामील असतात. आयुष्याची वाट कोरण्याच्या वयातली आणि वळणावरची मुलेही असतात, ज्यातील काही क्षणिक मोहाला बळी पडून कर्तृत्वाचे पाऊल गमावून बसतात. लोकांच्या मदहोशीचा आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी लाभ उठविऱ्यांसाठी ही मोठी पर्वणी असते.अशा "लाभार्थी'ची अर्थात मोठी साखळी असते. बंदीमुळे त्यांना थोडी खोट बसेल,पण काही बहकणाऱ्या पावलांनाही चाप बसेल. परिसरात राहणाऱ्यांना थोडासा मोकळेपणा, निवांतपणा मिळेल. थोड्याशा चांगल्या निष्पत्तीच्या अल्प दिलाशासाठीदेखील बंदीचे स्वागत करायला हवे.

Thursday, December 18, 2008

अंतुले यांचे विधान

मुंबईतील दहशतवाद्यांचा हल्ला हा केवळ त्या महानगरावरचा नव्हे, तर देशावरचा हल्ला होता. त्याची पाळेमुळे पाकिस्तानात असल्याचे अमेरिका, इंग्लंडसारखे देश तत्परतेने सांगत असताना, हल्ल्याचा विषय धसास लावून त्यात गुंतलेल्या दहशतवादी शक्तींना नेस्तनाबूत करण्यास पाकिस्तानला भाग पाडण्याची आवश्‍यकता असताना आणि त्यासाठी भारतीयांनी सुरात सूर मिसळून, खांद्याला खांदा लावून एकजुटीने उभे राहणे अपरिहार्य असताना, अ. र. अंतुले यांच्यासारखे राजकारणी वेगळेच सूर छेडून मोठी हानी करीत आहेत. पाकिस्तानसारख्या लबाड आणि चलाख शत्रूच्या हाती आयते कोलीत देत आहेत.

महाराष्ट्राचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे आणि पोलिस निरीक्षक विजय साळसकर हे तिघेजण कामा इस्पितळ भागात दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. "जे डोळ्यांना दिसते, त्याहून अधिक काही घडले आहे,' असे सांगून अंतुले यांनी तीनही अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण आणि वादळ उठविले आहे. "तीनही अधिकारी एकाच गाडीतून का गेले , ताज, ओबेराय किंवा नरिमन हाऊसकडे न जाता कामा इस्पितळाकडे का गेले,' असे प्रश्‍न उपस्थित करून,मालेगावच्या बॉबस्फोटांचा थेट उल्लेख न करता, त्यांनी करकरे यांचा मृत्यू त्या तपासाशी जोडण्याचा प्रयत्न केला. "काही प्रकरणात "बिगर-मुस्लिम' लोक गुंतल्याचे तपासात उघड झाले होते. काहींना त्यांचा मृत्यू झालेला हवा होता. प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात "बंद"चे आवाहनही करण्यात आले होते.' अशी विधाने करून त्यांनी करकरे आणि अन्य दोघा अधिकाऱ्यांच्या मृत्यूमागे काही राजकीय पक्षाचा संबंध दाखविण्याचा प्रयत्न केलाच. भाजप आणि शिवसेनेकडून त्याची तीव्र प्रतिक्रिया आली, ते स्वाभाविक होय. आपल्या विधानांनी वाद निर्माण होतो, असे लक्षात आल्यावर आपण केवळ "त्या तिघांना एकाच गाडीतून कामा इस्पितळाकडे जायला कुणी सांगितले,' एवढाच प्रश्‍न केल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण, त्याआधी वादळ उठण्यासाठी पुरेशी पार्श्‍वभूमी तयार केलीच. कॉंग्रेसने लगोलग आपला त्या विधानाशी काही संबंध नसल्याचे सांगून हात झटकले. देशातील आताच्या एकूण नाजूक वातावरणात अशा तऱ्हेची विधाने करणे मुळात गैर आहे. त्यामुळे व्हायची ती हानी झालीच आहे. ती पुसून कशी काढणार ?

स्फोटाच्या तपासाच्या काळात त्यातील संशयितापर्यंत समझौता एक्‍सप्रेसमधील स्फोटाचे धागे पोचत असल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. त्यावर केंद्र सरकारला लगोलग खुलासा करून "समझौता'मधील स्फोटांमागे पाकिस्तानी घटकांचा हात असल्याचे आधीच निष्पन्न झाले असल्याचे पुन्हा सांगावे लागले. मुंबईतील हल्ल्यानंतर पाकिस्तानी प्रसारमाध्यमे मात्र त्या बातमीचा उल्लेख वारंवार करून भारत विनाकारण आपल्या देशावर संशय घेत असल्याचा,आरोप करीत असल्याची टिप्पणी करीत होती. अंतुले यांच्या विधानांनी पाकिस्तानी प्रसारमाध्यमे आणि अन्य घटकांना आपल्याविरुद्ध प्रचारासाठी खाद्य पुरविले आहे. भारताच्या दाव्यांना तडे देण्यासाठी पाकिस्तान या सामग्रीचा उपयोग केल्यावाचून राहणार नाही. दहशतवादविरोधी लढ्यामध्ये बाह्य शत्रूंशी लढताना आपल्याकडच्या बहकणाऱ्या तोंडांनाही लगाम घालण्याची गरज आहे.

Wednesday, December 17, 2008

संयम हवाच

भारत हा एक जबाबदार देश आहे. पाकिस्तान स्वतःला म्हणवून घेतो,आणि बेजबाबदारपणे वागतो, तसा "जबाबदार' नव्हे. जबाबदारीचा संपूर्ण अर्थ जाणणारा आणि जगणारा असा देश आहे. लोकशाही देश आहे. कायद्याचे राज्य मानणारा देश आहे. त्यामुळे भारताची वागणूक ही या सर्व परिचयाला सार्थ ठरविणारी आणि न्याय देणारी असणे अपेक्षित आहे. मुंबईतील हल्ल्यातील पकडला गेलेला दहशतवादी महमद अजमल कसाब याच्याबाबतीतही भारताला त्याच वाजवीपणाने पावले टाकणे आणि त्याच्या प्रकरणाचा निकाल करणे आवश्‍यक आहे.

कसाबच्या बाबत संपूर्ण देशाच्या भावना कमालीच्या संतप्त आहे. ते स्वाभाविक आहे. असा नृशंस नरसंहार करणाऱ्या नरपशूविषयी कुणालाही सहानुभूती वाटणार नाही. तशा सहानुभूतीचा तो हक्कदारही नाही. लोकांच्या ताब्यात सापडला, तर तत्क्षणी त्याचा निकाल लावून टाकला जाईल, इतक्‍या पराकोटीची चीड त्याबाबत जनमानसात आहे. परंतु, रागाच्या भरात काही कारवाई करणे देश म्हणून योग्य ठरणार नाही. देश म्हणून होणारी कृती विवेकाधिष्ठित असावी लागेल.

कसाबने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी पाकिस्तानी वकिलातीकडे अर्ज सादर केला आहे. तेथून त्याला मदत मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. आपल्याकडच्या काही वकिलांनी त्याचे वकीलपत्र घेण्याची तयारी दर्शविली. सर्वप्रथम अशी तयारी दर्शविणारे अशोक सरोगी यांच्या घरावर हल्ला करून शिवसैनिकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. नागपूरचे एक वकील महेश देशमुख पुढे सरसावले,पण त्यांनीही अशाच हल्ल्यानंतर माघार घेतली.ऍड. के. बी. लांबा यांच्या घरावर काही अज्ञातांनी हल्ला केला. या सर्व घटनांतून एकच गोष्ट पुढे आली,की कुणीही कसाब याचे वकीलपत्र घ्यायला गेल्यास त्याला अशा प्रकारच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागेल. वकिलांना अप्रत्यक्षपणे ही दमदाटीच आहे. मुंबईच्या बार कौन्सिलने तर कसाबचे वकीलपत्र न घेण्याचा ठरावच करून टाकला आहे. वकिलांच्या घरावरचे हल्ले आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या संदेशातून दिसणारी दहशतवाद्यांविरुद्धची चीड आणि क्षोभाची भावना समजण्यासारखी असली, तरी त्यातून आपल्या न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आपणच धोक्‍यात आणीत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे. ज्याच्यावर आरोप आहेत, त्याला बाजू मांडण्याची, त्याचे कायदेशीर प्रतिनिधित्व होण्याची संधी देणे ही न्यायप्रक्रियेतील अंगभूत आणि अपरिहार्य तरतूद आहे. वकील उभा राहिला नाही,तर संबंधित न्यायासनाला ती जबाबदारी उचलावी लागेल. हल्ले, निदर्शने या गोष्टी न्यायप्रक्रियेत अडथळे आणणाऱ्या आहेत. त्याचा अवलंब न करता, न्यायप्रक्रिया सुरळीतपणे आणि वेगाने पार पडेल याची काळजी वाहिली पाहिजे. संकटाच्या, शोकाच्या
क्षणी सुद्धा या देशाची जनता संयम,प्रगल्भता आणि परिपक्वता सोडीत नाही, हे दाखविण्याचा हा क्षण आहे.

Tuesday, December 16, 2008

"युद्ध नको'त दडलेय काय?

पाकिस्तान एक "जबाबदार राष्ट्र' आहे. "अण्वस्त्रसज्ज देश' आहे.पाकिस्तानला युद्ध नको, परंतु कुणी (म्हणजे भारताने)आक्रमण केल्यास आपले संरक्षण करण्यास देश सक्षम असल्याचे निवेदन त्या देशाचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी राष्ट्रीय असेंब्लीत केले. स्वतःला जबाबदार म्हणवणाऱ्या पाकिस्तानची मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतरची कृती आणि उलटसुलट वक्तव्ये त्याचा बेजबाबदारपणा दाखवणारी आहेत. त्याच्या अण्वस्त्रसज्जतेचा उल्लेख देशवासीयांना देशाच्या संरक्षणासंबंधी आपल्या क्षमतेची ग्वाही देण्यापेक्षा वेगळाच गर्भितार्थ सूचित करणारा आहे. त्याला जोडून येणारी "युद्ध नको'ची भाषाही मानभावीपणाची आहे. त्या "नको'मध्ये युद्धखोरीचा ज्वर दडलेला आहे. अण्वस्त्रसज्जतेचा उल्लेख त्यातून आलेला आहे.पाकिस्तानातील राज्यकर्त्यांवर तेथील मूलतत्त्ववाद्यांचा पगडा आहे.अण्वस्त्रसज्जतेला त्या आततायी शक्तीच्या उपस्थितीची आणि प्रभावाची जोड असल्यामुळे पाकिस्तान ही एक अविवेकी घातक शक्ती बनलेली आहे. त्यापायीच जग सबुरीने घेत आहे. परंतु, समजुतीने, चर्चेने सांगून पाकिस्तान ऐकणार नाही, हे त्याच्या सध्याच्या वर्तणुकीतून जसे स्पष्ट झाले आहे, तसेच तिथे लोकशाही रुजण्यास आणि ती सक्षम होऊन कारभाराची, निर्णयाची सत्ता व सूत्रे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीच्या हाती येण्यास आणखी खूप वर्षे जावी लागतील, हेही उघड झाले आहे. तेवढा काळ भारतालाच नव्हे, जगालाही त्याला चुचकारीत राहणे परवडणार नाही, हे ओळखूनच भारताला आणि जगाला त्यावर तोडीचा प्रभावी उपाय करावा लागणार आहे.

भारतीय संसदेवर हल्ला झाल्यानंतर लष्करे तोयबाला नेस्तनाबूत करण्याचे आश्‍वासन पाकिस्तानने दिले होते. त्यावर बंदी घातली गेली, परंतु तिचे उच्चाटन करण्यात आले नाही. तेच लोक जमात-उद-दावाच्या नावाने आता हैदोस घालीत आहेत. घातपाती कारवाया करणाऱ्या किंवा कुठल्याही विघातक संघटनेवर बंदी घातल्यानंतर तिची पाळेमुळे खणून काढली नाही, तर ती नव्या अवतारात प्रकटते आणि आपले विद्‌ध्वंसाचे काम पुढे चालू ठेवते. बंदीचा उद्देशच त्यात पराभूत होतो. भारतात "सिमी'च्या बाबतीतही असाच अनुभव आहे. बंदी म्हणजे विद्‌ध्वंसक घटकांना नव्या नावानिशी तीच घातक कृत्ये करण्यासाठी उपलब्ध होणारी पळवाट ठरू नये. बंदीचा उद्देश विद्‌ध्वंसक कारवायांना पूर्ण आळा घालण्याचा असतो. बंदीसारख्या निर्णयानंतर खरी कारवाई सुरू होते. व्हायची असते. बंदीतच कारवाई संपते. त्यामुळे अशा घातक घटकांचे फावते. मुळातले अरिष्ट आणखी तीव्र होते. पाकिस्तानने "लष्कर'वर कारवाईचे नाटक आणि "जमात'वर मेहेरनजर करून दहशतवादी शक्तींना बळकटी दिली आहे, जगावरील दहशतवादाची छाया आणखी गडद केली आहे.
"युद्ध नको'चा पाकिस्तानचा घोष फसवा आणि भारताला गाफील ठेवण्याचा डाव असेल, या शक्‍यतेचा गांभीर्याने विचार करायला हवा.पाकिस्तानशी शांततेच्या, दोस्तीच्या वाटाघाटी सुरू असताना कारगिल घडले होते. दोन दिवसांपूर्वी भारताने आपल्या हवाई हद्दीचा भंग केल्याची हूल पाकिस्तानने उठविली होती. तसा भंग झाला नसल्याचा खुलासाही नंतर पाकिस्तानने केला. मुंबईतील हल्ल्यावरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा तो पाकिस्तानचा प्रयत्न होता, अशी टिप्पणी भारताने केली. पाकिस्तानचा उद्देश तेवढा मर्यादित असेल, असे मानता येणार नाही. एका बाजूला "युद्ध नको' म्हणत, अशा हुली उठवीत राहायचे,दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करायचे नाटक करायचे, उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करीत गोंधळ उडवून देत राहायचे आणि दुसऱ्या बाजूला सैनिकी हालचाली सुरू ठेवायच्या, अशी पाकिस्तानी राज्यकर्त्यांची सध्याची वागणूक आहे. भारताला आणि जगाला जे अपेक्षित आहे, ते निर्णायकरीत्या करण्यात कालहरण करीत राहायचे, असा त्याचा खाक्‍या आहे. कारवाई करीत असल्याची धूळफेक करीत मिळणारा वेळ युद्धाच्या तयारीसाठी तो वापरीत नाही ना, याकडे भारताला आणि जगाला अगदी डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार आहे. युद्धसदृश स्थिती निर्माण करून आपल्यावरचा जागतिक दबाव शिथिल करण्याचा डावपेच आणि खटाटोप त्यामागे असण्याची शक्‍यताही लक्षात घ्यावी लागणार आहे.

Monday, December 15, 2008

शब्द नको, कृती हवी

मुंबईतील हल्ल्यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याबद्दल जगाला शंका राहिलेली नाही. इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनीही पाकच्या भूमीतून दहशतवाद सुरू असल्याचे निःसंदिग्धपणे सांगताना त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले आहे. शब्दांचे खेळ न करता प्रत्यक्ष कृती करण्यास बजावले आहे. आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकून पाकिस्तान कारवाईचे जे नाटक करीत आहे, त्यावर आपल्या विधानाने ब्रिटिश पंतप्रधानांनी एक प्रकारे प्रहार केला आहे.कारवाईचे ढोंग खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही त्यात दडलेला आहे. इतके असूनही पाकिस्तान छद्मीपणा तत्काळ सोडून देऊन प्रामाणिकपणे कारवाई करेलच, याविषयी खात्री देता येत नाही. दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय समूहाकडून अजूनही दाब वाढला पाहिजे. पाकिस्तान करीत असलेल्या कृतीची सतत छाननी होत राहिली पाहिजे. जिथे तो नाटकीपणा करतो असे आढळेल, तिथे त्याला पुन्हा कानपिचक्‍या देत राहावे लागणार आहे.

दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत भारताकडून पुरावे उपलब्ध झाले नसल्याचे पाकिस्तानचे तुणतुणे अजून सुरूच आहे. पुरावे न मिळाल्यास कारवाई पुढे रेटता येणार नाही असेही सांगून पाकिस्तानी राज्यकर्ते मोकळे झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने केलेल्या ठरावानुसार जमात-उद-दावा या संघटनेवर पाकिस्तानने बंदी घातल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात बंदी घातली गेलीच नाही. आणि आता तर ती संघटना कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांत गुंतली नसल्याचे पाकिस्तानचे राज्यकर्ते सांगू लागले आहेत. उलटपक्षी ती शैक्षणिक,आरोग्य क्षेत्रात समाजकार्य करीत असल्याचे ते म्हणू लागले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात या संघटनेविरुद्ध निर्णय होणार असल्याची कुणकूण लागल्यावर उपलब्ध अवधीत जमातच्या कारभाऱ्यांनी संघटनेच्या बॅंक खात्यातील कोट्यवधीची रक्कम काढून घेतली. कारवाईच्या तीव्रतेतून आपला बचाव करून घेतला. या संघटनेसंदर्भातील पाकिस्तानच्या भूमिकेचा वेध घेतला,तरी ते करीत असलेला बनाव लक्षात येतो.

दहशतवाद्यासंदर्भातील पुरावे योग्य वेळी पाकिस्तानला देण्याची तयारी परराष्ट्र व्यवहारमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दाखवली आहे. आता लगेच पुरावे देता येणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान पुरावे घेऊनही निर्णायक कारवाई करेल, याविषयी त्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांची शंका खरी आहे. 2001मध्ये संसदेवर हल्ला झाला होता. त्यावेळी पुरावे देऊनही त्याचा उपयोग झाला नव्हता. त्या हल्ल्याशी संबंध असलेल्यांना पाकिस्तानने नंतर मोकळे सोडले होते. भूतकाळातील अशा कटू अनुभवांचा हवाला मुखर्जी यांनी यासंदर्भात दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पाकिस्तानने प्रथम दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे, दहशतवाद माजविण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या सुविधा उद्‌ध्वस्त कराव्यात. दहशतवादविरोधी खरोखर कठोर कारवाई करावी. ती तो करतो आहे, याचा विश्‍वास निर्माण करावा. त्यानंतरच पुराव्यासंदर्भातील त्यांची मागणी, संयुक्तपणे तपासकाम करण्याचा प्रस्ताव यांचा विचार करण्याची भारताची भूमिका वस्तुनिष्ठ आहे.

पाकिस्तान स्वतःही दहशतवादाचा बळी असल्याचा गळा काढीत आहे. अध्यक्ष आसिफ अली झरदारी तर आपण व्यक्तिशः दहशतवादाचा बळी असल्याची आणि त्यामुळे मुंबईतील हल्ल्यानंतर भारतीयांची वेदना आपण समजू शकतो,अशी भावनिक भाषणबाजी करीत आहेत. दहशतवादाविरुद्धची लढाई आपण प्रामाणिकपणे लढतो आहोत, हे पटविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, जे घडले ते एवढे भीषण आहे,की अशा भावुक भाषेने वाहवत नेल्याने त्याच्या प्रामाणिकपणाविषयी खात्री पटणारी नाही. झरदारी यांना जे दुःख भोगावे लागले, त्याविषयी सहानुभूती त्यातून पाझरू शकेल. अशा भावनिक नाटकांनी समस्या दूर होणार नाही. कारवाईमागचा प्रामाणिकपणा पटविण्याचा एकच मार्ग म्हणजे त्यांनी खरोखर दहशतवादी घटकांविरुद्ध कठोर कारवाई केलेली प्रत्यक्षात कृतीतून दिसली पाहिजे. ब्राऊन म्हणाले, ते अगदी खरे आहे- "शब्द नको, कृती हवी.' कृतीच हवी आहे !

Thursday, December 11, 2008

कारवाई की संरक्षण ?

मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी गुंतल्याचे भारत सांगत असताना पाकिस्तान आणि त्या देशातील प्रसारमाध्यमे त्याचा नेहमीप्रमाणे इन्कार करीत होती. पाक प्रसारमाध्यमांनी तर भारताच्या दाव्याची खिल्ली चालविली होती. विशेषतः इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांतून त्याविषयी जहाल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. भारतात फटाका फुटला तरी पाककडे बोट दाखविले जाते, अशी टिप्पणीही करण्यात आली होती. भारताने ठोस पुरावे दाखविल्यानंतर हे नाटक थांबले.

पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसुफ रजा गिलानी हे हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नाकारत होते. नंतर झरदारी यांनी ते लोक "बाहेरचे' असल्याचे सांगायला सुरवात केली. ते बाहेरचे असले तरी पाकिस्तानच्या भूमीतून दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिसा राईस यांनी खडसावून सांगताच पाकिस्तानने कारवाईची तयारी दाखविली. दहशतवादी पाकिस्तानी असल्याचेही त्यांना मान्य करावे लागले.पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये कारवाई करून लष्करे तोयबाचा कमांडर झाकीउर रहमान लाखवी आणि जैशे महम्मदचा प्रमुख मसूद अझहर यांना अटक केली आहे. मात्र,त्यांना भारताच्या ताब्यात देण्यास नकार दिलेला आहे. त्याहीपुढे जाऊन त्यांची भारताकडून चौकशी केली जाण्यासही नकार दिला आहे आणि ठोस पुरावे असल्याशिवाय स्वतःही त्यांच्याबाबत तपास करणार नसल्याची पाकिस्तानची भूमिका आहे.

भारताने अमेरिकेच्या साह्याने पाकिस्तानला त्याच्या भूमीतून दहशतवाद फैलावणाऱ्यांविरुद्ध काही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. अमेरिकेनेही पाकिस्तानला खडसावून दहशतवादविरोधी लढाईत एक पाऊल पुढे टाकायला लावले आहे. आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी, 9/11 नंतर अमेरिकेने केली, तशी कारवाई करण्याचा भारताला पूर्ण अधिकार असल्याचे अमेरिकेने निःसंदिग्ध शब्दात सांगितले आहे. मुंबईतील हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या ताठर भूमिकेला,जागतिक स्तरावर निर्माण केलेल्या दबावाला आलेले हे यश म्हणायला हवे. अर्थात ते पुरेसे नाही. भारताच्या पवित्र्याचा दाब थोडाही सैलावला, तरी पाकिस्तानचे सत्ताधारी पुन्हा सैलावतील. थोड्या कालाने पुन्हा विद्‌ध्वंसाचे तांडव रचतील. त्याचा कशाही स्थितीत भरवसा बाळगता येणार नाही. भारताने आपला दबाव आणि अपेक्षित कारवाईचा रेटा अधिकाधिक तीव्र करणे आवश्‍यक आहे. अमेरिकेत 9/11 नंतर पुन्हा दहशतवादी हल्ला झालेला नाही, याचे इंगित समजून घेतले पाहिजे.दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी आणि मुंबईतल्या हल्ल्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंध आणि सुरक्षेच्या कवचाला अभेद्यता आणण्याचे उद्दिष्ट साध्य करायला हवे. ते साध्य होण्याचे स्पष्ट संकेत दिसेपर्यंत कारवाईसाठीचा रेटा वाढवीत नेणे गरजेचे आहे.

पाकिस्तानने कारवाई केलेली असली,तरी त्याबाबतच्या त्याच्या प्रामाणिकपणाविषी आणि हेतूविषयीही शंका घेण्यास वाव आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी कारवाईनंतर केलेल्या वक्तव्यात या शंकेसाठी भरपूर जागा दिसते. लाखवी आणि अझहर या दहशतवाद्यांविरुद्ध पाकने केलेली कारवाई ही त्यांना अप्रत्यक्षपणे संरक्षण देण्याची कृती आहे. पाकने त्यांना ताब्यात घेऊन भारताच्या थेट कारवाईपासून वाचविले आहे. भारताला त्यांची चौकशी करण्याचेही दरवाजे सध्या तरी बंद केलेले आहेत. भारताला आता राजनैतिक दबाव वाढवून आणि जागतिक स्तरावर त्यांच्याविरुद्ध कारवाईचे मानस तयार करूनच त्यांना हात घालता येईल. मात्र, पाकिस्तानच्या छत्रछायेखाली राहून आपली दहशतवादी कारस्थाने पुढे नेण्याच्या शक्‍यता या दहशतवाद्यांना उपलब्ध असणार. पाकिस्तान दहशतवादविरोधी कारवाई करीत असल्याचे नाटक बेमालूमपणे वठवीत राहणार. त्या पडद्याआड दडून दहशतवादी नरसंहाराचे खेळ मांडत राहणार,ही शक्‍यता पुसणे अवघड आहे. त्यामुळेच पाकिस्तानची कारवाई हे दहशतवाद्यांना मिळालेले छत्र,संरक्षण असल्याची शंका वाटते.

Tuesday, December 9, 2008

अनादराची संस्कृती

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय बदलांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आपली पदे गमवावी लागली. नव्या नेत्याच्या निवडीत सत्ताधारी आघाडीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी घेतली. कॉंग्रेसच्या नेत्याच्या निवडीचा घोळ मात्र त्या पक्षाच्या परंपरेप्रमाणेच घडला. शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल झालेले नारायण राणे मुख्यमंत्री होतील, अशी हवाही निर्माण झाली. तसे झाले असते तर कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमांतून पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांकडे राज्याची धुरा आली असती. तसे घडले नाही. उलटपक्षी हातचा घास हिरावून घेतल्यासारख्या अवस्थेत सापडलेल्या नारायण राणे यांनी आपल्या मनातल्या साऱ्या संतापाला वाट मोकळी करून दिली. त्यांच्या टीकेच्या प्रहारातून कॉंग्रेसजनांचे श्रद्धास्थान असलेल्या पक्षश्रेष्ठी सोनिया गांधींही सुटल्या नाहीत.त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. राणे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.

कॉंग्रेसमध्ये आल्यापासून राणे यांनी सातत्याने मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी शक्ती पणाला लावून प्रयत्न केले. त्यासाठी कॉंग्रेसच्या तथाकथित शिस्तीचेही त्यांनी तीन तेरा वाजविले.त्यावेळी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली नाही.आपल्या वागण्या-बोलण्याने स्थानिक नेतृत्वाच्या नाकी त्यांनी दम आणला होता. मात्र, कॉंग्रेसजनांच्या दैवतालाच, टीकेचा आसूड उगारून, राणे यांनी हात घातल्याने कॉंग्रेसमधील व्यक्तिपूजकांना त्यांच्यावर शिस्तीचा बडगा उगारण्यावाचून पर्याय उरला नव्हता. शिस्तीच्या बाबतीत अन्य नेते आणि सोनिया गांधी यांच्यात असलेला फरक राणे यांच्या ध्यानात आला नाही किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही इप्सित साध्य न झाल्याने त्यांचा संयम सुटला असावा !

कॉंग्रेसमध्ये किंवा कमीजास्त प्रमाणात सर्वच राजकीय पक्षात गुणवत्ता, क्षमता , सचोटी या गुणांच्या निकषांवर जबाबदारी सोपविली जाते, असे या देशातील राजकीय चित्र मुळीच नाही. अन्यथा लोकांनी निवडणुकीत झिडकारल्यानंतर आणि वारंवार जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्यानंतरही शिवराज पाटील इतका काळ केंद्रात गृहमंत्रिपदावर राहिले नसते. अशी अनेक उदाहरणे कॉंग्रेसमध्ये आणि अन्य राजकीय पक्षात पावलोपावली आढळतील. गुणवत्ता, क्षमता, सचोटी यांचे शब्दकोशातील अर्थ काही असले, तरी राजकीय व्यवहारात त्यांचे ते अर्थ प्रचलित नाहीत,याचाही अनुभव या देशात ठायी ठायी विखुरलेला आहे. राणे यांच्यासारखा राजकारणी सोडाच, या देशातला सामान्य माणूसही त्याबाबत आज अनभिज्ञ राहिलेला नाही. त्यामुळे या गुणांची हाकाटी करीत आपल्यावर अन्याय झाल्याचा किंवा आपल्याला डावलले गेल्याचा आक्रोश करण्याला काही अर्थ नाही. पद मिळविण्यासाठी गटबाजी करावी लागते,निर्णय करणाऱ्याची मर्जी जिंकावी लागते, त्यात होणाऱ्या कामगिरीवरच संबंधितांच्या पदरी यशापशयाचे फासे पडतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निवडीच्या राजकारणत याहून वेगळे काही घडलेले नाही.

राणे कॉंग्रेसमध्ये आल्यापासून मुख्यमंत्री होण्यासाठी आपले पत्ते खेळत राहिले. त्यांचे प्रतिस्पर्धी आपले डाव खेळत राहिले. डाव- प्रतिडावाचा,परस्परांवर कुरघोडी करण्याचा खेळ गेली तीनेक वर्षे सुरूच होता.त्यात यश मिळविण्यासाठी राणे यांनी प्रसंगी काही पथ्ये मोडीत काढून जाहीरपणे आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर तोफ डागण्यास कमी केले नाही.वेगवेगळ्या प्रकारे पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासही त्यांनी कमी केले नाही. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक नेतृत्वात बदल होऊन मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळावे यासाठी त्यांनी आपली फिल्डिंग लावलीच होती.त्यांच्याच म्हणण्यानुसार बहुसंख्य आमदारांची अनुकूलता असूनही मुख्यमंत्रिपद आपणास मिळू नये यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना या सर्वांचीच युती झाली. म्हणजे आमदारांच्या मतांऐवजी राणे नको असलेल्या राज्यातल्या अन्य नेत्यांनी आपापल्या गटांमार्फत केलेले लॉबिईंग राणे यांच्या प्रयत्नांवर भारी पडले. म्हणजेच मुख्यमंत्रिपदाचे पारडे आपल्या बाजूने फिरविण्यास आवश्‍यक लॉबिईंगमध्ये राणे कमी पडले.कॉंग्रेस पक्षातील नेतानिवडीचा हाच शिरस्ता आहे. राणे त्यात यशस्वी झाले असते, तर त्यांची तक्रार नसती. कॉंग्रेसचे असे कल्चर स्वीकारल्यावर अपयशानंतर थयथयाट अनाठायी ठरतो.

आपल्या लोकशाहीच्या प्रगल्भतेचा आपण सर्वच जण मोठा अभिमान बाळगत असलो, जगापुढे तो मिरवीत असलो, तरी आपल्याकडच्या राजकीय पक्षांची चालणूक हीच लोकशाही तत्त्वाशी सुसंगत नसते.राजकीय पक्ष लोकशाही पद्धतीने चालविले जात असल्याचे सांगितले जाते. तो त्यांचा तोंडवळा आहे. आत्मा कोमेजून ग्लानीत गेला आहे. पक्षांतर्गत लोकशाहीचा ऱ्हास झालेला आहे. पक्षाचे विविध पदाधिकारी निवडण्यापासून राज्यांत मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान निवडण्यापर्यंत सर्व स्तरांवर त्याचा प्रत्यय येतो. लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात. त्यांनी आपला नेता निवडायचा असतो. नवे मंत्रिमंडळ स्थापनेच्या वेळी असो, किंवा मध्येच येणारा नेतृत्वबदल असो,नेतानिवडीचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींना देणारा ठराव केला जातो. कॉंग्रेसमध्ये तर सर्रास असेच घडत असते. कुणाला मुख्यमंत्री करायचे, कुणाला आणखी काय, हे दिल्लीत पक्षश्रेष्ठी ठरवितात. त्यांचे प्रतिनिधी राज्यात येतात. सर्वांना भेटून त्यांची मते आजमावतात.सर्वांची एकत्रित बैठक घेतात आणि सर्वाधिकाराचा ठराव संमत करवून माघारी जातात. सर्वाधिकाराच्या ठरावाआडून नेता लादला जातो. महाराष्ट्रात परवा असेच घडले.राणे यांनी "फार्स'संबोधून त्यावर टीका केली. हा फार्स कॉंग्रेसी राजकीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या फार्साचा शेवट राणे यांच्या मनासारखा झाला असता, तर त्यांनी असहमतीचा, टीकेचा "ब्र'ही उच्चारला नसता. लोकशाही तत्त्वांना आणि घटनेला मान्य असलेली नेतानिवडीचा पद्धत जोवर राबविली जात नाही,त्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी जोवर आग्रह धरीत नाही, तोवर असे फार्सच चालू राहणार. ज्यांच्या मनासारखे होणार नाही, ते त्याविरुद्ध ओरडत राहतील, ज्याचे साधेल तो त्याची भलावण करीत राहील.घटनासंमत कार्यपद्धतीला फाटा देणे हा खरे तर घटनेचा आणि लोकप्रतिनिधी निवडणाऱ्या जनतेचा अनादर आहे. नेतानिवडीचे "फार्स', "नेता लादणे' या समस्येचे मूळ या अनादर करणाऱ्या पद्धतीत आहे. मनासारखा लाभ पदरात न पडणारे राजकारणी केवळ वैयक्तिक आकांक्षेपोटी,मर्यादित आणि संकुचित भूमिकेतून आकांडतांडव करीत असतात. त्यांनी योग्य पद्धतीची प्राणप्रतिष्ठा आपल्या पक्षात करण्यासाठी मनाची कवाडे खोलून कंबर कसली, तर या फार्सातून नव्हे, राजकारणातला ओंगळपणातून त्यांची आणि जनतेचीही सुटका होऊ शकेल.

Tuesday, December 2, 2008

चोर्लाची सफर

जवळ जवळ तीनेक वर्षांनी मोटरसायकलवरून बेळगावला जाणे झाले. बसच्या गतीने अपेक्षित वेळेत पोचणे शक्‍य नव्हते. पट्‌कन ठरवून टाकले आणि निघालो.

मोटारसायकलने बेळगावला जाणे येणे मला नवे नाही. काही वर्षापूर्वी नोकरीनिमित्त बेळगावात होतो, तेव्हा महिना-दोन महिन्यांतून एकदा अशी रपेट करायचो. चोर्ला घाटातील मार्ग माझ्या आवडीचा बनला होता. एक तर तुलनेने अंतर कमी आहे, घाटातून आणि पुढे कणकुंबी, जांबोटीच्या भागातून जाताना, गारवा भरून राहिलेली आल्हादक हवा अंगाला झोंबण्यातला अनुभव विलक्षण सुखावणारा,चैतन्यदायी असतो.अगदी सकाळच्या प्रहरापासून संध्याकाळी सूर्य मावळतीला गेल्यानंतर अंधारून येणाऱ्या प्रहरी या मार्गावरून मी अनेकदा प्रवास केला आहे. प्रत्येक प्रवासाच्या शेवटी थकव्याच्या जागी उरात भरभरून आलेल्या चैतन्याचा, तजेलदारपणाचा अनुभव मी घेतला आहे.

चोर्ला घाटात प्रवेशताच आधीच्या अनेक वेळच्या प्रवासाचे आठव मनात पिंगा घालू लागले. त्यात आदल्या रात्री पडलेल्या पावसामुळे झाडे-वेली आणि रस्ताही ओलेता झालेला होता. त्या आर्द्रतेचा शीतल स्पर्श शरीराला आलिंगत होता. डोळ्यांनाही गारवा थंडावत होता. परिसरात भरून राहिलेला वनस्पती-मातीचा ओलीत अवगुंठित झालेला गंध आत्म्याला डोलावणारा होता. खूप दिवसांनी, अपरिहार्यपणे का असेना, या सफरीवर निघालो याचा मनस्वी आनंद उचंबळून आला.

घाटातील वळणे पार करताना आपण कुठल्या तरी अनामिक आनंदप्रदेशात विहरत असल्यासारखे वाटत होते. घाट संपताच एका बाजूला पार त्या टोकापर्यंत खुलणारे आसमंत, डोंगरकड्यावरून एकदम तुटून विलग झाल्यासारखा दिसणारा खालचा वनराजीचा भाग, त्या सर्वांवर पसरून राहिलेली आत्ममग्न निळाई-- चोर्लाचे ते मनभावन रूप तसेच डोळ्यासमोर उलगडून राहिले. चोर्ला तसाच आहे. स्वागतशील. निमंत्रणाचे बाहू पसरून आनंद वाटू पाहणारा.त्या रमणीय प्रदेशात रमायला लागलो इतक्‍यात जोरदार गचका बसला.पायाखालच्या वास्तवाचे भान आणून देण्यास तो पुरेसा होता.गोव्याची हद्द संपून कर्नाटकाचे राज्य सुरू झाले होते.आता बेळगावला पोचेपर्यंत खड्ड्यांचे दणके खात, अनेक ठिकाणी रस्त्याचा शोध घेत जावे लागणार होते.

चोर्लाचा परिसर जितका गोंजारणारा,डोळ्यांना तृप्त करणारा आहे, त्याच्या नेमके विरुद्ध इथल्या रस्त्याचे चरित्र आहे.चोर्ला वर्षानुवर्षे आहे तसा आहे आणि रस्ताही तसाच, खड्ड्यात आणि मातीत रुतलेला, वाहन चालविणाऱ्यांची हाडे खिळखिळी करण्याचे आव्हान देणारा,नस्‌ न नस पिळवटून टाकणारा. त्याची सुरवात झाली होती.

मध्ये मध्ये खड्डे पडलेला, डांबर उखडलेला रस्ता पार करून कणकुंबीच्या टप्प्यात पोचलो. कणकुंबीचा रस्ता कायम खड्ड्यात हरवलेला असतो. आताही तसाच तो होता. त्यात नावीन्य नव्हते.या मार्गावर उतरलो, की कणकुंबीच्या तेवढ्या टप्प्यात खड्ड्याशी मुकाबला अपरिहार्य असतो.पण, जांबोटी काढून खानापूर फाट्याकडून बेळगाव फाट्यावर गाडी वळवली आणि रस्त्याचे जे रौद्र रूप सामोरे आले त्याने मी पार हबकून गेलो. खूप मागे पावसाळ्यात काही वेळा या रस्त्याने प्रवास केला होता. खंदकासारखे खड्डे आणि एकाच चाकोरीतून सतत वाहने हाकली गेल्याने चिखलाचे कधी ओले, कधी वाळलेले फत्तरासारखे उंचवटे अनुभवले होते.चिखलातून चाक पुढे सरकेनासे झाल्याने पायाने रेटा देऊन गाडी ढकलत इंच इंच रस्ता सर करण्याचा अनुभव माझ्या गाठीशी आहे.एकदा माझे मित्र डॉ. विठ्ठल ठाकूर यांच्या स्कूटरने आम्ही या मार्गाने गेलो होतो.तेव्हा संपूर्ण रस्त्याचीच खड्डे पडून चाळणी झाली होती.डांबरी असलेला हातभर तुकडा दिसला,की आम्ही "हा बघ, बघ, रस्ता चांगला आहे,' असे ओरडत, स्थितीची खिल्ली उडवीत,उपहास करीत तो प्रवास पूर्ण केला होता.तोवरचा तो सर्वांत वाईट अनुभव होता. यावेळचा अनुभव या सर्वांच्या वरताण ठरला.

खानापूर फाट्याकडून वळताच रस्त्याऐवजी चिखलाने स्वागत केले. पुढे चाललेल्या ट्रकने घातलेल्या चाकोरीतून सरकत राहिलो. ती निसरडी बनली होती.उतरणीवर दोनदा घसरून पडता पडता सावरलो. पुढच्या दहा किलोमीटरच्या टप्प्यात कधी घसरून पडेल ही भीती डोक्‍यात वागवीतच मार्गक्रमण करावे लागले. खरे तर मार्ग नव्हताच.चार पदरी वगैरे रस्ता करण्याचे काम काढल्याच्या खुणा दिसल्या. भारी यंत्रेही दिसली. रस्ता गायब होता. मोठा रस्ता करण्यासाठी आखलेल्या ट्रॅकमध्ये रोजच्या आणि नैमित्तिक वाहनांच्या वर्दळीने चाकोऱ्या निर्माण झाल्या आहेत. एखाद्या माळावर वाहनाच्या वर्दळीने मार्ग बनावा तशी स्थिती होती.त्यात पाऊस पडल्याने चिखल आणि निसरड झाली होती. बहुतेक चढाचा रस्ता असल्याने चाके जमिनीवर ठरत नव्हती.पाय टेकवावे तर चिखलात बरबटणे अटळ होते. तिथे चारेक वेळा निसरून पडताना वाचलो.इतका भयानक अनुभव या रस्त्याचा कधीही आला नव्हता.मला त्याची इतकी धास्ती वाटली, की त्या मार्गाने परतीच्या प्रवासाची कल्पनाला क्षणभरही मनात टिकली नाही.

या रस्त्याची स्थिती बेवारशी पडून सडलेल्या मृतदेहासारखी झाली आहे. गोवा आणि कर्नाटकाला जोडणारा हा महत्त्वाचा, जवळचा रस्ता आहे.वाहन रहदारीसाठी सोयीचा आणि इंधनाची मोठी बचत साधणारा आहे.पर्यायाने राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय टाळण्याचे तो माध्यम ठरू शकतो. कर्नाटकाच्या राज्यकर्त्यांनी सीमाभागातील मराठी भाषकांच्या तिरस्कारापोटी कायमच या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याची उपेक्षा केली आहे. गोव्याने स्वखर्चाने तो रस्ता बांधण्याचा आणि त्याची देखभाल करण्याचा दिलेला प्रस्तावही कर्नाटकी राज्यकर्त्यांना मानवला नाही. इतका पराकोटीचा द्वेष त्यांच्या ठायी सीमाभागाबद्दल धगधगतो आहे. त्यांचा विकासाचा कोरडा ठणाणा चाललेला असतो.सामान्य माणसांच्या किमान सोयी- समाधानाची पर्वाच त्यांना राहिलेली नाही. चोर्ला रस्त्याची परवड ही त्यांच्या असंवेदनशीलतेची, असहिष्णुतेचे आणि सडक्‍या मनाची कहाणी आहे.

रस्त्याची दुरवस्था माहीत असूनही मी अनेकदा तेथून प्रवास केला आहे. त्या निसर्गाने कधीच कद्रूपणा दाखवला नाही. तो नेहमीच मोहवतो. आपुलकीची साद घालतो.चोर्लातून जाताना निसर्गाच्या दातृत्वाने मन भारून जाते. रस्ता माणसाच्या दुष्टाव्याची कागाळी करीत व्यथित करीत जातो. निसर्गाच्या पवित्र गाथेत हा दुष्टावा कधी विराम पावतो, त्याची प्रतीक्षा आहे.

Monday, December 1, 2008

नैतिकतेचे ढोंग

मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी अखेर राजीनामा दिला. दहशतवाद्यांचा युद्धसदृश हल्ला होईपर्यंत आणि त्यात दोनेकशे निरपराधांना जीव गमवावा लागेपर्यंत राजीनामा द्यायला थांबण्याइतपत नैतिकता शिवराज पाटील यांच्यापाशी शिल्लक होती का, हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो. त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या कारकीर्दीत दहशतवाद्यांनी इतकी दहशतीची कृत्ये केली, की नैतिकता असती तर पाटलांनी याआधीच राजीनामा दिला असता. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, कॉंग्रेस पक्षांतर्गतही त्यांच्याबाबत नाराजीचा सूर मुखर झाला होता.त्यावेळी पक्ष श्रेष्ठींनी सांगितल्यास पद सोडायची तयारी त्यांनी दाखवली होती. आता "नैतिकतेचा ' आव आणणाऱ्या पाटलांची नैतिकता, स्वीकृत पदाबाबतची जबाबदारीची भावना, कर्तव्यनिष्ठा काय प्रतीची होती,ते त्याचवेळी स्पष्ट झाले होते. त्यांच्या राजीनाम्याचे उदाहरण देऊन आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी अशा स्वरूपाच्या प्रसंगाच्या वेळीही राजीनामा न दिल्याचे उल्लेख करून कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि पदाधिकारी कर्तव्यच्युतीच्या वृत्तीचा गौरव करीत आहेत. नैतिकतेच्या मूल्याला बाजारू आणि गल्लाभरू बनवीत आहेत. नैतिकतेच्या नावाने थोतांड मिरविण्याचा हा प्रकार अश्‍लाघ्य आहे.

देशांतर्गत सुरक्षिततेच्या तसेच दहशतवादी कारवायांना आला घालण्याच्या आघाड्यांवर सातत्याने आलेल्या अपयशाने कॉंग्रेस सरकारची नाचक्की झाली आहे. पाटलांचा राजीनामा हा त्या नाचक्कीतून काही क्षणासाठी तोंड लपविण्याचे साधन आहे. विरोधी पक्षही पाटलांच्या राजीनाम्याने खूष आहे. जणू राजीनामा मागणे आणि तो देणे यातच समस्यांची तोड आहे ! दहशतवादाला आळा घालणे, त्याच्या प्रतिकारासाठी सक्षम यंत्रणा उभारणे, ती कार्यरत ठेवणे ही सामूहिकही जबाबदारी आहे. गृह खाते सोपवलेल्या व्यक्तीचा त्यात प्रमुख सहभाग अपेक्षित धरलेला असल्याने यशापयशाच्या प्रसंगी प्रथम श्रेय अपश्रेय त्याचे मानले जाणेही साहजिक आहे. म्हणून बाकीच्या घटकांना स्वतःला पूर्णपणे अलिप्त धरता येणार नाही. तसे असते तर एका माणसाच्या राजीनामा देण्याने आणि त्याची जागा दुसऱ्याने घेण्याने प्रश्‍न सुटले असते. एका सरकारच्या जागी दुसरे सरकार आल्याने प्रश्‍न राहिले नसते. असे होत नाही. तिथे सामूहिक जबाबदारीच्या भूमिकेचा अवकाश असतो. तो मोकळा सोडून चालत नाही. तो मोकळा सोडल्याने किंवा ती भूमिका मनापासून स्वीकारली जात नसल्याने दहशतवादासारख्या शत्रूशी लढण्यासाठी एकसंमतीचे धोरण ठरत नाही. जी ठरतात त्यात फटी राहतात. त्याचा फायदा हितशत्रू घेत असतात.

पाटलाच्या राजीनाम्याने देशात असलेले आपल्याच शासन यंत्रणेविषयीचा असंतोषाचा, नाराजीचा प्रतिपक्षाकडून होणाऱ्या टीकेचा धुरळा खाली बसेल. पुन्हा आहे तसेच पुढच्या पानावर सुरू राहील.पाटलांच्या राजीनाम्याचे शस्त्र वापरून नैतिकतेचे आदर्श सांगणाऱ्यांनी त्यांच्या अपयशाची चिकित्सा या देशाच्या जनतेसमोर मांडली पाहिजे. दहशतवादाला प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी काय केले, काय करायला हवे होते, जे करायचे राहून गेले याचा कच्चा चिठ्‌ठा सादर केला पाहिजे.त्यांना पूरक असे अन्य घटकांकडून काय झाले किंवा झाले नाही, हेही स्पष्ट केले पाहिजे. राजीनामा मागणाऱ्यांनीही त्याची माहिती सरकारला विचारली पाहिजे.नाहीतर राजीनाम्यामागे राजीनामे येत जातील आणि समस्या, औषधोपचाराविना दाबून ठेवलेल्या आजारासारखी दिवसेंदिवस बळावत जाईल.राजीनाम्याबरोबर सगळे चिडीचूप होण्याची प्रथा समस्या सुटण्याच्या दृष्टीने उपकारक नाही.

शिवराज पाटील आपली जबाबदारी पेलण्यास असमर्थ, अपयशी ठरले, त्याचे अपश्रेय पक्षश्रेष्ठींचेही आहे. महत्त्वाच्या पदावर पक्षश्रेष्ठींनी एखाद्याची वर्ण लावण्याची विशेषतः कॉंग्रेसमधील घातक परिपाठही त्याला कारणीभूत आहे. त्याची नैतिक जबाबदारी पक्ष श्रेष्ठी स्वीकारणार नाहीतच, पक्षातील कुणाला त्याविषयी "ब्र' उच्चारण्याची हिंमतही होणार नाही. शिवराज पाटील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तरी लोकांच्या कौलाचा एकप्रकारे अनादर करून पक्षश्रेष्ठींनी त्यांना महत्त्वाचे गृह खाते दिले.निवडणुकांच्या माध्यमातून संसदेत पोचू न शकणाऱ्या एखाद्या अलौकिक कर्तृत्वाच्या व्यक्तीच्या ज्ञानाचा, अनुभवाचा देशाला उपयोग व्हावा, यासाठी त्यांना देश कारभारात सामावून घेण्याची तरतूद घटनाकारांनी करून ठेवली आहे. त्या तरतुदींचा वापर करून पाटलांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेण्याइतपत त्यांचे अपवादात्मक कर्तृत्व, पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावरची मर्जी, यापलीकडे काय ते देशाला गेल्या चार- साडेचार वर्षांत दिसले नाही. पक्ष श्रेष्ठींच्या मर्जीची किंमत देशाने किती चुकवायची?किमान ते अपेक्षेप्रमाणे जबाबदारी पार पडू शकत नाही हे वारंवार दिसून आल्यानंतर तरी पक्षश्रेष्ठींनी त्यांना पायउतार करण्याचे तारतम्य दाखवायला हवे होते. शेकडो लोक रक्तबंबाळ होईपर्यंत, अनेकांचे जीव जाईपर्यंत पाटलांना गोंजारत, त्यांचे लाड करण्याची आवश्‍यकता नव्हती. पक्षश्रेष्ठींच्या अंधभक्तीची कॉंग्रेसमधील प्रथा लोकशाही व्यवस्थेला आणि पर्यायाने देशहिताला बाधक आहे. नैतिकतेचे ढोल बडविणाऱ्यांमध्ये हे तथ्य स्वीकारण्याची हिंमत आहे का?

Saturday, November 29, 2008

थेट प्रक्षेपण किती योग्य ?

मुंबईत दहशतवाद्यांनी तीन दिवस थैमान घातले. शंभरावर निरपराध देशी - विदेशी नागरिकांच्या हत्या केल्या. हे दहशतवादी कृत्य नव्हे, युद्धच होते. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या आणि मरिन कमांडोजनी कारवाई करून दहशतवाद्यांचा हैदोस संपविला. तरी तीन दिवस साऱ्या देशाला अतिशय तणावाचे आणि अस्वस्थतेचे गेले.

दहशतवाद्यांचा आजवरचा हा मोठा हल्ला मानावा लागेल. नव्या तंत्रज्ञानामुळे, विशेषतः दूरचित्रवाणीच्या माध्यमातून मुंबईतील थरारनाट्य सविस्तर पाहता आले. सर्वच वाहिन्यांवर या उत्पाताचे थेट प्रक्षेपण सुरू होते. वाहिन्यांचे पत्रकार, अन्य तज्ज्ञ यांची निवेदने, भाष्ये सुरू होती. जोडीला घडत चाललेल्या हल्ल्याची, प्रतिकारवाईची दृश्‍ये दिसत होती. बहुतेक वाहिन्यांनी संयमाने वार्तांकन केले.त्या त्या क्षणाला काय चालले आहे, याची माहिती समजत होती.तंत्रज्ञानातील प्रगतीचा हा लाभ आहे. तरी, दहशतवाद्यांच्या विरोधात चाललेल्या कारवाईचे थेट चित्रण दाखवणे योग्य आहे का,हा प्रश्‍न वारंवार मनाला बोचत होता.

हल्ला करणारे पूर्वनियोजन करूनच तो करणार. सुरक्षा, गुप्तहेर यंत्रणेतील त्रुटींचा ते फायदाही घेणार. हे सारे गृहीतच धरायला हवे. अशा प्रकारच्या घटनांनंतर लक्षात आलेल्या त्रुटी,उणिवा आदी दूर करून आपल्या यंत्रणा अधिक बळकट, कार्यक्षम बनवायला हव्यात. त्यातल्या संभाव्य फटी हेरून त्या वेळीच बुजवायला हव्यात. अधिक सावधानता बाळगायला हवी. हे सारे खरेच आहे. पण, या सर्व स्तरांवर वावरणारी माणसेच असतात. त्यामुळे कुठलीही व्यवस्था ही शंभर टक्के परिपूर्ण असू शकणार नाही, हेही समजून घ्यायला हवे. कुठेतरी एखादा कच्चा दुवा राहून जाऊ शकतो.त्याचा नेमका फायदा विध्वंसक घटक घेण्याचा प्रयत्न करणार. हे संकट एकाएकी समूळ नष्ट होणार नाही. अशा उपद्रवाचा मुकाबला करण्यासाठी जिथे जिथे शक्‍य असेल, तिथे तिथे कुठलीही फट राहणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येकानेच आपली मानायला हवी. प्रसार माध्यमे त्याला अपवाद नाहीत. साऱ्या जगातील भल्याबुऱ्याचा पंचनामा करणाऱ्या माध्यमांनीही आपल्यावरील जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी आणि ती त्यांच्या कृतीतून दिसायला हवी.

पळणाऱ्याची एक वाट असते, शोधणाऱ्याला हजार वाटा धुंडाळाव्या लागतात. माणसांच्या नृशंसपणे हत्या करणारे तीस चाळीस असेल,तरी त्याची नेमकी माहिती अशा हजार वाटा धुंडाळल्यानंतर कळते. मूठभर लोकांनी देशाला ओलिस धरले ,अशी संतापाची, आपल्याच यंत्रणाविषयी असंतोषाची भाषा बोलायला सोपी असते. घात करण्याचे नियोजन करून आलेल्यांच्या उद्देश, तयारीचा त्यांच्याविरुद्ध कारवाई करताना अंदाज नसतो. त्यांच्या हालचालींचा, त्यांनी चालविलेल्या कृत्यांचा माग काढीतच चढाईची कारवाई करावी लागते. मुंबईत दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई चालली असताना अनेक वाहिन्या त्या कारवाईचे थेट चित्रण दाखवीत होत्या. आपल्या देशातील करोडो सामान्य माणसे, नेते पुढारी ते बघत होते. तसे ते हल्लेखोरांनाही बघणे शक्‍य होते. म्हणजे एक प्रकारे हल्लेखोरांना त्यांच्याविरुद्ध चाललेल्या कारवाईची माहिती मिळण्याची सोय आयतीच उपलब्ध झाली असेल.अशी माहिती मिळाल्यावर ते स्वस्थ बसले असतील का? त्या माहितीचा उपयोग त्यांनी आपल्या जवानांविरुद्ध केला असेल. त्यांच्या कारवाईतून निसटण्याचे मार्ग शोधण्यासाठी केला असू शकेल. किंवा बिथरून जाऊन ओलिस धरलेल्यांबाबत ते अधिक नृशंसही बनले असतील. अशा अनेक शक्‍यतांना वाव आहे. वाहिन्यांचे हे प्रक्षेपण हल्लेखोरांना साह्यभूत आणि आपल्या जवानांना अडचणीचे ठरले असण्याची शक्‍यता आहे.

कारगिल युद्धाच्या वेळी सैन्यदलाने स्पष्ट निर्देश देऊनही वार्तांकनासाठी गेलेल्या एका वाहिनीच्या वार्ताहराने भारतीय सैनिकाच्या एका मोर्चाकडील दृश्‍ये दाखवली होती. ती दाखवल्यापासून अर्ध्या तासात तिथे पाकिस्तानी तोफांचा मारा सुरू झाला होता आणि तो मोर्चा भारतीय सैन्याला तिथून हलवावा लागला होता. वाहिनीवरची ती दृश्‍ये पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ते "लोकेशन' शोधून काढले होते आणि त्यानुसार "टारगेट' निर्धारित केले होते,अशी माहिती एका लेखात त्यावेळी वाचल्याचे मला आठवते.

मुंबईच्या हल्ल्याच्या वेळी किंवा भविष्यातील अशा प्रसंगी वाहिन्यांवरून होणाऱ्या थेट प्रक्षेपणाचा उपयोग आपल्या शत्रूंना अधिक होऊ शकतो. आपल्या संरक्षकांना त्याची अडचण अधिक होऊ शकते. किंबहुना त्यांची स्वतःची सुरक्षितता धोक्‍यात येऊ शकते. देश-प्रजेच्या संरक्षणासाठी प्रसंगी प्राणाहुती देण्यासही आपले सैनिक तयार असतात,याचा अर्थ आपण वा माध्यमांनी त्यांच्यासाठी धोक्‍याचे सापळे निर्माण करण्यास प्रत्यक्षाप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरावे,असा नाही.ते समर्थनीय नव्हे. लोकांना काय चालले त्याची माहिती देण्यात वावगे काही नाही. ती देताना काही तारतम्य आणि संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे.नव्हे ते अपरिहार्य आहे. हे प्रसंग म्हणजे क्रिकेटचे सामने अथवा कसले कसले "आयडॉल्स'चे कार्यक्रम नव्हेत. यासाठी, कधीही असा प्रसंग उद्‌भवल्यास थेट प्रक्षेपणावर शासनाने काही निर्बंध घालावेतच.

Friday, November 28, 2008

बाबूजींचे निधन

रवींद्र भट यांचे निधन झाल्याचे थोडे उशिराने कळले. या वृत्तावर विश्‍वास ठेवणे काही क्षण फार जड गेले. वर्षभरापूर्वी भेटले होते. आजार, वाढते वय याचे शरीरावर परिणाम दिसत होते, मनाचा तजेला तसाच कायम होता. चालताना, हवेहून हलके असल्यासारखे तरंगत जात असल्यासारखे वाटायचे. त्या दिवशी त्यांना कुठे तरी जायचे होते. गप्पांना वेळ नव्हता. "त्या तिथे मी राहायला आलो,' असे सांगत निघून गेले. तेव्हाही ते तरंगत चालल्यासारखेच वाटले. ते गेल्याचे कळले,तेव्हा ती तरंगत चाललेली पाठमोरी मूर्ती डोळ्यांसमोरून तरळत गेली !

1994 मध्ये पणजीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले. त्यावेळी रवींद्र भट पहिल्यांदा भेटले. वयाने, अनुभवाने, कर्तृत्वाने खूपच मोठे, तरी आमच्याशी क्षणात अंतरंग मैत्री जुळवली.मनींची रहस्ये आमच्याकडे मोकळेपणाने उघडी केली, जसे युगानयगीचे मैत्र असावे. त्या क्षणी ते आमचेही "बाबूजी' झाले. ते नाते शेवटपर्यत त्यांनी जपले. ते असे अवचित निघून गेले; खरेच वाटत नाही !

वात्सल्यमूर्ती राम शेवाळकर पणजीच्या संमेलनाचे अध्यक्ष झाले. गोव्यात आले, की हायफाय व्यवस्था सोडून आम्हा "पोरांत' रमणारे, मायाळू नारायण सुर्वे त्यानंतरच्या परभणी संमेलनाचे अध्यक्ष झाले. बाबूजीनाही अध्यक्ष झालेले पाहायची इच्छा होती. ती फलद्रूप झाली नाही. आता तर तो विषयच संपला.

बाबूजींनाही अध्यक्ष व्हावेसे खूप वाटत होते.अहमदनगरच्या संमेलनात आपण अध्यक्ष होऊ, असे ते म्हणाले होते. तो योग जुळून आला नाही. अध्यक्ष होण्याचा मार्ग तसा सरळ नसतो. वाटेत काटे पेरणारे अनेकजण असतात. अनेकदा ते अगदी जवळचेच निघतात. बाबूजींना असाच काही अनुभव आला. त्यातला काही भाग त्यांनी सांगितला होता. काही बाबतीत त्यांनी मौन पाळले. त्यांना आलेला अनुभव त्यांना नाउमेद करून गेला, मन घायाळ करून केला; इतका,की नंतर त्यांना त्या विषयात स्वारस्य राहिले नाही. पुढे जेव्हा कधी भेटले, तेव्हा एक दोनदा हा विषय त्यांच्याकडे काढला होता. त्यांनी काही बोलणेच टाळले.

बाबूजींनी संमेलनाचे अध्यक्ष होणे काही पुणेकरांना नको होते. पुण्यातील माझ्या एका मित्राला मी विचारले होते, " साहित्याच्या दृष्टीने अध्यक्ष होण्याची पुरेशी साधना त्यांच्यापाशी असताना त्यांना विरोध का? त्यांच्याविषयी मला अनेक ठिकाणी लोकांमध्ये खूप आदराची भावना दिसते आहे. त्यांना मानणारे लोक मी पाहिले आहेत.'

त्याने इतकेच सांगितले, " पुण्याबाहेर त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. मानही आहे. पुण्यात त्यांना विरोध आहे.'

त्या विरोधाचे कारण काही त्याने सांगितले नाही. त्या न सांगण्यात काही दडले असावे.

अर्थात संमेलनाचे अध्यक्ष होता न आल्याने बाबूजींना किंवा त्यांच्या साहित्य साधनेला काही उणेपणा आलेला नाही. अशा प्रकारच्या सन्मानाच्या निवडी या नेहमीच केवळ गुणवत्तेला कौल देणाऱ्या असतात, असे नाही.अशा प्रक्रियांत काही फटी असतात. त्यांच्या वापराच्या शक्‍यतांचा कधी कधी एखाद्याच्या आवडी-नावडीनुसार अवलंब होतो.त्यातूनही एखादा बाबूजी असा सन्मानाला वंचित राहून जातो.

संतांचे चरित्र, वाङ्‌मय हाच व्यासंगाचा विषय करून वाङ्‌मयनिर्मिती करणारे बाबूजी हे मराठीतले एकमेव साहित्यिक असावेत, असे मला वाटते. संतांनी आपणाला जीवनादर्श दिले.समाजाचे आध्यात्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनही समृद्ध केले. त्यांच्या काळात नव्हे,तर आजही. वर्तमानकाळातही त्यांच्या जीवन-साहित्याची संबद्धता ठायी ठायी जाणवते.नव्याने परिशीलन करून तो अमूल्य ठेवा बाबूंजीनी समाजापुढे प्रस्तुत केला.पांडुरंगाला घास घेण्यासाठी नाम्याने केलेल्या आर्जवाच्या आंतरिक तळमळीने बाबूजींनी हे नवसर्जन केले. इंद्रायणी काठीचे ते आर्त आता कायमचे अंतरले !

Monday, November 24, 2008

केळेकरांना ज्ञानपीठ

रवींद्र केळेकर यांना प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.त्यांनी मराठी, हिंदी आणि कोकणीत लेखन केले असले,तरी ज्ञानपीठाचा मान त्यांना त्यांच्या कोकणी साहित्यासाठी मिळालेला आहे. संस्कृत साहित्यिक सत्यव्रत शास्त्री हेही या पुरस्काराचे संयुक्त मानकरी ठरले आहेत. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार केळेकर यांच्या रूपाने गोव्याला प्रथमच लाभत आहे. सर्व गोमंतकीयांना आनंद देणारी ही घटना ठरायला हवी. गोव्याचा गौरव झाल्याची भावना सर्वत्रच उचंबळून यायला हवी. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. त्याचे कारण गोव्यातील भाषावाद आणि त्यात केळेकर यांची पक्षपाती भूमिका. भाषावादाने आणि केळेकर यांच्यासारख्या गांधीवादी विचारवंत म्हणवणाऱ्याने मराठीबाबत घेतलेली दुराग्रही,नकाराची भूमिका, यांमुळे गोमंतकीय मानस दुभंगले आहे.गोमंतकीयांची दोन गटात विभागणी झाली आहे.त्यामुळेच केळेकर यांच्या सन्मानाबद्दल सार्वत्रिक आत्मीयतेची भावना दृग्गोचर होत नाही.

अगदी अलीकडे केळेकर यांना भारत सरकारचा पद्‌मभूषण सन्मान जाहीर झाला.तेव्हा माझा एक मित्र मला म्हणाला,"जे लोक कोकणीला भाषा म्हणून मान्यता मिळवू शकतात, ते काहीही करू शकतात!

'नकाराची आणि विरोधाची भूमिका घेऊन कोकणीवाद्यांनी समाजात जो दुरावा आणि कडवटपणा निर्माण केला आहे, त्याची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होय.जोवर या भूमिकेत बदल होत नाही,तोवर हा दुरावा आणि कडवटपणाही दूर होणार नाही, याचेही सूचन त्या प्रतिक्रियेत आहे.केळेकर यांच्या सन्मानाने कोकणीवाद्यांच्या गोटात आनंदाचे उधाण आले आहे. पण हा गोव्याचाच सन्मान आहे, या भावनेने सारे मतभेद विसरून आनंदाचे सार्वत्रिक भरते आल्याचे दिसत नाही, हे याच दुभंग स्थितीचे निदर्शक आहे.

केळेकर यांनी भरपूर साहित्य निर्मिती केली. आचार्य काकासाहेब कालेलकर यांचे सान्निध्य आणि वर्ध्याच्या आश्रमातील संस्कार यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडले, असे सांगितले जाते. महात्मा गांधींचे विचार त्यांना प्राणभूत, असेही मानले जाते. गांधीविचारांचे दर्शन, आजच्या युगातही असलेली त्यांची यथार्थता सांगणारे लिखाण त्यांनी केले. गांधीविचारावर भाष्य करणारी अधिकारी व्यक्ती असा लौकिक त्यांनी प्राप्त केला. कोकणीला भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी या भाषेतील साहित्य समृद्ध करण्याचे ध्येय त्यांनी उराशी जपले. आपल्या कोकणीतील स्वतंत्र लेखनाने, महाभारताच्या कोकणीत केलेल्या अनुसर्जनाने, सर्जकाच्या प्रेरणा -ऊर्मीविषयीच्या चिंतनशील लेखनाने त्यांनी कोकणीचे साहित्य समृद्ध करण्यात आपला मोठा सहभाग दिला.कोकणीच्या संदर्भात त्याचे भाषाविषयक कार्य दुर्लक्षिण्याजोगे निश्‍चित नाही.या सर्वांचाच विचार करून त्यांना ज्ञानपीठ दिले गेले असेल. पुरस्कारासाठी निवड करणाऱ्यांनी तेवढ्यापुरताच विचार केलेला असावा. परंतु गोव्यातील भाषावादाचे संदर्भ वगळून त्यांच्या साहित्याची चिकित्सा करणे गोमंतकीयांना शक्‍य नाही. विशेषतः ते गांधीविचारांचा पुरस्कार करणारे आणि त्याविषयी प्रचंड आत्मगौरव बाळगणारे असल्याने त्यांच्या मानाचे मूल्यांकन निखळ साहित्याच्या अनुषंगाने करता येणार नाही. कारण त्यांच्या लेखनातही त्यांनी गांधीविचारांशी प्रतारणा केलेली आहे.

गांधींनी सत्य, अहिंसा, सहिष्णुतेचा विचार सांगितला आणि आचरलाही. मानवजातीवर प्रेम करायला सांगितले, तिरस्कार नव्हे. केळेकर यांनी मराठीचा द्वेष केला. गोव्यात मराठी हवी म्हणणांना चाबकाने फोडले पाहिजे ,अशा शब्दांत मराठीविषयी, इथल्या मराठी भाषकांविषयी गरळ ओकली. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी ही प्रतारणा नव्हे काय? ज्या भाषेने इथली संस्कृती जपली आणि जिच्या स्तन्यावरच केळेकर आणि त्यांच्यासारखे कोकणीतले अनेक म्होरके आणि पुढारी मोठे झाले, नामवंत बनले, त्यांनी मराठीविषयी गोमंतकीयांच्या मनात तिरस्कार पेरण्याचे, रुजविण्याचे काम केले. गांधीविचारांची झूल पांघरून तिरस्काराने अनेकांचे हृदये कलुषित केली. इतकी, की पुढची अनेक वर्षेही गोमंतकातील एका समुदायाच्या मनांतून तिरस्काराची बिजे निघता निघणार नाहीत. मांसाला चिकटलेल्या निखाऱ्यासारखी ही पेरणी झालेली आहे.

ज्ञानपीठ मिळाल्याने आता तरी तिला भाषा मानावी, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातल्या काही विद्वानांनीही असेच मत प्रकट केले आहे. वर्षभरापूर्वी गोवा कला अकादमीच्या बैठकीत चर्चेच्या ओघात कोकणीचा विषय निघाला होता. रोमन कोकणीचे पुरस्कर्ते, त्रियात्रिस्ट आणि माजी सभापती तोमाझिन कार्दोज तिथे उपस्थित होते. कोकणीला साहित्य अकादमीची मान्यता फसवणुकीने मिळविण्यात आल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते.कोकणीचे एक महान नेते उदय भेंब्रे यांनी त्यांना उत्तर देण्याचा निःशक्त प्रयत्न केला.तेव्हा, कोकणीची साहित्य परंपरा सांगताना रोमन कोकणी लेखक आणि त्यांच्या लेखनाचे संदर्भ दिल्याचे ठासून सांगत तोमाझिन यांनी त्यांना निरुत्तर केले होते.1985 ते 1987 या काळात झालेल्या भाषिक आंदोलनात, ज्या ख्रिश्‍चन समाजाच्या पाठबळावर कोकणीवादी जिंकले, त्यांचीही अशीच दिशाभूल करण्यात आली होती. तीही फसवणूक त्या समुदायाला आता कळून चुकली आहे. कोकणी चळवळ अशी मोठ्या असत्यावर आणि फसवणुकीवर आधारलेली आहे.कोकणी चळवळीतले अध्वर्यू असलेल्या केळेकर या असत्याच्या पापात वाटेकरी आहेत. हे सारे असत्य गांधींनी सांगितलेल्या सत्याच्या विचारात बसत नाही. केळेकर यांना ते चालले, तेव्हा त्याही तत्त्वाचा त्यांनी पाडावच केला.

काही महिन्यांपूर्वी उदय भेंब्रे यांनीच कोकणीचे प्रमाणीकरण होण्यासाठी आणखी पन्नास वर्षे जावी लागतील, असे विधान केले होते. त्यासाठी आणखी तीन पिढ्या बरबाद झाल्या, तरी त्याला इलाज नाही, असे उत्तरही त्यांनी दिले होते. जी भाषा प्रमाणरूपात येण्यासाठी पाच दशकांचा काळ जावा लागणार आहे, ती एका पुरस्काराने एका रात्रीत जागतिक दर्जाची भाषा कशी बनू शकते? गांधीविचारांत याचे काही उत्तर असल्यास, त्याचा शोध घ्यावा लागेल; मात्र केळेकरी विचारधारेत त्याचे उत्तर सापडते.

पंचवीसेक वर्षांपूर्वी केळेकर यांनी"नवप्रभा' दैनिकातील आपल्या स्तंभात असे लिहिले होते,"मराठी गोव्याची भाषा आहे,तर बा. भ. बोरकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार का मिळाला नाही?'

एका भाषातज्ज्ञांने मांडलेला हा तर्क आहे.एखादी भाषा ही भाषा आहे की नाही हे भाषिक निकषवार नव्हे, तर पुरस्कारांच्या निकषावर ठरते. आणि पुरस्कार कसे मिळतात, याची अनेक उत्तरे अनेकांना ठाऊक असतात ! केळेकर यांना लागोपाठ, लगबगीने दिल्या गेलेल्या पुरस्कारांमागे, सन्मानांमागे असे काही रहस्य नसावे, अशी आमची,गांधीविचारांना स्मरून, समजूत आहे.
-------पणजी----

Wednesday, November 19, 2008

निचरा

पणजी ः दोन दिवसापूर्वी अकस्मात पाऊस झाला. त्या आदल्या संध्याकाळी काही टपोरे थेंब आकाशातून सांडले होते. वातावरणात उकाडा खूपच होता. रात्रीची झोपही आळसावून लांब थांबल्याचा अनुभव दोन रात्री आला. तो ताजा होता. अंगावर पडलेल्या त्या काही थेंबांनी पावसाच्या अवेळच्या फेरफटक्‍याची आपल्या परीने खरे तर कल्पना दिली होती. लक्षात किती जणांच्या आले कुणास ठाऊक ? रात्र सरताच तेही विस्मृतीत गेले. पुन्हा लक्षात राहिला तो हैराण करणारा उकाडाच.

आमच्या गोव्याला अशा उकाड्याची नवता नाही. अगदी कडाक्‍यांच्या थंडीच्या दिवसातही नको जीव करणारा उकाडा अनेकदा अनुभवावा लागलेला आहे. आता तर जागतिक तापमानच बदलते आहे. वातावरण बदलते आहे. त्यामुळे असे उकाड्याचे दिवस आणि मोसम आता नेहमीच असतील कदाचित !

पाऊस पडला आणि छान वाटले. खरे तर मराठी गीतांचा एक कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी बाहेर पावसाची सर लागली. आत "आंतर्बाह्य काव्यानंद' (कार्यक्रमाचे शीर्षक) आणि बाहेर जलधारा ! छानच सुयोग जुळून आला. शरीर-मनाला आतून बाहेरून सुखावणारा. त्या तेवढ्याशा पावसाने बाहेरच्या उकाड्याचा निचरा झालाच, घामेजून जाणाऱ्या शरीरालाही शीतळतेचा स्पर्श झाला. साहजिक मनालाही तजेला आला.

पाऊस अवचित कसा काय आला ?

या प्रश्‍नाची वैज्ञानिक उत्तरे अनेक असतील. दूर सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे इथपासून ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे ऋतुचक्र विस्कळित झाले आहे, इथपर्यंत अनेक कारणांचा त्यात समावेश असू शकेल.

जीवन हे गुंतागुंतीचे असते. आता नव्या जागतिक व्यवस्थेत आणि नव्या जीवनशैलीमुळे हे गुंते वाढले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव, अडचणी, व्यत्यय, बरीवाईट स्पर्धा यामुळे माणसाची मानसिक कोंडी होण्याचे प्रसंग, वेळ त्याची वारंवारता वाढलेली आहे. त्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडेनासा होण्याची स्थिती अधिक घनदाटली आहे. अशा वेळी कोंदटलेपण आपले सारे मन आणि आपला अवकाश व्यापून राहते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मन मोकळे करणे अपरिहार्य बनते.त्याची निकड इतकी अटीतटीची असते, की आपल्या हक्काचे माणूस, मित्र नाही भेटला तर कधी कधी अनोळखी माणसापुढेही मनातले भडाभड ओकायला होते.त्याचा वेळ प्रसंगही कुठलाही आणि कसलाही असू शकतो. असे अनुभव आपण स्वतः अनुभवले असतील किंवा कुणाला तरी अशा तऱ्हेने मोकळे होताना बघितले असेल.मनातल्या कोंदटलेपणाचा निचरा झाला की मग माणूस शांत होते.ती शांतता मिळविणे अगत्याचे होते, तेव्हा एरव्हीचे शिष्टाचाराचे,आपल्या रुबाब, प्रतिष्ठेचे काही संकेतही डावलले जाऊ शकतात.

माणसाच्या हस्तक्षेपामुळे असेल किंवा नैसर्गिक स्त्रोतांच्या अनिर्बंध वापरामुळे असेल, आवश्‍यक पथ्ये पाळण्याचे टाळून केलेली निसर्ग संपत्तीची लूटमार यामुळे असेल विश्‍वाचे मन आणि अस्तित्व कोंदटून गेले आहे. त्याचे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यालाही निचरा करणे अपरिहार्य बनले आहे. त्यामुळे कधी अवेळच्या पावसाच्या रूपाने कधी वादळ- सुनामीच्या रूपाने तोही कोंदटलेपणातून मोकळा होऊ पाहतो आहे ! त्याने तो शांत होणार की अधिक अशांत बनून मानवजीवनात कायमची अशांती पेरणार आहे ?

प्रश्‍न मोठा चिंताजनक आहे.

Tuesday, October 28, 2008

शुभ दीपावली !

दिवाळीचा उत्साह ओसंडून आला आहे.
महागाई,मंदी, हिंसाचार, भ्रष्टाचार, अनाचार ... आदींच्या काळ्या सावल्यांचे थैमान सुरू आहेच. त्याने शरीर-मन थोडे बिचकल्यासारखे झाले आहे, थबकलेले नाही. दिवाळीसारख्या सणांमध्ये असे बळ असते, की काय नकळे!

शुभेच्छांची देवाणघेवाण जोरात आहे.मोबाईलसारख्या सेवांमुळे त्यांची माध्यमे वाढली आहेत. त्या प्रमाणात ही देवघेवही वाढली आहे.

आकाशदिवे, नक्षत्रे, लुकलुकणाऱ्या बल्बांच्या माळा यांच्या माध्यमातून प्रकाशाची आरास सुरू आहे. विश्‍वामित्राने चिडून जाऊन म्हणे एकदा प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रण केला होता. तो तडीस गेला नाही. दिवस मावळताच आता विद्युत्‌दीपांच्या आराशींमुळे नक्षत्रलोकच धरतीवर उतरल्याचा भास होऊ लागतो आहे! तेवढ्यापुरती एक प्रतिसृष्टी सध्या भासमान होत आहे.

शुभेच्छांची देवघेव, प्रकाशदीपांची आरास मन खुलविते आहे. हे बाह्योपचार आहेत.त्याने दर वर्षी जाळले जाणारे नरकासुर एकदाचे भस्मीभूत होऊन जातील, उजळणाऱ्या आसंमताखाली माणसांच्या वाटा निर्विघ्न होऊन कायम प्रकाशमान होतील, असे नाही. त्यांच्या पावलापुढचा काळोख संपून जाईल किंवा नव्याने त्या पावलांना काळोख घेरणार नाही, असेही नाही. निर्माण केलेली नरकासुराची प्रतिमा जाळता येते, नेमानेच ती जाळलीही जाईल, ज्यांच्या मनांतच नरकासुर वसतीला आला आहे, त्याला तिथून कोण आणि कसे हाकलून लावणार आहे? ते जिवंत "नरकासुर' जाळले जाणार नाहीत. त्यातल्या एखाद दुसऱ्या "नरकासुरा'चा बंदोबस्त झाला किंवा त्याची सद्दी संपली, तरी त्याची जागा घ्यायला नवे नवे "नरकासुर' समाजात तयारच आहेत. ती स्थिती सहजी बदलणारी नाही. बदलू नये, अशा तजविजीत कायम गुंतलेले "मोठे नरकासुर'ही आहेतच. हे सर्वच जण सामान्य जनांचे जगणे असह्य,अडचणीचे करीत आहेत. त्यांची चलती असेतोवर सामान्यांच्या जीवनात विपदा आणि दुःख हे राहणारच आहे. सद्‌गुणांची आणि त्याची कास धरणाऱ्यांची उपेक्षा, अवहेलना होत राहणार आहे. दुराचाराची त्यावर वरताण सहन करावी लागणार आहे.त्याचा ताप आणि वेदना सोसावी लागणार आहे. निराश करणारी, मनोधैर्य खच्ची करणारी ही परिस्थिती आहे. ही स्थिती टाळून जाता येणार नाही.तिला सामोरे जातच जीवनाची लढाई पुढे नेणे अपरिहार्य आहे. दिवाळी म्हणूनही साजरी करणे अगत्याचे आहे. बाह्योपचारांनी लगेच स्थिती पालटणार नाही. ते मनापासून केलेले जातात.ते मनोरम आहेत. म्हणून त्यांचा आदर आणि स्वीकार करण्याचे अगत्यही राहते.

दिवाळीची एक ज्योत मी माझ्या मनात लावतो. तिचा प्रकाश बाहेर फाकणार नाही. कुणाला तो दिसणार नाही. सभोवती सगळे निराश करणारे आहे. त्याचे प्रतिबिंब माझ्या मनात पडून माझे अंतर काळवंडून जाण्याचा जाण्याचा धोका आहे. त्याच्या प्रतिक्रियेपोटी ते नैराश्‍याच्या काळोखात हरवून जाण्याची भीती आहे. त्याचा सामना करण्यासाठी तिथला प्रकाश प्रखर,तेजोमय राहायला हवा. विपरित स्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रतिकाराचे बळ आणि मांगल्यावरील विश्‍वास दृढ राहायला हवा.मनाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी ही ज्योत आहे.तशी ज्योत आपल्या प्रत्येकाच्या मनात उजळावी, तेवत राहावी, हीच माझी शुभेच्छा !

Tuesday, October 21, 2008

नरकासुर

दिवाळी आठवड्यावर आली आहे. ती साजरी करण्याची तयारी सुरू आहे. "तयारी'चे प्रकारही आता वाढले आहेत. दिवाळसणाची चाहूल लागली, की लहान थोरांचा उत्साह ओसंडून वाहू लागायचा. पोहे करायची तयारी सर्वांत मोठी असायची. भात उबविण्यापासून घरोघरी जमून पोहे बनविण्यासाठी ते कांडायचाही मोठा उत्सव असायचा. जिथे असे कांडणे होत नसे किंवा शक्‍य नसे तिथे "लाठी'वर पोहे कांडणाऱ्याचा शोध सुरू व्हायचा. त्याच्याकडे "नंबर' लावायचाही उत्साहाचा कार्यक्रम व्हायचा. सगळ्यांना सांगत, गाजावाजा करीतच तो पार पडला जायचा. नंतर भातकांडपाच्या गिरणीवर पोहे कांडपाची मशिने लागली. तरी, उत्सवाचे आणि उत्साहाचे मशिनीकरण झाले नाही. श्रम, पोहे कांडपाच्या निमित्ताने एकत्र जमणे, त्यानिमित्ताने सुखदुःखाच्या चार गोष्टी करणे, प्रपंचासंबंधी हितगुज साधणे हे कमी झाले. पण पोहे कांडायला जाण्याचा उत्सव संपला नाही. नंतर बाजारात तयार पोहे मिळू लागले आणि तयारीचा हा एक उत्सव लुप्तच होऊन गेला. पोह्याच्या जोडीने घराघरांत तयार केल्या जाणाऱ्या तिखट गोड पदार्थांचा प्रपंचही आवरला गेले. ते सारेच पदार्थही बाजारात तयार मिळू लागले.

उत्सवाचा आणि उत्साहाचा दुसरा मोठा घटक होता, तो आकाश कंदील तयार करण्याचा. त्याच्यासाठी रंगीत कागद आणण्यापासून घरात "खळ' करून प्रत्यक्षात तो साकारेपर्यंत अनेक दिवस आबालवृद्धांची मोठी धांदल चाललेली असायची. आता हव्या त्या प्रकारचे, हव्या त्या रंगसंगतीचे, वेगवेगळ्या किमतीचे आकाश कंदील, नक्षत्रे सारेच तयार मिळू लागले आहे. दिवाळसणाचे वातावरण भारून टाकणाऱ्या तयारीचे हे दोन घटक आता दिवाळसणाच्या एकूण कार्यक्रमातून हद्दपार झाले आहेत.ज्यांनी या जुन्या वातावरणातील खुमारी अनुभवली असेल, त्यांच्या मनात निश्‍चितच ते लुप्त झाल्याची रुखरुख घर करून राहिली असणार.

आता असा उत्साहाचा नवा घटक अवतरला आहे. त्याने दिवाळसणाच्या वातावरणाचा बराच मोठा अवकाश व्यापलेला आहे. तो आहे नरकासुराच्या प्रतिमा बनविण्याचा, त्या मिरविण्याचा, त्यांच्या स्पर्धा घेण्याचा. कधी कधी या नरकासुरांनीच दिवाळी व्यापली आहे, असे वाटावे, इतके या कार्यक्रमाचे आणि तद्‌नुषंगिक "उप-कार्यक्रमां'चे प्रस्थ वाढले आहे.

ठिकठिकाणी नरकासुर उभे करण्याचे काम सुरू झाले आहे. व्यक्ती, मंडळे, संस्था त्यात व्यस्त झाल्या आहेत. दरवर्षीचे हे दृष्य नव्याने, दमदारपणे गावोगावी, गल्लोगल्ली दिसू लागले आहे.

नरकासुर वध हा सत्याचा असत्यावरील विजय, दुर्गुणांवरील सद्‌गुणांचा,अपप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय मानला जातो. दिवाळी या विजयाचा सण आहे. दर वर्षी आपणच नरकासुर तयार करतो, त्याचा वध करतो, विजयोत्सव साजरा करतो. हे सारे प्रतीकात्मक आहे, हे खरे आहे. परंतु समाजाची एकंदर दशा पाहिली, त्याच्या वाटचालीची दिशा पाहिली,तर मन शंकाकुल होते. दरवर्षी मारूनही पुनःपुन्हा नरकासुर उभा राहतो आहेच. तो मरत नाही किंवा विजय मिरविण्यासाठी त्याला पुरते मारले जात नसावे! अवशिष्टातून पुन्हा तो आपला आकार धारण करवतो. भरपूर मिरवून घेतो.दिवाळीतल्या विजयाचे प्रतीक मागे पडले आहे, निस्तेज झाले आहे, नरकासुर आपल्यावर भारी पडतो आहे, असे वाटण्याजोगी स्थिती जागोजागी आढळते आहे. तशा घटना घडत आहेत. त्यातून नरकासुर आपल्या मानगुटीवर आरूढ होत आहे. त्यावर आपले नियंत्रण येत नाही तोवर नरकासुर वध अधुराच राहणार आहे. म्हणूनच जागोजागी नरकासुर उभे राहताना पाहून वाटते, आपण प्रकाशपूजेऐवजी अपप्रवृत्तीच्या नरकासुराचीच पूजा बांधण्यात तर गुंतलेलो नाही ना ?

Sunday, October 12, 2008

गांगुलीचे दुःख

सौरव गागुंलीने परवा क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे जाहीर केले.ज्या वर्तमानपत्रात त्याची याविषयीची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे, तिथे मुलाखत दिली नसल्याचा त्याचा खुलासाही छापून आला आहे.अनौपचारिक वार्तालापाच्या वेळी बोलताना ते ऐकणाऱ्या उत्साही पत्रकाराने आपल्या पत्रात त्याला प्रसिद्धी देऊन टाकली. त्या पत्रकाराने याबाबतीत व्यावसायिक संकेत पाळले नाहीत, हे जेवढे खरे, तेवढेच अनौपचारिकपणे का असेना, गांगुली ते बोलला आणि जे बोलला ते मनातले खरे खरे बोलला, हेही तेवढेच खरे. त्या बोलण्यातून त्याच्या मनातला सल व्यक्त झाला आहे.

गांगुलीने निवृत्तीचा निर्णय सांगितला, तो त्याच्यातील क्रिकेट संपले, चांगला खेळ करण्याची त्याची क्षमता आटली म्हणून नव्हे, तर सततच्या अवहेलनेला वैतागून, ती असह्य होऊन त्याने हा निर्णय केला आहे. त्याने तो करावा अशी अगतिकता त्याच्या वाट्याला उभी केली गेली आहे. खेळाडू म्हणून गांगुली आणि अशा स्थितीत येणारा अन्यही कुणाबाबत आणि खेळाबाबतही ही वाईटच बाब आहे.

वयोमानपरत्वे खेळावर परिणाम झालेला असला, तरी अन्य अनेक खेळाडूंपेक्षा गेल्या दोनेक वर्षातला गांगुलीचा खेळ उजवा आहे. सर्वप्रिय असलेल्या सचिन तेंडुलकरपेक्षाही त्याची कामगिरी चांगली झाली आहे. अनेकांना हे आवडणार नाही, पण ते खरे आहे. सचिन दुखापतीमुळे संघाबाहेर राहिला.गांगुलीला मात्र वगळण्यात आले. त्यांच्या काही विधानांमुळे, काही कृतीमुळे अनेकदा तो वादात सापडला. खेळाच्या बाबतीत चढउतार झाले. तुलनेने तो चांगलाच खेळला. साहजिक संघातून वगळले जाणे त्याच्या जिव्हारी लागणारच. त्याच्या स्वभावातील स्वाभिमानाचा कंगोरा थोडा अधिकच तीव्र असल्याने, संघातून वगळण्याचे निर्णय अधिकच घायाळ करून गेले असतील, यात मला तरी शंका नाही. क्रिकेट मंडळातील पदाधिकारी, अन्य खेळाडू, तथाकथित खेळ समीक्षक यांनी गांगुलीसह "फॅब फोर'मधील खेळाडूंच्या निवृत्तीबाबत व्यक्त केलेली मते, सन्मानाने निवृत्त होण्याच्या जाहीरपणे केलेल्या सूचना गांगुलीला आपल्या जखमांवर मीठ चोळल्यासारख्या वाटल्या असतील. सन्मानाने निवृत्त होणे ही खरेच गांगुलीसारख्याचा गौरव वाढविणारी बाब आहे.ते सांगणाऱ्यांना तोवर त्यांचा सन्मान करायला विसरू नये. गांगुलीच्या बाबतीत त्याचा बऱ्याच जणांना विसर पडला आहे. अवहेलनेला त्रासून, असन्मानाने अगतिक होऊन त्याला निवृत्तीचा निर्णय करावा लागला. एकप्रकारे त्याने संघात स्थान मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्याच घाईत निर्णय करून टाकला आहे. खेळ संस्कृतीला ही फारशी स्पृहणीय गोष्ट नाही.

एकूणच बाजारूपणाचा सर्व क्षेत्रांमध्ये फैलाव होत चालला आहे, त्याचे यातही एक उदाहरण दिसते. माणसाकडे केवळ गुणवत्ता असून चालत नाही, ती दिसावी लागते; ही पायरी मागे पडून , ती दिसूनही भागत नाही, ती आहे, आहे म्हणून गाजावाजा करणारे आणि कधी कधी तसा कांगावा करणारे गॉडफादरही असणे आवश्‍यक झाले आहे. टी. पी. सिंग कुठे गेला, या गांगुलीच्या प्रश्‍नाचे उत्तर यात दडलेले आहे. समाजामध्ये नव्याने रुजत चाललेल्या "व्यवहारा'चा हा अविभिन्न पैलू बनू लागला आहे.

Wednesday, October 8, 2008

मृत्यूसमयीची अनुभूती

माणूस मरतो म्हणजे नेमके काय होते?मरणाऱ्याचा मरतानाचा नेमका अनुभव काय असतो? सनातन काळापासून माणसाच्या बुद्धीला हा प्रश्‍न छळत आला आहे. ऋषी मुनींनी, योग्यांनी, ज्ञानवंतानी, संतांनी, तत्त्वज्ञांनी या प्रश्‍नाचा सतत शोध घेतला आहे. आजही शोध आणि संशोधन सुरू आहे. प्रश्‍नाचे नेमके उत्तर मात्र मानवाच्या बुद्धीला हुलकावणी देत आहे.

माझ्या मनात हा विषय ताजा होण्याला गेल्या आठवड्यातील एका बातमीचे निमित्त घडले आहे. जगातील निरनिराळ्या 25 इस्पितळांत मृत्यूसमयीच्या, मृत्यूसमीपच्या अनुभवांबाबत संशोधनाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काही अनुभवांचे उल्लेख आहेत. तशा तऱ्हेचे काही उल्लेख मी याआधीही ऐकले आहेत. अनेकांनी ऐकले असतील, वाचले असतील.

शेवटच्या क्षणाला आपले सारे आयुष्य क्षणार्धात मनचक्षूसमोरून सरकून जाणे...अतिशय तेजस्वी, पवित्र आणि अनंत प्रकाशात आपण प्रवेशतो आहोत, अशी अनुभूती होणे....कुणातरी दिव्य विभूतीची आकृती डोळ्यांसमोर तरळणे... आपल्या अतिशय लाडक्‍या, आवडत्या व्यक्तीची प्रतिमा मनात उमटणे... अनंत अवकाशात, निर्वात पोकळीत आपण तरंगत असल्यासारखे वाटणे... वगैरे ...वगैरे...

अशा अनेक कथनाच्या, माहितीच्या आधारेही मृत्यूच्या अनुभूतीचा शोध आणि चिकित्सा होत आली आहे. शरीर निष्प्राण होते म्हणजे काय? शरीरातून आत्मा निघून जातो म्हणजे काय होते?

सामान्य माणसालासुद्धा आयुष्यात किमान एकदा तरी हा प्रश्‍न पडतोच? सगळेच, सामान्य वा असामान्य, काही त्याच्या उत्तराचा पाठपुरावा करीत नाहीत. सगळ्यांनाच काही तो तितक्‍या निकडीचा वाटत नाही. कदाचित, नकळत उठलेल्या एखाद्या ओरखड्यासारखाही कधी हा प्रश्‍न मनाला स्पर्शून गेलेला असतो. तशा ओरखड्याइतकीच त्याचीही दखल घेतली जाते, असेही घडते.

मला हा प्रश्‍न अनेकदा पडला आहे. कुटुंबीयांचे, नातलगांचे, परिचितांचे मृत्यू पाहताना आणि कधी कधी काही देणेघेणे नसलेल्या,अपरिचिताच्या मृत्यूविषयी माहिती, बातमी वाचतानाही. आणि कधी यापैकी ताजे काहीही घडलेले नसतानाही?जिज्ञासा म्हणूनही.

प्रश्‍न आणखीनही आहेत.

प्राण आणि आत्मा एकच आहेत का? प्राण आधी जातो की आत्मा आधी शरीर सोडतो? माणूस बेशुद्धावस्थेत (कोमा) जातो तेव्हा नेमके काय झालेले असते? शरीरात प्राण असतात, आत्मा नसतो,की आत्मा असतो आणि प्राण नसतात? रुग्णाला कृत्रिम श्‍वसनयंत्रणेवर ठेवले जाते, तेव्हा त्या शरीरात प्राण असतात, आत्मा नसतो की आत्मा असतो आणि प्राण नसतो?शरीरात प्राण असतील तर आत्मा राहतो, की आत्मा असेल तर प्राण असतो?

खूप वर्षांआधी वाचले होते, "प्राण आणि आत्मा हे दोन स्वतंत्र घटक आहेत.जसे एखादे यंत्र विजेवर चालते.पण केवळ वीज असली म्हणून ते चालत नाही, वीजपुरवठा सुरू-बंद करणारे बटण कुणी तरी हाताळावे लागते.यंत्र म्हणजे शरीर, वीज म्हणजे प्राण आणि बटण हाताळणारा आत्मा.'

यंत्राच्या बाबतीत तीनही घटक एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाहिले जाऊ शकतात. शरीररूपी यंत्रात हे तिन्ही स्वतंत्र तरी एका ठिकाणी असतात. ते वेगळे होतात, तेव्हा यंत्र (शरीर ) कायमचे निकामी होऊन पडते.

या घटकाचे परस्परसंबंध,परस्परनिगडित प्रक्रिया पद्धती हे एक गूढ आहे.त्या गुढात बहुधा मृत्यूचे, मृत्यूसमयीच्या नेमक्‍या अनुभूतीचे रहस्य दडले असावे.

Monday, October 6, 2008

गांधीजी ः आउटडेटेड ?

आमच्या गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे मासिक "काव्यसंध्या' कार्यक्रम काल, शनिवारी पार पडला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कविमित्रांची ही मैफल जमते. गेली चार वर्षे. प्रत्येक वेळी त्याच उत्साहाने, तेवढ्याच दमदारपणे. सर्व प्रकारच्या कविता तिथे सादर केल्या जातात. हसविणाऱ्या, काळजात रुतणाऱ्या,कुणाला प्रीतीत न्हालेल्या मुग्ध क्षणाचे आठव रोमरोमी हुळहुळवणाऱ्या, कुणाचे विसरू म्हणणारे सल जागविणाऱ्या, अवखळ बाल्याचे आल्हाद फुलविणाऱ्या, तर कधी समाजातल्या दाहक वास्तवाची आच पेलणाऱ्या, कारुण्याचे आर्त प्रकटवणाऱ्या. ही संध्याकाळ काव्याच्या असीम सामर्थ्यानिशी भेटते. कधी खूप आनंद देऊन जाते, कधी अस्वस्थतेचे बीज उरात पेरून जाते. तिच्या सर्व रंग -भावानिशी मैफलीत सहभागी होणाऱ्या, रमाणाऱ्या सर्वांना मात्र ती नेहमी हवीहवीशीच वाटते.

काल सादर झालेली एक कविता अशीच अस्वस्थ करून गेली. दोन दिवसांपूर्वीच गांधीजयंती होती. त्या पार्श्‍वभूमावर गांधीजींचा संदर्भ असलेली एखादी कविता सादर होईल, अशी अटकळ होती. दोन कविता सादर झाल्या. त्यातील पुढील कविता क्षणात मनात रुतली.

गांधीजींच्या आचरणातील, सांगण्यातील चैतन्य लोकांनी कधीच सोयीस्करपणे अडगळीत टाकून दिले आहे. त्यांच्या नावाच्या माहात्म्याचा बाजार मात्र तेवढ्याच सोयीस्करपणे, मानभावीपणे सुरू आहे. हा अनुभव आता खूपच सार्वत्रिक झाला आहे. संवेदनाशील माणूस त्यामुळे खंतावत चालला आहे. ती खंत, ती व्यथा वेगवेगळ्या माध्यमांतून सारखी व्यक्त होत आहे.ही कविता त्या साखळीतील एक दुवा आहे.

व्यवहारी आणि बाजारू बनत चाललेल्या जगात सत्य बोलणे, सत्य आचरणे हा गुन्हा ठरावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.असत्य आणि हिंसा, दमन, ढोंगीपणा, खुशामतखोरी यांची कास धरणाऱ्यांची चलती झालेली दिसते.संवेदनाशील असणे हा चेष्टेचा विषय केला जात आहे.या मूल्यांची घसरण असा थराला पोचली आहे, की खुद्द गांधीजी पुन्हा अवतरले, तरी त्यांना ती थोपवणे शक्‍य होणार नाही, अशा नैराश्‍यायुक्त भावनेचे सावट विचारी मनांवर पडले आहे. किंबहुना गांधीजीही या लोकांपुढे गांधीजी बनू शकणार नाही, असा तिमिर दाटल्याची घायाळ भावना अनेकांच्या मनांत घर करून राहिली आहे.ती भावना या कवितेत व्यक्त झालेली आहे.

सत्य बोलणे पार संपले आहे, सत्याचरण पूर्ण लोपले आहे, कुठे आशेचा किरणच राहिलेला नाही, असा पार कडेलोट झालेला नाही, अशी आशा तरीही माझ्या मनात आहे.या मूल्यांचे श्रेष्ठत्व वादातीत आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाबद्दल कुणाही संवेदनाशील मनाला शंका नाही. त्याचा सातत्याने होणारा आविष्कारच त्याची ग्वाही देत आहे.त्यातच आशेचा अवकाश दडला आहे.खंत या क्षणांची आहे. या मूल्यांना त्याला घेरून राहिलेला अंधार खूप दूरवर पसरलेला आहे. त्याच्या उरात दडलेले दुःखाचे आसूड यातना देणारे आहे.म्हणूनच मनांवरही निराशेचे मळभ दाटलेले आहे.

सौ.कविता बोरकर यांची ही कविता. मुळातून वाचण्यासारखी.

आउटडेटेड

गांधीजी, तुम्ही आउटडेटेड झालायत.

गांधीजी, तुम्ही खरंच आता आउटडेटेड झालायत.

आता तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकात परिक्षेपुरतंच वाचायचं,

बस्स्‌,

फार तर,

ंमनोरंजन म्हणून तीन तास "मुन्नाभाई'बरोबर भेटायचं,

तेव्हा,

"मुन्नाभाई'ला त्याच्या भाबड्या कल्पनांकरता गोंजारायचं,

म्हणायचं,

"वेडा रे वेडा"

हे बापू तेव्हाचे,

त्या काळातले,

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचे !

आताच्या वास्तवात, सत्य बोलणंच गुन्हा होऊन बसलाय

शहाणा असलास तर खोटं बोलायला शिक.

सुरवातीला जड जाईल ते,

तेव्हा, खाटीक आठव,

तो नाही का सरावलाय?

तो नाही का अलिप्त राहायला शिकलाय?

तूही "संवेदनाच' मारायला शिक,

हळूहळू,

बेमालूमपणे,

म्हणजे,

तुला पण जमेल एखाद्या रोबोसारखं जगणं.

यंत्र युगात हेच तंत्र वापर,

हाच मंत्र जप.

अरे, गांधीजींची तीन माकडं कधीच डार्विनच्या सिद्धांतानुसार

मानवाच्या दिशेने वाटचाल करू लागलीयत,

म्हणून तर,

सगळेच डोळ्यांवर, तोंडावर, कानांवर हात ठेवून

तोंड असून मुके,

कान असून बहिरे,

अन्‌ डोळे असून आंधळे झाले आहेत.

ह्यांना जागं कसं करायचं?

एका नवीन सिद्धांताची आता गरज आहे.

असहकार, अहिंसाचार ही शस्त्रे बोथट झालीयत.

त्यांना धार काढायला हवी.

गांधीजी, ते काम तुम्हाला जमणार आहे का?

नाही ना ?

तुमच्या हातातल्या काठीचा आधार घेऊन चालताना,

जास्तच ठेचकाळणारा रस्ता लक्षात येतोय ना?

जाऊ दे,

म्हणून म्हटलं,

गांधीजी, तुम्ही आऊटडेटेड झालायत.

गांधीजी, तुम्ही खरंच आता आउटडेटेड झालायत.

Thursday, October 2, 2008

सत्य आणि अहिंसा...

"महात्मा गांधींनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून आपण वाटचाल करूया..'

सकाळी माझ्या मोबाईलवर या आशयाचा संदेश आला. माझ्याप्रमाणे आपल्याही मोबाईलवर असा संदेश आला असेल.

आज गांधीजयंती. त्यानिमित्ताने कुणाला तरी गांधीजी आठवणे आणि आपल्याला तो आठवला हे इतरांना कळविण्याचा प्रयत्न करणे हे काही नवीन नाही. हा प्रयत्न प्रामाणिकही असेल. पण गांधीजी जे जगले, ते तत्त्वज्ञान आणि सिद्धांत लोकांना गांधीजयंतीदिनीच का आठवतात? त्यांची सुभाषिते इतरांना सांगण्यासाठी गांधीजयंतीच का उजाडावी लागते? हे प्रश्‍न माझ्या मनाला कुरतडतातच.

आपण सत्य आणि अहिंसेच्या मार्गानेच जाऊया.. जाऊयाच!

कधीपासून?

आधीपासून तुम्ही (प्रेषक) हा मार्ग स्वीकारलेला आहे, की यापुढे स्वीकारायचा आहे?आधीपासून तुमची वाटचाल या मार्गावरून होत असेल, तर मला या सत्यमार्गानुसरणाचा तुमचा अनुभव जाणून घ्यायची इच्छा आहे. नसेल, तर तुम्हाला हा साक्षात्कार एकदम कसा काय झाला? काय त्यामागची भूमिका आहे? पार्श्‍वभूमी काय आहे? ते समजून घ्यायला मला आवडेल.

सत्याचरण, अहिंसाचरण हे गांधीजींचे प्रत्यक्षातले जगणे होते.त्याला जागायचे असेल, तर वरील सुभाषित आपल्या रोजच्या जीवनाचे अविभिन्न अंग बनले पाहिजे.असा संदेश गांधीजयंती नसताना माझ्यापर्यंत, किंवा अशाच अन्य लोकांपर्यंत पोचायला हवा. त्याविषयीच्या अनुभवासह.अन्यथा,हे सुभाषित म्हणजे नुसत्या शाब्दिक जंजाळात स्वतःला गुंतवून घेण्यासारखे होईल. त्याला काय अर्थ आहे?

आजवर मी नेहमी सत्यच अनुसरत आलो. अहिंसेचे तत्त्व मानले.सत्य बोललो, सत्याने वागलो.काही ढोंगी आणि दांभिक लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊन माझी कोंडी केली. खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. अजून करीत आहेत.तरी, सत्य आणि अहिंसेवरची माझी निष्ठा ढळलेली नाही.पण, सत्याचरण म्हणजे कमकुवतपणा,अहिंसेचे अनुसरण म्हणजे दुबळेपणा समजला जातो की काय, अशी मला कधी कधी शंका येते. सत्याचरण हा अपराध आहे काय, असा प्रश्‍न परिस्थिती मनापुढे उभा करते. त्याच्या उत्तराचा मी शोध घेतो आहे.

गांधीजींनी दाखविलेल्या मार्गाविषयी अविश्‍वास असायचेही कारण नाही. पण, शोधाचा निष्कर्ष हाती लागेपर्यंत सोसाव्या लागणाऱ्या यातना, मनस्ताप, अवहेलना,उपेक्षा घायाळ करतात, व्यथित करतात.आपण अहिंसेचे पूजक असलो,तरी ही एक प्रकारची हिंसा चाललेली आहे, त्याचे आपण बळी ठरतो आहोत, ही भावना सारखी टोचत राहते.का सारे सहन करावे,अपराध नसताना?

असे अनेक प्रश्‍न मनाच येतातच. ते रक्तबंबाळ करतात. सारेच असहनीय होते, कारण मी काही महात्मा नाही...

Thursday, September 11, 2008

खात्री

विज्ञान- तंत्रज्ञानातील प्रगतीने जीवन गतिमान, सुविधामय झाले आहे. नवनव्या उपकरणांनी जीवनाचा ताबा घेतला आहे. इतका, की रोजच्या व्यवहाराचा ती अविभाज्य भाग बनली आहेत. आपल्या दिनचर्येत ती बेमालूमपणे सामावून गेली आहेत आणि आपणही त्यांच्यात समरसून गेलो आहोत.नवी जीवनशैली तशी सुखावणारी आहे.पण या साऱ्या व्यवहारात तंत्रज्ञानालाही खात्रीशीरपणे खात्रीची खात्री देता आली आहे का,असा बारीकसा प्रश्‍न माझ्या मनाला काल पडला.(तसा तो वेगवेगळ्या संदर्भात अनेकदा पडत असतो, म्हणा.)

एका मित्राला काही माहिती पाठवायची होती. सकाळी घरी बसून माहितीचे टिपण तयार करीत बसलो.ते पूर्ण व्हायच्या आत ऑफिसला जायची वेळ झाली. एखादे काम एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊन पूर्ण करायचे असले, किंवा कधी दूरच्या ठिकाणच्या बैठकीसाठी प्रेझेंटेशन करायचे असले, की मी नेहमी ती सर्व माहिती पेनड्राईव्हमध्ये उतरून घेतो. अधिकची खबरदारी म्हणून माझ्याच ई-मेलवरही सोडून ठेवतो.त्या सवयीने कालही वागलो. कॉम्प्युटरचा ड्राईव्ह बिघडलेला असल्याने रीरायटेबल सीडीवर माहिती उतरून घेतली. माझ्या एका ई-मेलवरून माझ्याच दुसऱ्या दोन ई-मेलवरही ती टाकून दिली. म्हणजे चार ठिकाणी माहिती ठेवून मी बाहेर पडलो.संध्याकाळी ऑफिसचे काम आटोपल्यावर सीडी उघडायला गेलो,तर तिच्यात ईरर यायला लागला. ई-मेलवर गेलो,तर नेमका त्यावेळी सर्व्हर बंद पडला होता. चारपैकी एकही स्त्रोत माझ्या कामी आला नाही. माझी एवढी सारी तयारी आणि सावधगिरी कुचकामी ठरली. म्हणून पुढेमागे कधी या यंत्रणेवर मी विश्‍वास ठेवणार नाही, अशातला भाग नाही. पण,हे सारे नवे तंत्रज्ञान दिमतीला असूनही आपण अडू शकतो, याचा हा एक अनुभव.

मनात आले,शंभर टक्के खात्रीचे असे काही नसतेच!

तंत्रज्ञानाने शंभर नव्या गोष्टी निर्माण केल्या आहेत.पुढे हजार गोष्टी तयार करेल."खात्री' ही चीज तयार करण्याचे तंत्रज्ञान कधी अस्तित्वात येऊ शकेल का?

Monday, September 8, 2008

सावली ः व्यथेची, दुःखाची

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरुमे देवं सर्व कार्येषू सर्वदा

विघ्नहर्त्या, बुद्धिदेवता श्री गणेशाचा उत्सव भक्तिभावाने साजरा झाला.दीड आणि पाच दिवसांच्या उत्सवाची सांगता झाली आहे. अकरा किंवा अधिक दिवसांचा, विशेषतः सार्वजनिक स्वरूपातील उत्सव नेहमीच्या उत्साहाने सुरू आहे.गणेशभक्तांचा भक्तिभाव आणि उत्साह चलनवाढ, महागाई यांना पुरून उरला आहे.अकस्मात कोसळलेला धुवांधार पाऊसही त्यांना नामोहरम करू शकला नाही. मनामनांत वसलेल्या भक्तीची, श्रद्धेची ही शक्ती आहे. तिने माणसाला कायमच कार्यप्रवृत्त राखावे, अशी प्रार्थना श्री गणरायाकडे करतो.

मीही श्री गणेशपूजन केले. श्री गणरायाचा उत्सव साजरा करताना दुःखाच्या दोन सावल्या मात्र मनाला स्पर्शत राहिल्या.चतुर्थीच्या आधीचा महिनाभराचा कालावधी बिहारमधील नैसर्गिक आपत्ती आणि हिंसाचाराने रक्तरंजित बनून गेला होता. बिहारमध्ये पुराने थैमान घातले. त्याचा फटका लाखो लोकांना बसला. पुराने अर्धा बिहार उद्‌ध्वस्त झाला. त्याला सावरण्यासाठी अजून बराच काळ जावा लागेल.नैसर्गिक आपत्तीवर माणसाचे नियंत्रण नाही, हे खरे. ज्या कोसी नदीने प्रलय माजविला, तिच्या बंधाऱ्याची देखभाल आणि वेळीच डागडुजी करणे तर आपल्या नियंत्रणात होते!त्याही पलीकडे हजारो माणसे पुरामुळे आपत्तीत सापडली असताना त्यांचे ऐवज लांबविण्याचे, त्यांच्यासाठी आलेल्या मदतीवर डल्ला मारण्याचे, विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित असलेले व नसलेले लोक असा भेद करून अनेकांच्या अडचणीत आणखी भर घालण्याचे हिडीस प्रकार सर्रास घडले.ते टाळणेही माणसांच्या नियंत्रणातील गोष्ट होती.अनेकांनी ताळतंत्र सोडल्याने कोसी नदीने जेवढे अश्रू असहाय लोकांच्या डोळ्यांतून वाहायला लावले, त्याहून अधिक दुःख हीन प्रवृत्तीच्या माणसांनी त्यांना दिले. त्यांनी माणुसकीचे हृदय घायाळ केले! घरदार उद्‌ध्वस्त झालेल्या, उपासमारीने, भुकेने जर्जर झालेल्या हजारो लोकांचा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता.

त्या व्यथेची सावली अधूनमधून मनाला टोचत राहिली!

त्यांना छळणाऱ्या लोकांचा बंदोबस्त कोण करणार?कसा करणार?

आपत्ती, विघ्ने, संकटे टाळावी आणि सुख, शांती समाधानाचे वरदान लाभावे, अशी प्रार्थना आपण श्री गणरायाकडे करतो. ही विघ्ने. संकटे बाहेरून येणारी जाणारी असतात.त्याची वासलात श्रीगणेश लावील ही आमची श्रद्धा असते.माणसाच्या क्रूर मनोवृत्तीतून प्रकटणाऱ्या संकटाचा नाश आणि मुकाबला कसा करायचा? बाह्योपचारांनी त्यांच्या वृत्तीत फरक पडेल याची कसलीच खात्री नसते.

त्या माणसांच्या मनातला श्री गणेश जागावा एवढीच प्रार्थना मी केली!

********

माझ्या कुटुंबातील कुणी वडील माणूस नसताना केलेली यंदाची माझी पहिली गणेश चतुर्थी. नसताना याचा अर्थ ती यापुढेही कधीच असणार नाहीत!गेल्या वर्षी माझ्या वडलांचे वयाच्या 94 वर्षी निधन झाले.सोळा वर्षापूर्वी आई गेली, आठ वर्षापूर्वी थोरल्या भावाचे निधन झाले. आता माझ्या कुटुंबात मीच सर्वांत वडील माणूस. माझे वडील गेले,तेव्हा लांबच्या काकीने म्हटले होते, "तुलाच वडील करून गेला ना रे बाबा.' तेव्हा गलबलून आले, त्याचा एक कढ परवाही जाणवला.

बाबांचे वय झाले होते.हिंडते फिरते होते. या वयातही आंघोळीसाठी पाणी तापवण्यापासून आपले कपडे स्वतः धुण्यापर्यंत स्वतःची कामे स्वतःच करायचे.दिवसभर काहींना काही कामात गुंतलेले असायचे. वय झाले असले,तरी आई-वडील आपल्याला हवीशीच असतात.आपण कर्तेसवरते झालो, कमावते झालो, कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पेलू लागलो, तरी आपण आपल्या आईवडलाचे लहानगे मूलच असतो. आईवडील आपल्यासोबत असण्यात आपल्या जगण्याला एक भरलेपण असते.त्यांच्या मायेच्या उबेत साऱ्या दुनियेशी टक्कर देण्याइतपत अदम्य ऊर्जा छातीत भरून राहिलेली असते.सुरक्षिततेचा असेल किंवा नसेल, पण निर्भयतेचा कोष आपल्याभोवती विणल्याची अनुभूती जागती असते.या अनुभूतीचा माझ्याबाबतीत बाबा हा शेवटचा दुवा होता. तो निखळला.

वडाच्या पारंबीला मागे वडाच्या मुळाचा, खोडाचा आधार असतो,वरून पर्णसंभाराचे गडद आच्छादन असते. हे सारे त्या पारंबीला भवतालचे वातावरण आणि डोक्‍यावरचे आभाळ पेलण्याचे सामर्थ्य देत असते.मागचे खोड मुळासकट उन्मळून पडले आणि वरचा आच्छादक पर्णसंभार गळून पडला, की संपूर्ण भवतालात, अथांग आकाशाखाली ती पारंबी एकटी, उघडीबोडकी आणि पोरकी बनून उभी उरते.भवतालाचा रेटून दूर ठेवलेला दाब वळून चहूबाजूंनी पारंबीवर कोसळतो.

पारंबीलाही नवी मुळे फुटतात, नवा पर्णसंभारही उगवतो.पण, तोवर एकाकीपण तिला झेलावे लागतेच! गेलेले कायमचेच गमावलेले असते, त्याची भरपाई नव्या निर्मितीने होत नसतेच!

बाबांच्या जाण्याने खुल्या अवकाशात मी असा पारंबीसारखा एकाकी उभा आहे, छातीत कळ सोसून.

दुःखाची ही सावली ऐन सणात मनाला टोचत राहिली!

Thursday, August 21, 2008

सवय वाचण्याची

ओरिएंट लॉंगमन ही प्रकाशन संस्था सर्वांच्या परिचयाची आहे. वेगवेगळ्या विषयावरील शेकडो पुस्तकांच्या माध्यमातून ती असंख्य लोकांपर्यंत पोचलेली आहे. प्रकाशन व्यवसायात साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या संस्थेने पणजीत पुस्तक प्रदर्शन लावले आहे. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप देवबागकर यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन करण्यात आले. छोटासा, साधासाच कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या साधेपणामुळे विद्वान व्यक्ती आपल्याला जे सांगायचे असते त्यात हात आखडता न घेता सांगून टाकतात,याचा प्रत्यय यावेळीही आला.देवबागकर व्यासंगी व्यक्ती. हातचे राखून न ठेवता ज्ञानदानात संतोष पावणारे. चांगले वक्ते. टाळ्या घेणारे नव्हेत, विचार देणारे,त्यांना दाद घेणारे. अस्स्खलित इंग्रजीत उत्तम बोलले. याचा उल्लेख मुद्दाम करतो. त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही, इंग्रजीत पारंगत झाल्याशिवाय प्रगती साधणे अशक्‍य आहे, असे सिद्धांत उराशी कवटाळणाऱ्यांनी आणि इंग्रजी उत्तम अवगत होण्यासाठी पहिलीपासून ती भाषा शिकविण्याचा अट्टहास धरणाऱ्यांनी देवबागकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांसारख्या मातब्बरांचे इंग्रजी वक्तृत्व ऐकायला हवे. त्या भाषेवरचे त्यांचे प्रावीण्य अनुभवायला हवे. म्हणजे इंग्रजीमध्ये प्रावीण्य मिळविण्याचा मार्ग कुठून जातो हे त्यांच्या लक्षात येईल.

देवबागकर यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व आणि त्याची आवश्‍यकता अधोरेखित केली.आताचे शिकणे आणि विद्यार्जन करणे यातला फरक त्यांनी समजावून सांगितला.

नवी पिढी, आताची मुले वाचत नाही ही नेहमीचीच तक्रार झाली आहे. त्यासाठी टीव्ही,इंटरनेट, मोबाईल यांसारख्या माध्यमांना जबाबदार धरले जाते. एकूणच नव्या तंत्रज्ञानावर त्याचे खापर फोडले जाते. आपल्यामध्ये ही एक सहज वृत्ती निर्माण झाली आहे. दुसऱ्यावर खापर फोडले की आपली जबाबदारी संपली,आपण दोषमुक्त झालो, असा आपला थाट आणि समज झालेला आहे. समस्या सुटत नाही, त्याचे हे एक कारण आहे. सबबीची एक खुंटी आपण सतत शोधत असतो. समस्येचे निराकरण या शोधातून करू पाहतो.तो समस्येवरचा उतारा नव्हे, हे आपण मानत नाही आणि समस्या तशीच राहते.

नवे तंत्रज्ञान, नवी जीवनपद्धती या आता वस्तीलाच आल्या आहेत.त्याचा विस्तार, उंची,खोली वाढतच जाणार आहे. त्याची चाल, गती थांबवता येणार नाही.उलट तसा प्रयत्न करणारे बाजूला पडतील. आपल्याला जी मूल्ये नव्या पिढीमध्ये दिसत नाहीत,जी रुजलेली हवी आहेत, त्याबाबत केवळ नकारघंटा वाजवीत राहिल्याने,ती रुजणार नाहीत.तंत्रज्ञान आणि आधुनिक जीवनशैलीवर त्याचा पसरणारा पगडा नाकारूनही ती रुजणार नाहीत.ती रुजविण्यासाठी, वाचनाचे मूल्य मुलांमध्ये रुजविण्यासाठी देवबागकर यांनी छान मार्ग आपल्या भाषणात सांगितला...

तंत्रज्ञानाने लपेटलेल्या जीवनशैलीत गुरफटलेल्या समाजात, मुलांच्या विश्‍वात आपण सामावून घेतले पाहिजे. जे तंत्रज्ञान या सर्वांपासून मुलांना दूर नेते आहे, असे वाटते,त्याच तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून त्यांच्यापुढे आपले, या मूल्याचे प्रकटीकरण व्हायला हवे.जिथे ही मुले पाहतात, तिथे वाचण्याचे आकर्षण अवतरू लागले,तर तीही त्याकडे वळू लागतील. देबवागकर यांचे हे म्हणणे खरे आहे, सोपेही आहे.

प्रश्‍न आहे, या लयीत लीन होण्याची आपली तयारी आहे का?

Wednesday, August 20, 2008

ओम मृत्तिकायै नमः

कुठल्याही कार्याचा आरंभ करताना श्री गणेशाला वंदन करण्याची आमची संस्कृती आणि प्रथा आहे. श्री गणेश अर्थात गणपती ही बुद्दिदेवता असल्याचे आपण मानतो. सर्व देवतांनी मिळून त्यांना अग्रपूजेचा मान बहाल केल्याची आख्यायिका प्रचलित आहे.विघ्नहर्ता असल्याने कार्याचे शुभ फल देण्यासाठी श्री गणेशाची प्रार्थना करावी असा परिपाठ रूढ झालेला आहे. त्याला माझा विरोध नाही. मतभेद नाही,तरी मी माझ्या या ब्लॉगचा आरंभ मातीला नमन करून करीत आहे.

माझे नाते आणि तिच्याबद्दलची ओढ मला कळू लागण्याच्या आधीपासून आहे. "माती' या शब्दात "माता' हा शब्दही कोरून काढता येतो.त्यामुळेही असेल. मातीही माणूस जन्माला येण्याच्या आधीपासून आहे.माणूस मेल्यावरही ती राहते. आयुष्यभर ज्या शरीराचे हवे नको ते सर्व लाड, चोचले पुरवितो, ते शरीर जाते कुठे? चिमूटभर राख होऊन मातीतच मिसळते.

कबीर सांगूनच गेलाय,
माटी कहे कुम्हारसे, तू क्‍या रोंदे मोंहे
एक दिन ऐसा आयेगा, मै रों दू तोंहे

आयुष्य आणि जीवन दोन्ही व्यापून, दशांगुळेच काय, त्याहीपलीकडे उरते ती मातीच! ती सर्वव्यापी आहे आणि सर्वजायाही आहे.तिची महती गाणारे माझे शब्दही कदाचित एक दिवस या मातीतच मिसळून जायचे. माती मला नेहमी भौतिक नजरेच्या आणि ज्ञानचक्षुच्या पलीकडे गेलेली, अनंतापर्यत पसरलेली वाटते. तिचा विस्तार, पसारा दिङमूढ करतो.तिच्यासमोर मस्तकच नव्हे सारे अस्तित्व नत होते, झुकते. तिला नमनाचे वंदन नको करायला?
आणि, गणपतीसुद्धा पार्वतीच्या अंगावरील मळातून म्हणजे मातीतूनच नाही का जन्मला !