Thursday, October 2, 2008

सत्य आणि अहिंसा...

"महात्मा गांधींनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून आपण वाटचाल करूया..'

सकाळी माझ्या मोबाईलवर या आशयाचा संदेश आला. माझ्याप्रमाणे आपल्याही मोबाईलवर असा संदेश आला असेल.

आज गांधीजयंती. त्यानिमित्ताने कुणाला तरी गांधीजी आठवणे आणि आपल्याला तो आठवला हे इतरांना कळविण्याचा प्रयत्न करणे हे काही नवीन नाही. हा प्रयत्न प्रामाणिकही असेल. पण गांधीजी जे जगले, ते तत्त्वज्ञान आणि सिद्धांत लोकांना गांधीजयंतीदिनीच का आठवतात? त्यांची सुभाषिते इतरांना सांगण्यासाठी गांधीजयंतीच का उजाडावी लागते? हे प्रश्‍न माझ्या मनाला कुरतडतातच.

आपण सत्य आणि अहिंसेच्या मार्गानेच जाऊया.. जाऊयाच!

कधीपासून?

आधीपासून तुम्ही (प्रेषक) हा मार्ग स्वीकारलेला आहे, की यापुढे स्वीकारायचा आहे?आधीपासून तुमची वाटचाल या मार्गावरून होत असेल, तर मला या सत्यमार्गानुसरणाचा तुमचा अनुभव जाणून घ्यायची इच्छा आहे. नसेल, तर तुम्हाला हा साक्षात्कार एकदम कसा काय झाला? काय त्यामागची भूमिका आहे? पार्श्‍वभूमी काय आहे? ते समजून घ्यायला मला आवडेल.

सत्याचरण, अहिंसाचरण हे गांधीजींचे प्रत्यक्षातले जगणे होते.त्याला जागायचे असेल, तर वरील सुभाषित आपल्या रोजच्या जीवनाचे अविभिन्न अंग बनले पाहिजे.असा संदेश गांधीजयंती नसताना माझ्यापर्यंत, किंवा अशाच अन्य लोकांपर्यंत पोचायला हवा. त्याविषयीच्या अनुभवासह.अन्यथा,हे सुभाषित म्हणजे नुसत्या शाब्दिक जंजाळात स्वतःला गुंतवून घेण्यासारखे होईल. त्याला काय अर्थ आहे?

आजवर मी नेहमी सत्यच अनुसरत आलो. अहिंसेचे तत्त्व मानले.सत्य बोललो, सत्याने वागलो.काही ढोंगी आणि दांभिक लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊन माझी कोंडी केली. खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. अजून करीत आहेत.तरी, सत्य आणि अहिंसेवरची माझी निष्ठा ढळलेली नाही.पण, सत्याचरण म्हणजे कमकुवतपणा,अहिंसेचे अनुसरण म्हणजे दुबळेपणा समजला जातो की काय, अशी मला कधी कधी शंका येते. सत्याचरण हा अपराध आहे काय, असा प्रश्‍न परिस्थिती मनापुढे उभा करते. त्याच्या उत्तराचा मी शोध घेतो आहे.

गांधीजींनी दाखविलेल्या मार्गाविषयी अविश्‍वास असायचेही कारण नाही. पण, शोधाचा निष्कर्ष हाती लागेपर्यंत सोसाव्या लागणाऱ्या यातना, मनस्ताप, अवहेलना,उपेक्षा घायाळ करतात, व्यथित करतात.आपण अहिंसेचे पूजक असलो,तरी ही एक प्रकारची हिंसा चाललेली आहे, त्याचे आपण बळी ठरतो आहोत, ही भावना सारखी टोचत राहते.का सारे सहन करावे,अपराध नसताना?

असे अनेक प्रश्‍न मनाच येतातच. ते रक्तबंबाळ करतात. सारेच असहनीय होते, कारण मी काही महात्मा नाही...

No comments: