Thursday, September 11, 2008

खात्री

विज्ञान- तंत्रज्ञानातील प्रगतीने जीवन गतिमान, सुविधामय झाले आहे. नवनव्या उपकरणांनी जीवनाचा ताबा घेतला आहे. इतका, की रोजच्या व्यवहाराचा ती अविभाज्य भाग बनली आहेत. आपल्या दिनचर्येत ती बेमालूमपणे सामावून गेली आहेत आणि आपणही त्यांच्यात समरसून गेलो आहोत.नवी जीवनशैली तशी सुखावणारी आहे.पण या साऱ्या व्यवहारात तंत्रज्ञानालाही खात्रीशीरपणे खात्रीची खात्री देता आली आहे का,असा बारीकसा प्रश्‍न माझ्या मनाला काल पडला.(तसा तो वेगवेगळ्या संदर्भात अनेकदा पडत असतो, म्हणा.)

एका मित्राला काही माहिती पाठवायची होती. सकाळी घरी बसून माहितीचे टिपण तयार करीत बसलो.ते पूर्ण व्हायच्या आत ऑफिसला जायची वेळ झाली. एखादे काम एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊन पूर्ण करायचे असले, किंवा कधी दूरच्या ठिकाणच्या बैठकीसाठी प्रेझेंटेशन करायचे असले, की मी नेहमी ती सर्व माहिती पेनड्राईव्हमध्ये उतरून घेतो. अधिकची खबरदारी म्हणून माझ्याच ई-मेलवरही सोडून ठेवतो.त्या सवयीने कालही वागलो. कॉम्प्युटरचा ड्राईव्ह बिघडलेला असल्याने रीरायटेबल सीडीवर माहिती उतरून घेतली. माझ्या एका ई-मेलवरून माझ्याच दुसऱ्या दोन ई-मेलवरही ती टाकून दिली. म्हणजे चार ठिकाणी माहिती ठेवून मी बाहेर पडलो.संध्याकाळी ऑफिसचे काम आटोपल्यावर सीडी उघडायला गेलो,तर तिच्यात ईरर यायला लागला. ई-मेलवर गेलो,तर नेमका त्यावेळी सर्व्हर बंद पडला होता. चारपैकी एकही स्त्रोत माझ्या कामी आला नाही. माझी एवढी सारी तयारी आणि सावधगिरी कुचकामी ठरली. म्हणून पुढेमागे कधी या यंत्रणेवर मी विश्‍वास ठेवणार नाही, अशातला भाग नाही. पण,हे सारे नवे तंत्रज्ञान दिमतीला असूनही आपण अडू शकतो, याचा हा एक अनुभव.

मनात आले,शंभर टक्के खात्रीचे असे काही नसतेच!

तंत्रज्ञानाने शंभर नव्या गोष्टी निर्माण केल्या आहेत.पुढे हजार गोष्टी तयार करेल."खात्री' ही चीज तयार करण्याचे तंत्रज्ञान कधी अस्तित्वात येऊ शकेल का?

1 comment:

bharatipawaskar said...

Khatri hi keval swatachich swatala deta yete. Etarani dilelya khatrivar apali purna kahtri astech ase nahi. Apanahi etaranna ekhadya gostichi purna khatri deu shakat nahi, karan anek gosti apalyashivay etar gostinvarhi avlambun asatat, nahi ka?
Ani nemka anekada bharavshachya mhashilach tonga hoto...
Better believe in oneself than others.