Thursday, February 12, 2009

मोदींचे चुकलेच

प्रसंग, निमित्त काही असो, आपल्याकडच्या राजकारण्यांना एकमेकांना ओरबाडण्यात रस वाटतो. त्याचे बाहेरच्या जगात काय संदेश जातात याची त्यांना चिंता नसते. कोण वरचढ आहे, हे दाखविण्यात त्यांना धन्यता वाटते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यावर केलेली तिरकस टिपणी यातून कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची मिळून सुरू जालेली जोरकस जुगलबंदी हे त्याचेच निदर्शक आहे.

मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यासंदर्भात वक्तव्य करताना मोदी यांनी असा हल्ला स्थानिक घटकांच्या पाठिंब्याशिवाय करणे शक्‍य नसल्याचे म्हटले होते. अशी काही सामग्री हाती लागते काय, यावर नजरच ठेवून असलेल्या पाकिस्तानी नेत्यांनी लगेच त्याचा फायदा उठवायला सुरवात केली. मुंबईवरील हल्ल्यात आपला सहभाग दडविण्यासाठी, नाकारण्यासाठी पाकिस्तानचा सुरवातीपासून आटापिटा चाललेला आहे. त्यासाठी हल्ल्याचा कट युरोपमध्ये शिजल्याचे, कधी बांगलादेशातील दहशतवादी घटक त्यामागे असल्याचे नवेनवे शोध पाकिस्तान जाहीर करीत आहे. भारताने दिलेले पुरावे असत्य ठरविण्यासाठी ना ना क्‍लृप्त्या अवलंबित आहे. अशा परिस्थितीत मोदी यांचे वक्तव्य त्याच्या हातात दिले गेलेले कोलीतच ठरले. आपल्या वक्तव्याचा गाजावाजा पाकिस्तानकडून होत असल्याचे दिसल्यावर आणि त्यासाठी देशातही आपण टीकेचे लक्ष्य ठरत असल्याचे पाहिल्यावर मोदी यांनी घूमजाव करण्याचा प्रयत्न केला.अशा वेळी, "आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला', "चुकीचा अर्थ लावला गेला" अशी सारवासारव करण्याचे सर्रास वापरले जाणारे तंत्र मोदींनीही अवलंबिले. आपले म्हणणे संदर्भ सोडून सांगितले जात असल्याचा कांगावा त्यांनी चालविला आहे."पाकिस्तानने एवढी मोठी कारवाई केली असेल, तर त्यामागे स्थानिक नेटवर्कच्या स्वरूपात त्यांना स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळालेला असलाच पाहिजे.भारत सरकारने पाकिस्तानशी चर्चा करण्याबरोबर याबाबतही चौकशी करायला हवी' असे आपण बोललो असल्याचे मोदी आता सांगत आहेत. "स्थानिक सहभागा"संबंधी त्यांच्या वक्तव्यावर "त्यांचा पाकिस्तानशी संपर्क आहे का,' अशी उपरोधिक टिपणी चिदंबरम यांनी केली.ती भाजपच्या अन्य नेत्यांना बरीच झोंबली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अ.र. अंतुले यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखआणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या विधानाचा विषय उकरून काढून कॉंग्रेसची त्यांनी पंचाईत केली आहे. मोदींच्या वक्तव्यात काही चूक नसल्याची भूमिका ते मांडू लागले आहेत. देशातल्या सामान्य माणसाच्या मनातला प्रश्‍नच ते बोलले, असेही समर्थन ते करीत आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यासंदर्भात कारवाई करण्यात अपयशी ठरल्याने चिदंबरम यांचा संताप झाल्याची टीका त्यांनी चालविली आहे. तर, कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपची भूमिका पाकिस्तानला उपकारक होत असल्याचे मत मांडीत त्यांच्या देशाभिमानालाच हात घातला आहे. एका परीने हा साराच थिल्लरपणा आहे. मुख्य विषयावर तोड काढण्यासाठी गंभीर आणि पक्षभेदापलीकडची चर्चा अपेक्षित असताना सारेच त्यापासून भरकटले आहेत. त्यामागे त्यांचा वेगळा एजंडा असेल, पण चाललेला प्रकार मूळ विषयाची हानी करणारा आहे. त्याची पोच कुणालाच उरलेली नाही.

मोदींच्या वक्तव्यात तथ्यांश असेलही. देशातल्या सामान्य माणसाच्या तर्कबुद्धीतही हा मुद्दा डोकावत असेल. पण,त्याची जाहीर वाच्यता आपल्या देशापुढे असलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी, दहशतवादविरोधी लढ्याच्या उद्दिष्टाला पूरक आहेत का? मुळात, समान्याची भावना तशी असली, तरी मोदी हे सामान्य व्यक्ती नाहीत. ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. देशातल्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याही बुद्धीला सामान्यांच्या मनातला प्रश्‍न भिडला असेल, तर तो त्यांनी केंद्र सरकारच्या योग्य व्यासपीठावरच मांडायला हवा होता. दहशतवादविरोधी लढा हा एका पक्षाचा विषय नाही.तो साऱ्या देशाचा प्रश्‍न आहे. त्यापुढे पक्षीय आणि वैयक्तिक प्रतिष्ठेची, अहंकाराची भावना गौण ठरावी. मोदींना खरेच "स्थानिक घटकां"च्या सहभागाची शंका होती किंवा असेल, तरी देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून, एक जबाबदार नेता म्हणून त्यांनी आपल्या स्त्रोतांचा वापर करून त्याविषयी किमान प्राथमिक स्तरावर शहनिशा करून त्याची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना, संबंधित घटकांना द्यायला हवी होती. ते न करता जाहीर वक्तव्यबाजी करणे हे गैरच आहे.

No comments: