Tuesday, October 21, 2008

नरकासुर

दिवाळी आठवड्यावर आली आहे. ती साजरी करण्याची तयारी सुरू आहे. "तयारी'चे प्रकारही आता वाढले आहेत. दिवाळसणाची चाहूल लागली, की लहान थोरांचा उत्साह ओसंडून वाहू लागायचा. पोहे करायची तयारी सर्वांत मोठी असायची. भात उबविण्यापासून घरोघरी जमून पोहे बनविण्यासाठी ते कांडायचाही मोठा उत्सव असायचा. जिथे असे कांडणे होत नसे किंवा शक्‍य नसे तिथे "लाठी'वर पोहे कांडणाऱ्याचा शोध सुरू व्हायचा. त्याच्याकडे "नंबर' लावायचाही उत्साहाचा कार्यक्रम व्हायचा. सगळ्यांना सांगत, गाजावाजा करीतच तो पार पडला जायचा. नंतर भातकांडपाच्या गिरणीवर पोहे कांडपाची मशिने लागली. तरी, उत्सवाचे आणि उत्साहाचे मशिनीकरण झाले नाही. श्रम, पोहे कांडपाच्या निमित्ताने एकत्र जमणे, त्यानिमित्ताने सुखदुःखाच्या चार गोष्टी करणे, प्रपंचासंबंधी हितगुज साधणे हे कमी झाले. पण पोहे कांडायला जाण्याचा उत्सव संपला नाही. नंतर बाजारात तयार पोहे मिळू लागले आणि तयारीचा हा एक उत्सव लुप्तच होऊन गेला. पोह्याच्या जोडीने घराघरांत तयार केल्या जाणाऱ्या तिखट गोड पदार्थांचा प्रपंचही आवरला गेले. ते सारेच पदार्थही बाजारात तयार मिळू लागले.

उत्सवाचा आणि उत्साहाचा दुसरा मोठा घटक होता, तो आकाश कंदील तयार करण्याचा. त्याच्यासाठी रंगीत कागद आणण्यापासून घरात "खळ' करून प्रत्यक्षात तो साकारेपर्यंत अनेक दिवस आबालवृद्धांची मोठी धांदल चाललेली असायची. आता हव्या त्या प्रकारचे, हव्या त्या रंगसंगतीचे, वेगवेगळ्या किमतीचे आकाश कंदील, नक्षत्रे सारेच तयार मिळू लागले आहे. दिवाळसणाचे वातावरण भारून टाकणाऱ्या तयारीचे हे दोन घटक आता दिवाळसणाच्या एकूण कार्यक्रमातून हद्दपार झाले आहेत.ज्यांनी या जुन्या वातावरणातील खुमारी अनुभवली असेल, त्यांच्या मनात निश्‍चितच ते लुप्त झाल्याची रुखरुख घर करून राहिली असणार.

आता असा उत्साहाचा नवा घटक अवतरला आहे. त्याने दिवाळसणाच्या वातावरणाचा बराच मोठा अवकाश व्यापलेला आहे. तो आहे नरकासुराच्या प्रतिमा बनविण्याचा, त्या मिरविण्याचा, त्यांच्या स्पर्धा घेण्याचा. कधी कधी या नरकासुरांनीच दिवाळी व्यापली आहे, असे वाटावे, इतके या कार्यक्रमाचे आणि तद्‌नुषंगिक "उप-कार्यक्रमां'चे प्रस्थ वाढले आहे.

ठिकठिकाणी नरकासुर उभे करण्याचे काम सुरू झाले आहे. व्यक्ती, मंडळे, संस्था त्यात व्यस्त झाल्या आहेत. दरवर्षीचे हे दृष्य नव्याने, दमदारपणे गावोगावी, गल्लोगल्ली दिसू लागले आहे.

नरकासुर वध हा सत्याचा असत्यावरील विजय, दुर्गुणांवरील सद्‌गुणांचा,अपप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय मानला जातो. दिवाळी या विजयाचा सण आहे. दर वर्षी आपणच नरकासुर तयार करतो, त्याचा वध करतो, विजयोत्सव साजरा करतो. हे सारे प्रतीकात्मक आहे, हे खरे आहे. परंतु समाजाची एकंदर दशा पाहिली, त्याच्या वाटचालीची दिशा पाहिली,तर मन शंकाकुल होते. दरवर्षी मारूनही पुनःपुन्हा नरकासुर उभा राहतो आहेच. तो मरत नाही किंवा विजय मिरविण्यासाठी त्याला पुरते मारले जात नसावे! अवशिष्टातून पुन्हा तो आपला आकार धारण करवतो. भरपूर मिरवून घेतो.दिवाळीतल्या विजयाचे प्रतीक मागे पडले आहे, निस्तेज झाले आहे, नरकासुर आपल्यावर भारी पडतो आहे, असे वाटण्याजोगी स्थिती जागोजागी आढळते आहे. तशा घटना घडत आहेत. त्यातून नरकासुर आपल्या मानगुटीवर आरूढ होत आहे. त्यावर आपले नियंत्रण येत नाही तोवर नरकासुर वध अधुराच राहणार आहे. म्हणूनच जागोजागी नरकासुर उभे राहताना पाहून वाटते, आपण प्रकाशपूजेऐवजी अपप्रवृत्तीच्या नरकासुराचीच पूजा बांधण्यात तर गुंतलेलो नाही ना ?

1 comment:

bharatipawaskar said...

Suryakant Chavan <9423878821) yanchi hi kavita mi kuthetari vachli hoti. Ti mazhya diarit utaravun ghetaleli ahe. Avadali tar kalava.

konate mee guj sangu ya fulanna
bolalo bolayche te paththaranna
thatali tyanni dukane vedananchi
zhakali mazhi vyatha mee hasatana
manasala shodhatana mee budalo
danavanchi laat aali pohatana
fatalelya pavalanni hindlo mee
bhetale mazhe na koni chalatana
shodhala ahe nava mee surya mazha
jaag aali hi ata ya kajavyanna
........