Friday, February 5, 2010

मध्यंतर

तब्बल दहा महिन्यांच्या मध्यंतरानंतर आज पुन्हा उपस्थित होत आहे.मध्यंतर वाजवीपेक्षा जास्तच लांबले आहे.त्याचे वैषम्य आहेच. पण पुरते, थांबून जाण्यापेक्षा लांबणे कधीही चांगले.मध्यंतरात बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत.आपण माणसे. आपले कार्यकलाप लांबतात, थांबतात. काळाचे तसे नाही. तो थांबत नाही, आणि लांबतही नाही.त्यामुळे त्याचे कार्यकलाप निरंतरपणे सुरूच असतात.त्यामुळे माझे मध्यंतर घडले असले,तरी काही ना काही घडत होतेच. ती काळाची देणगी आहे.काळाचा एक तुकडा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. त्याला आम्ही आयुष्य म्हणतो.काळाच्या निरंतर प्रवाहात सतत घडत असणारे काही ना काही ज्याच्या त्याच्या आयुष्याला लगडून जात असते.त्याचे सातत्य असते.ते काही लांबत नाही. थांबते तेव्हा आयुष्यही थांबलेले असते.त्यामुळे बऱ्याच गोष्टी घडलेल्या असणे साहजिक आहे.त्याबद्दल अधूनमधून कधी तरी लिहायचे आहे. नव्याने सुरवात करायची आहे,त्याची ही एक प्रकारची प्रस्तावना.

गेल्या महिन्यात थोड्या वेगळ्या शैलीत लिखाण केले. त्याचे चार ते पाच लेख "गोमन्तक"मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.ते या ब्लॉगवर टाकून नव्या प्रारंभाचा संकल्प सोडीत आहे.त्याचे मध्यंतर कधी येईल की थेट पूर्णविरामच पडेल, हे माहीत नाही.सांगताही येणार नाही. काळाकडून शिकण्यासारखी एक गोष्ट आहे.तो सारखा चालतोच आहे. त्याला भगवद्‌गीतेमधील शिकवण कुणी दिली असेल का ? की त्याच्या सततच्या चालण्यातूनच ती शिकवण प्रसवली गेली असेल ? काळाइतकाच गूढ, गहन असा हा प्रश्‍न आहे. आयुष्यात समांतरपणे चालणारे असे काही प्रश्‍न असतात.असावे लागतातही. ते आपल्या आयुष्याची गती राखण्यास वंगणासारखे काम करतात.प्रेरकाची भूमिकाही निभावतात. आपल्याला गवसलेले, न गवसलेलेही त्या काळालाच अर्पण करून आपण चालत राहायचे!

No comments: