Tuesday, March 16, 2010

पुन्हा कुळागरी सैर

नेत्रावळीच्या कुळागरातील "दिलखुलास' कार्यक्रमानंतर बरोबर दोन आठवड्यांनी, रविवारी (14 मार्च) गुडे -केपे येथे पुन्हा कुळागरात एका साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या संस्थेने मराठी - कोकणी लेखकांचा एक मेळावा नागेश लव फॉरेस्ट गार्डनमध्ये आयोजित केला होता. संस्थेचा हा यंदाचा या संकल्पनेतील तिसरा कार्यक्रम. सावई-वेरे येथील स्पाईस फार्मवर पहिला आणि गेल्या वर्षी सिद्धनाथ पर्वतावर दुसरा कार्यक्रम झाला होता.साहित्यातील निसर्गचित्रण आणि साहित्यातील पर्यावरण अशी विषयसूत्रे अनुक्रमे दोन्ही वेळेला होती.यावेळी विषयाचे सूत्र नव्हते. प्रत्येकाने आपल्या मनाला वाटेल त्या विषयावर मत, विचार मांडावे, असे समन्वयक दामोदर मावजो यांनी सुरवातीलाच सांगितले. त्यांनी स्वतः वैश्‍विकीकरणाची मूळ संकल्पना आपल्या "वसुधैव कुटुंबकम्‌' कडून आता ग्लोबल व्हिलेजपर्यत आल्याचे एक सूत्र चर्चेसाठी खुले केले.भाषा आणि संस्कृतीच्या ऱ्हासाविषयीची चिंता व्यक्त करताना 33 टक्के आरक्षणाबाबत संसदेत घडलेल्या ताज्या नाटकांच्या अनुषंगाने महिला सक्षमीकरणाच्या विषयाचे सूत्रही लेखकांसाठी मोकळे केले.

विषयाचे बंधन नसल्याने ज्याला हवे त्या त्या विषयावर बोलण्याची मोकळीक मिळाली.मावजो यांच्या प्रास्ताविकातील धागे धरत-सोडत संपूर्ण कार्यक्रमात विविध मते व्यक्त झाली. विषयाचे बंधन नसल्याने किंबहुना विषयाचे एक सूत्र धरून बोलण्याचे बंधन नसल्याने बोलण्याचा, व्यक्त होण्याचा मोकळेपणा सर्वांना मिळाला,तो सर्वांनी उपभोगला,अनुभवला.मध्यवर्ती विषय नसल्याने चर्चा रंगली, तरी तिला काही ठोस आकार मिळाला नाही. "येणाऱ्या काळात दोनच गोष्टी राहतील- एक, इंग्रजी भाषा आणि दुसरा आंतरजातीय विवाह ' इथून सुरवात झालेली चर्चा भटक्‍या कुत्र्यांबद्दल भूतदया दाखवण्याचे आवाहन करता करता रेबीज रोग किती घातक आहे, त्यासंदर्भात काय खबरदारी घ्यायला, हवी इथपर्यंत येऊन थांबली.गोमंतकीयांची मातृभाषा कुठली या प्रश्‍नाला स्पर्श केला गेला.त्याबद्दलच्या वादात न शिरता वक्‍त्याने मध्यममार्ग म्हणून "भारतीय भाषा'च्या जतन-संवर्धनाची भूमिका मांडली.इंग्रजी स्वीकारताना आपल्या भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणाची गरज अधोरेखित करण्यात आली. गोमंतकीयांचे साहित्य किती दर्जेदार, हाही प्रश्‍न उपस्थित केला गेला.वेळेअभावी त्यावर ऊहापोह झाला नाही.साहित्याचा समाजावर परिणाम होतो का, या प्रश्‍नावर होय- नाही अशी मते व्यक्त झाली.मराठी -कोकणी लेखक एकत्र येतात, कार्यक्रम संपला की आपापल्या वाटेने निघून जातात. असे न होता त्यांनी हातात हात घालून एकत्र वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.त्यावर पुढे कुणी काही बोलले नाही. आपल्याला हवे ते आणि तितके वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत नाही,शब्दांच्या-जागेच्या मर्यादा आड येतात, याविषयीची खंतही व्यक्त झाली.पुस्तकाची मुद्रणप्रत तयार करूनही प्रकाशित करण्याचा योग जुळून येत नाही, प्रकाशनासाठी अर्थसाह्याच्या अनेक योजना कार्यरत असूनही पुस्तक प्रकाशित व्हायला दोन दोन वर्षे लागतात,अशीही खंत व्यक्त झाली. संस्कृती, भाषा यांच्या ऱ्हासाविषयी चिंता व्यक्त करताना पर्यावरणाचा होणारा नाश, बोडके होणारे डोंगर, आटत जाणारे पाण्याचे झरे, प्रशासन-राजकारणातील भ्रष्टाचार याविषयी तप्त-संतप्त उद्‌गारही निघाले.अनेकांनी आपल्या कविता सादर करून दाद मिळविली.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी झालेल्या प्रत्येकाने अभिव्यक्तीला वाट मोकळी करून दिली. खुलेपणाने आणि दिलखुलास झालेल्या या कार्यक्रमाला लाभलेली निसर्गाची पार्श्‍वभूमी पुन्हा एकदा कधी तरी या ठिकाणाला भेट देण्याचा मोह मनात जागवून गेली.

राजन लोटलीकरांचे हे कुळागर तसे नव्याने विकसित होत असलेले दिसले. माडा पोफळीची एरव्ही कुळागरी गच्च गर्दी नव्हती, पण हिरवागर्दपणा भरपूर होता. भोजनासाठी दालन, कार्यक्रमासाठी दालन (बांबूपासून दरवाजे, खिडक्‍या बनविलेल्या या दालनाला भिंती नव्हत्या !), स्वच्छतागृहांचे तीनेक ठिकाणचे वेगळे ब्लॉक्‍स, शॉवर लावून केलेले रेन डान्सचे फ्लोअर, शॉवरबाथ, नैसर्गिक झरीला छान, कल्पकतेने दिलेले स्वीमिंग पूलचे स्वरूप,त्यात दिसलेले, आता अनेक गावातही दुर्मिळ झालेले करणकाटके हे छोटे मासे, तिथे फिश बाईटची केलेली योजना आणि सारी सैर संपल्यावर वनौषधी, झाडपाला घालून तापवलेल्या गरम पाण्यात पावले शेकून घेण्याची खास ट्रीट हा सारा सरंजाम कॅन्व्हासवरच्या चित्रासारखा मनावर रेखांकित होऊन राहिला. रॉक क्‍लाइंबिंगचा खेळ इथे उपलब्ध आहे. परंतु मुक्त संवादी कार्यक्रम आणि माडापोफळीच्या हिरव्यागंधित निसर्गकुशीतील वातावरणामुळे मन आकाशस्पर्शाला कधीच झेपावले होते.रॉक क्‍लायबिंगचा विचारही त्यात जमिनीवरच राहिला!

No comments: