Monday, December 13, 2010

कृष्णार्पणमस्तु

गेले काही दिवस, दिवस म्हणण्यापेक्षा महिनेच म्हणावे लागेल, मी माझ्या ब्लॉगवर आलेलो नाही.मध्ये काही वेळा आठवण झाली,काही लिहायचे मनात होते, परंतु कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आणि काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे ते राहून गेले. वितीली चुकले की वावाला चुकते असे म्हणतात, तशी काहीशी ही अवस्था झाली. मग तासभर बसून एकदाचा माझाच ब्लॉग मी गाठला.मध्ये किती खंड पडला,त्याचा हिशेब करू लागलो.तेवढ्यात तिथे एक नोंद होती, तिकडे लक्ष गेले. मी अठरा आठवडे दोन दिवस ब्लॉगवर आलेलो नाही,अशी ती नोंद होती. (त्यालाही आता आठवडा उलटला आहे.)मध्ये गेलेल्या अवधीचा तयार हिशेबच मिळाला.तो करायचा त्रास वाचला, तेव्हा दोन गोष्टी मनात आल्या, त्या लिहून ब्लॉगवर नियमित येण्याचे मी ठरवतो आहे.

पहिली गोष्ट मनात आली, ती एक किस्सा किंवा विनोद आहे....

एकदा मोठी चोरी करून काही चोर लांबच्या जंगलात जाऊन विसावले.त्यातील दोघे तरुण चोर वाटणी करण्यासाठी चोरीच्या मालाची मोजदाद करून लागले. त्यावेळी तिसरा म्हणाला," आता शांत झोपा.एवढे कष्ट आणि धावपळ करून आपण दमलो आहोत.या मालाची किंमत उद्या वर्तमानपत्रात येईलच छापून, ती मोजण्यासाठी कशाला कष्ट करता?'

आणि दुसरी गोष्ट, तशी जुनी, पण कधीमधी आम्हा काही मित्रमंडळीत चर्चेला आलेली...

कुणी चार मित्र, परिचित एकत्र आले, की प्रसंग कसलाही असो,त्यांच्या चर्चेत राजकारण, सेक्‍स आणि अध्यात्म हे विषय हटकून येतातच. एकदा चर्चा चालली होती, कुणी माणूस किती भ्रष्टाचारी आहे, किती लांड्यालबाड्या त्याने केल्या आणि आता तो कसा अडचणीत आलेला आहे, वगैरे...

एक जण म्हणाला, "सगळं इथंच करायचं आणि इथंच भरायचं...'

दुसरा एक जण माणसे कशी बेईमान असतात, याविषयी बोलत होता.त्याने कुणाला कशी मदत केली, ती तो कसा विसरला, भल्याची दुनिया नाही, वगैरे....

तिसरा म्हणाला, "चांगले केलं की कुठं ना कुठे त्याबदली चांगलंच भेटतं...'त्याने कुणाला कशी मदत केली होती आणि त्यांच्या गरजेच्या वेळी त्याला अनपेक्षितपणे कशी मदत मिळाली, वगैरे..

असे अनुभव सगळे जणच सांगू लागले.मला आठवते,त्यावेळी मी म्हणालो होतो, की "भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, "कृष्णार्पणमस्तु.' जे करायचे ते कृष्णाच्या नावाने म्हणजे भगवंताच्या नावाने सोडून द्यायचे आणि आपण विसरून जायचे.आपल्या पापपुण्याचा हिशेब लिहीत बसायचे आपल्याला काही कारण नाही.त्यासाठी वर चित्रगुप्ताची व्यवस्था आहे.तो सगळ्या नोंदी ठेवीत असेल, तर त्यासाठी आपण काही डोके शिणवायचे नाही.मी तरी शिणवीत नाही.सगळं संपल्यावर त्याला म्हणायचं फारतर, काय बाबा माझा हिशेब झाला ते सांग.त्यासाठी आता कशाला मेंदूच्या मागे अधिकचं काम लावायचे?'

No comments: