ठाणे येथे 84 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठल्याही वादाशिवाय पार पडेल असे वातावरण अगदी संमेलनाच्या प्रारंभापर्यंत होते.पुण्यात दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याचा वाद उफाळून आला.त्याची झळ संमेलनाच्या मंडपापर्यंत पोचली. प्रत्यक्ष संमेलन सुरू झाल्यानंतर संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेच्या आलेल्या उल्लेखावरून स्मरणिकेतील ते पान फाडून त्याला आग लावण्यात आली.हे वाद किती प्रस्तुत वा अप्रस्तुत होते, हा वेगळा मुद्दा. मात्र,वादाच्या संमेलनाशी जडलेल्या नात्याची फारकत होणार नाही हे ठाण्याच्या संमेलनातही ठळकपणे जाणवले.
संमेलनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखात यंदाच्या वर्षात ज्यांच्या जन्मशताब्दी येतात, त्यांच्याविषयी माहिती देणारा लेख समाविष्ट करण्यात आला होता. त्यात नथुराम गोडसेविषयी तीन ओळींची माहिती होती. त्यांचा हा उल्लेखच वादाला कारणीभूत ठरला. संमेलन आयोजकांनी त्यावर माफी मागितली. वाद फार चिघळला नाही.संमेलनाला वादाचे गालबोट लागण्यास तेवढा प्रसंगही पुरेसा ठरला.
हे सर्व घडून गेल्यानंतर संमेलनाच्या शेवटच्या दिवशी त्या अनुषंगाने चर्चा चालली होती. एक जण म्हणाला, "खरेच इतके आकांडतांडव करण्याची गरज होती का? स्मरणिकेत तो उल्लेख चुकीचा होता तर ती चूक आयोजकांच्या निदर्शनास आणून सुधारून घेता आली नसती का?'
या प्रश्नामागील भावना चांगली होती. परंतु, त्या प्रश्नाचे तेवढे सरळ उत्तर देणे मात्र कठीण होते. मी त्याला म्हटले,"तसे करताही आले असते. परंतु तेवढे सामंजस्य असते,तर मुळातच वाद आणि नंतरचा अप्रिय प्रसंग घडला नसता. हे तसेच का घडले याची ज्याची त्याची काही कारणेही असतील. पण, गुपचूपपणे चूक दुरुस्त केली असती तर ती माणसेही कुणाच्या लक्षात आली नसती. काही वेळा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी निमित्त लागते. कारण प्रत्येकाला आपल्यासाठी काही "स्पेस" हवी असते. या सर्वांमागे तसाही विचार असू शकतो.'
हा वाद तत्त्वासाठी होता की "स्पेस'साठी हा विचार तेव्हापासून डोक्यात आहे. कारण नथुरामविषयी नंतर एक विशेषांकही संमेलनस्थळी वितरित करण्यात आला होता.त्याबद्दल कुणाचीच काही प्रतिक्रिया आली नाही.