Friday, December 31, 2010

वाद कशासाठी ?

ठाणे येथे 84 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठल्याही वादाशिवाय पार पडेल असे वातावरण अगदी संमेलनाच्या प्रारंभापर्यंत होते.पुण्यात दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याचा वाद उफाळून आला.त्याची झळ संमेलनाच्या मंडपापर्यंत पोचली. प्रत्यक्ष संमेलन सुरू झाल्यानंतर संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेच्या आलेल्या उल्लेखावरून स्मरणिकेतील ते पान फाडून त्याला आग लावण्यात आली.हे वाद किती प्रस्तुत वा अप्रस्तुत होते, हा वेगळा मुद्दा. मात्र,वादाच्या संमेलनाशी जडलेल्या नात्याची फारकत होणार नाही हे ठाण्याच्या संमेलनातही ठळकपणे जाणवले.

संमेलनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखात यंदाच्या वर्षात ज्यांच्या जन्मशताब्दी येतात, त्यांच्याविषयी माहिती देणारा लेख समाविष्ट करण्यात आला होता. त्यात नथुराम गोडसेविषयी तीन ओळींची माहिती होती. त्यांचा हा उल्लेखच वादाला कारणीभूत ठरला. संमेलन आयोजकांनी त्यावर माफी मागितली. वाद फार चिघळला नाही.संमेलनाला वादाचे गालबोट लागण्यास तेवढा प्रसंगही पुरेसा ठरला.

हे सर्व घडून गेल्यानंतर संमेलनाच्या शेवटच्या दिवशी त्या अनुषंगाने चर्चा चालली होती. एक जण म्हणाला, "खरेच इतके आकांडतांडव करण्याची गरज होती का? स्मरणिकेत तो उल्लेख चुकीचा होता तर ती चूक आयोजकांच्या निदर्शनास आणून सुधारून घेता आली नसती का?'

या प्रश्‍नामागील भावना चांगली होती. परंतु, त्या प्रश्‍नाचे तेवढे सरळ उत्तर देणे मात्र कठीण होते. मी त्याला म्हटले,"तसे करताही आले असते. परंतु तेवढे सामंजस्य असते,तर मुळातच वाद आणि नंतरचा अप्रिय प्रसंग घडला नसता. हे तसेच का घडले याची ज्याची त्याची काही कारणेही असतील. पण, गुपचूपपणे चूक दुरुस्त केली असती तर ती माणसेही कुणाच्या लक्षात आली नसती. काही वेळा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी निमित्त लागते. कारण प्रत्येकाला आपल्यासाठी काही "स्पेस" हवी असते. या सर्वांमागे तसाही विचार असू शकतो.'

हा वाद तत्त्वासाठी होता की "स्पेस'साठी हा विचार तेव्हापासून डोक्‍यात आहे. कारण नथुरामविषयी नंतर एक विशेषांकही संमेलनस्थळी वितरित करण्यात आला होता.त्याबद्दल कुणाचीच काही प्रतिक्रिया आली नाही.

Monday, December 13, 2010

कृष्णार्पणमस्तु

गेले काही दिवस, दिवस म्हणण्यापेक्षा महिनेच म्हणावे लागेल, मी माझ्या ब्लॉगवर आलेलो नाही.मध्ये काही वेळा आठवण झाली,काही लिहायचे मनात होते, परंतु कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आणि काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे ते राहून गेले. वितीली चुकले की वावाला चुकते असे म्हणतात, तशी काहीशी ही अवस्था झाली. मग तासभर बसून एकदाचा माझाच ब्लॉग मी गाठला.मध्ये किती खंड पडला,त्याचा हिशेब करू लागलो.तेवढ्यात तिथे एक नोंद होती, तिकडे लक्ष गेले. मी अठरा आठवडे दोन दिवस ब्लॉगवर आलेलो नाही,अशी ती नोंद होती. (त्यालाही आता आठवडा उलटला आहे.)मध्ये गेलेल्या अवधीचा तयार हिशेबच मिळाला.तो करायचा त्रास वाचला, तेव्हा दोन गोष्टी मनात आल्या, त्या लिहून ब्लॉगवर नियमित येण्याचे मी ठरवतो आहे.

पहिली गोष्ट मनात आली, ती एक किस्सा किंवा विनोद आहे....

एकदा मोठी चोरी करून काही चोर लांबच्या जंगलात जाऊन विसावले.त्यातील दोघे तरुण चोर वाटणी करण्यासाठी चोरीच्या मालाची मोजदाद करून लागले. त्यावेळी तिसरा म्हणाला," आता शांत झोपा.एवढे कष्ट आणि धावपळ करून आपण दमलो आहोत.या मालाची किंमत उद्या वर्तमानपत्रात येईलच छापून, ती मोजण्यासाठी कशाला कष्ट करता?'

आणि दुसरी गोष्ट, तशी जुनी, पण कधीमधी आम्हा काही मित्रमंडळीत चर्चेला आलेली...

कुणी चार मित्र, परिचित एकत्र आले, की प्रसंग कसलाही असो,त्यांच्या चर्चेत राजकारण, सेक्‍स आणि अध्यात्म हे विषय हटकून येतातच. एकदा चर्चा चालली होती, कुणी माणूस किती भ्रष्टाचारी आहे, किती लांड्यालबाड्या त्याने केल्या आणि आता तो कसा अडचणीत आलेला आहे, वगैरे...

एक जण म्हणाला, "सगळं इथंच करायचं आणि इथंच भरायचं...'

दुसरा एक जण माणसे कशी बेईमान असतात, याविषयी बोलत होता.त्याने कुणाला कशी मदत केली, ती तो कसा विसरला, भल्याची दुनिया नाही, वगैरे....

तिसरा म्हणाला, "चांगले केलं की कुठं ना कुठे त्याबदली चांगलंच भेटतं...'त्याने कुणाला कशी मदत केली होती आणि त्यांच्या गरजेच्या वेळी त्याला अनपेक्षितपणे कशी मदत मिळाली, वगैरे..

असे अनुभव सगळे जणच सांगू लागले.मला आठवते,त्यावेळी मी म्हणालो होतो, की "भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, "कृष्णार्पणमस्तु.' जे करायचे ते कृष्णाच्या नावाने म्हणजे भगवंताच्या नावाने सोडून द्यायचे आणि आपण विसरून जायचे.आपल्या पापपुण्याचा हिशेब लिहीत बसायचे आपल्याला काही कारण नाही.त्यासाठी वर चित्रगुप्ताची व्यवस्था आहे.तो सगळ्या नोंदी ठेवीत असेल, तर त्यासाठी आपण काही डोके शिणवायचे नाही.मी तरी शिणवीत नाही.सगळं संपल्यावर त्याला म्हणायचं फारतर, काय बाबा माझा हिशेब झाला ते सांग.त्यासाठी आता कशाला मेंदूच्या मागे अधिकचं काम लावायचे?'