Saturday, November 29, 2008

थेट प्रक्षेपण किती योग्य ?

मुंबईत दहशतवाद्यांनी तीन दिवस थैमान घातले. शंभरावर निरपराध देशी - विदेशी नागरिकांच्या हत्या केल्या. हे दहशतवादी कृत्य नव्हे, युद्धच होते. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या आणि मरिन कमांडोजनी कारवाई करून दहशतवाद्यांचा हैदोस संपविला. तरी तीन दिवस साऱ्या देशाला अतिशय तणावाचे आणि अस्वस्थतेचे गेले.

दहशतवाद्यांचा आजवरचा हा मोठा हल्ला मानावा लागेल. नव्या तंत्रज्ञानामुळे, विशेषतः दूरचित्रवाणीच्या माध्यमातून मुंबईतील थरारनाट्य सविस्तर पाहता आले. सर्वच वाहिन्यांवर या उत्पाताचे थेट प्रक्षेपण सुरू होते. वाहिन्यांचे पत्रकार, अन्य तज्ज्ञ यांची निवेदने, भाष्ये सुरू होती. जोडीला घडत चाललेल्या हल्ल्याची, प्रतिकारवाईची दृश्‍ये दिसत होती. बहुतेक वाहिन्यांनी संयमाने वार्तांकन केले.त्या त्या क्षणाला काय चालले आहे, याची माहिती समजत होती.तंत्रज्ञानातील प्रगतीचा हा लाभ आहे. तरी, दहशतवाद्यांच्या विरोधात चाललेल्या कारवाईचे थेट चित्रण दाखवणे योग्य आहे का,हा प्रश्‍न वारंवार मनाला बोचत होता.

हल्ला करणारे पूर्वनियोजन करूनच तो करणार. सुरक्षा, गुप्तहेर यंत्रणेतील त्रुटींचा ते फायदाही घेणार. हे सारे गृहीतच धरायला हवे. अशा प्रकारच्या घटनांनंतर लक्षात आलेल्या त्रुटी,उणिवा आदी दूर करून आपल्या यंत्रणा अधिक बळकट, कार्यक्षम बनवायला हव्यात. त्यातल्या संभाव्य फटी हेरून त्या वेळीच बुजवायला हव्यात. अधिक सावधानता बाळगायला हवी. हे सारे खरेच आहे. पण, या सर्व स्तरांवर वावरणारी माणसेच असतात. त्यामुळे कुठलीही व्यवस्था ही शंभर टक्के परिपूर्ण असू शकणार नाही, हेही समजून घ्यायला हवे. कुठेतरी एखादा कच्चा दुवा राहून जाऊ शकतो.त्याचा नेमका फायदा विध्वंसक घटक घेण्याचा प्रयत्न करणार. हे संकट एकाएकी समूळ नष्ट होणार नाही. अशा उपद्रवाचा मुकाबला करण्यासाठी जिथे जिथे शक्‍य असेल, तिथे तिथे कुठलीही फट राहणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येकानेच आपली मानायला हवी. प्रसार माध्यमे त्याला अपवाद नाहीत. साऱ्या जगातील भल्याबुऱ्याचा पंचनामा करणाऱ्या माध्यमांनीही आपल्यावरील जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी आणि ती त्यांच्या कृतीतून दिसायला हवी.

पळणाऱ्याची एक वाट असते, शोधणाऱ्याला हजार वाटा धुंडाळाव्या लागतात. माणसांच्या नृशंसपणे हत्या करणारे तीस चाळीस असेल,तरी त्याची नेमकी माहिती अशा हजार वाटा धुंडाळल्यानंतर कळते. मूठभर लोकांनी देशाला ओलिस धरले ,अशी संतापाची, आपल्याच यंत्रणाविषयी असंतोषाची भाषा बोलायला सोपी असते. घात करण्याचे नियोजन करून आलेल्यांच्या उद्देश, तयारीचा त्यांच्याविरुद्ध कारवाई करताना अंदाज नसतो. त्यांच्या हालचालींचा, त्यांनी चालविलेल्या कृत्यांचा माग काढीतच चढाईची कारवाई करावी लागते. मुंबईत दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई चालली असताना अनेक वाहिन्या त्या कारवाईचे थेट चित्रण दाखवीत होत्या. आपल्या देशातील करोडो सामान्य माणसे, नेते पुढारी ते बघत होते. तसे ते हल्लेखोरांनाही बघणे शक्‍य होते. म्हणजे एक प्रकारे हल्लेखोरांना त्यांच्याविरुद्ध चाललेल्या कारवाईची माहिती मिळण्याची सोय आयतीच उपलब्ध झाली असेल.अशी माहिती मिळाल्यावर ते स्वस्थ बसले असतील का? त्या माहितीचा उपयोग त्यांनी आपल्या जवानांविरुद्ध केला असेल. त्यांच्या कारवाईतून निसटण्याचे मार्ग शोधण्यासाठी केला असू शकेल. किंवा बिथरून जाऊन ओलिस धरलेल्यांबाबत ते अधिक नृशंसही बनले असतील. अशा अनेक शक्‍यतांना वाव आहे. वाहिन्यांचे हे प्रक्षेपण हल्लेखोरांना साह्यभूत आणि आपल्या जवानांना अडचणीचे ठरले असण्याची शक्‍यता आहे.

कारगिल युद्धाच्या वेळी सैन्यदलाने स्पष्ट निर्देश देऊनही वार्तांकनासाठी गेलेल्या एका वाहिनीच्या वार्ताहराने भारतीय सैनिकाच्या एका मोर्चाकडील दृश्‍ये दाखवली होती. ती दाखवल्यापासून अर्ध्या तासात तिथे पाकिस्तानी तोफांचा मारा सुरू झाला होता आणि तो मोर्चा भारतीय सैन्याला तिथून हलवावा लागला होता. वाहिनीवरची ती दृश्‍ये पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ते "लोकेशन' शोधून काढले होते आणि त्यानुसार "टारगेट' निर्धारित केले होते,अशी माहिती एका लेखात त्यावेळी वाचल्याचे मला आठवते.

मुंबईच्या हल्ल्याच्या वेळी किंवा भविष्यातील अशा प्रसंगी वाहिन्यांवरून होणाऱ्या थेट प्रक्षेपणाचा उपयोग आपल्या शत्रूंना अधिक होऊ शकतो. आपल्या संरक्षकांना त्याची अडचण अधिक होऊ शकते. किंबहुना त्यांची स्वतःची सुरक्षितता धोक्‍यात येऊ शकते. देश-प्रजेच्या संरक्षणासाठी प्रसंगी प्राणाहुती देण्यासही आपले सैनिक तयार असतात,याचा अर्थ आपण वा माध्यमांनी त्यांच्यासाठी धोक्‍याचे सापळे निर्माण करण्यास प्रत्यक्षाप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरावे,असा नाही.ते समर्थनीय नव्हे. लोकांना काय चालले त्याची माहिती देण्यात वावगे काही नाही. ती देताना काही तारतम्य आणि संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे.नव्हे ते अपरिहार्य आहे. हे प्रसंग म्हणजे क्रिकेटचे सामने अथवा कसले कसले "आयडॉल्स'चे कार्यक्रम नव्हेत. यासाठी, कधीही असा प्रसंग उद्‌भवल्यास थेट प्रक्षेपणावर शासनाने काही निर्बंध घालावेतच.

Friday, November 28, 2008

बाबूजींचे निधन

रवींद्र भट यांचे निधन झाल्याचे थोडे उशिराने कळले. या वृत्तावर विश्‍वास ठेवणे काही क्षण फार जड गेले. वर्षभरापूर्वी भेटले होते. आजार, वाढते वय याचे शरीरावर परिणाम दिसत होते, मनाचा तजेला तसाच कायम होता. चालताना, हवेहून हलके असल्यासारखे तरंगत जात असल्यासारखे वाटायचे. त्या दिवशी त्यांना कुठे तरी जायचे होते. गप्पांना वेळ नव्हता. "त्या तिथे मी राहायला आलो,' असे सांगत निघून गेले. तेव्हाही ते तरंगत चालल्यासारखेच वाटले. ते गेल्याचे कळले,तेव्हा ती तरंगत चाललेली पाठमोरी मूर्ती डोळ्यांसमोरून तरळत गेली !

1994 मध्ये पणजीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले. त्यावेळी रवींद्र भट पहिल्यांदा भेटले. वयाने, अनुभवाने, कर्तृत्वाने खूपच मोठे, तरी आमच्याशी क्षणात अंतरंग मैत्री जुळवली.मनींची रहस्ये आमच्याकडे मोकळेपणाने उघडी केली, जसे युगानयगीचे मैत्र असावे. त्या क्षणी ते आमचेही "बाबूजी' झाले. ते नाते शेवटपर्यत त्यांनी जपले. ते असे अवचित निघून गेले; खरेच वाटत नाही !

वात्सल्यमूर्ती राम शेवाळकर पणजीच्या संमेलनाचे अध्यक्ष झाले. गोव्यात आले, की हायफाय व्यवस्था सोडून आम्हा "पोरांत' रमणारे, मायाळू नारायण सुर्वे त्यानंतरच्या परभणी संमेलनाचे अध्यक्ष झाले. बाबूजीनाही अध्यक्ष झालेले पाहायची इच्छा होती. ती फलद्रूप झाली नाही. आता तर तो विषयच संपला.

बाबूजींनाही अध्यक्ष व्हावेसे खूप वाटत होते.अहमदनगरच्या संमेलनात आपण अध्यक्ष होऊ, असे ते म्हणाले होते. तो योग जुळून आला नाही. अध्यक्ष होण्याचा मार्ग तसा सरळ नसतो. वाटेत काटे पेरणारे अनेकजण असतात. अनेकदा ते अगदी जवळचेच निघतात. बाबूजींना असाच काही अनुभव आला. त्यातला काही भाग त्यांनी सांगितला होता. काही बाबतीत त्यांनी मौन पाळले. त्यांना आलेला अनुभव त्यांना नाउमेद करून गेला, मन घायाळ करून केला; इतका,की नंतर त्यांना त्या विषयात स्वारस्य राहिले नाही. पुढे जेव्हा कधी भेटले, तेव्हा एक दोनदा हा विषय त्यांच्याकडे काढला होता. त्यांनी काही बोलणेच टाळले.

बाबूजींनी संमेलनाचे अध्यक्ष होणे काही पुणेकरांना नको होते. पुण्यातील माझ्या एका मित्राला मी विचारले होते, " साहित्याच्या दृष्टीने अध्यक्ष होण्याची पुरेशी साधना त्यांच्यापाशी असताना त्यांना विरोध का? त्यांच्याविषयी मला अनेक ठिकाणी लोकांमध्ये खूप आदराची भावना दिसते आहे. त्यांना मानणारे लोक मी पाहिले आहेत.'

त्याने इतकेच सांगितले, " पुण्याबाहेर त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. मानही आहे. पुण्यात त्यांना विरोध आहे.'

त्या विरोधाचे कारण काही त्याने सांगितले नाही. त्या न सांगण्यात काही दडले असावे.

अर्थात संमेलनाचे अध्यक्ष होता न आल्याने बाबूजींना किंवा त्यांच्या साहित्य साधनेला काही उणेपणा आलेला नाही. अशा प्रकारच्या सन्मानाच्या निवडी या नेहमीच केवळ गुणवत्तेला कौल देणाऱ्या असतात, असे नाही.अशा प्रक्रियांत काही फटी असतात. त्यांच्या वापराच्या शक्‍यतांचा कधी कधी एखाद्याच्या आवडी-नावडीनुसार अवलंब होतो.त्यातूनही एखादा बाबूजी असा सन्मानाला वंचित राहून जातो.

संतांचे चरित्र, वाङ्‌मय हाच व्यासंगाचा विषय करून वाङ्‌मयनिर्मिती करणारे बाबूजी हे मराठीतले एकमेव साहित्यिक असावेत, असे मला वाटते. संतांनी आपणाला जीवनादर्श दिले.समाजाचे आध्यात्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनही समृद्ध केले. त्यांच्या काळात नव्हे,तर आजही. वर्तमानकाळातही त्यांच्या जीवन-साहित्याची संबद्धता ठायी ठायी जाणवते.नव्याने परिशीलन करून तो अमूल्य ठेवा बाबूंजीनी समाजापुढे प्रस्तुत केला.पांडुरंगाला घास घेण्यासाठी नाम्याने केलेल्या आर्जवाच्या आंतरिक तळमळीने बाबूजींनी हे नवसर्जन केले. इंद्रायणी काठीचे ते आर्त आता कायमचे अंतरले !

Monday, November 24, 2008

केळेकरांना ज्ञानपीठ

रवींद्र केळेकर यांना प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.त्यांनी मराठी, हिंदी आणि कोकणीत लेखन केले असले,तरी ज्ञानपीठाचा मान त्यांना त्यांच्या कोकणी साहित्यासाठी मिळालेला आहे. संस्कृत साहित्यिक सत्यव्रत शास्त्री हेही या पुरस्काराचे संयुक्त मानकरी ठरले आहेत. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार केळेकर यांच्या रूपाने गोव्याला प्रथमच लाभत आहे. सर्व गोमंतकीयांना आनंद देणारी ही घटना ठरायला हवी. गोव्याचा गौरव झाल्याची भावना सर्वत्रच उचंबळून यायला हवी. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. त्याचे कारण गोव्यातील भाषावाद आणि त्यात केळेकर यांची पक्षपाती भूमिका. भाषावादाने आणि केळेकर यांच्यासारख्या गांधीवादी विचारवंत म्हणवणाऱ्याने मराठीबाबत घेतलेली दुराग्रही,नकाराची भूमिका, यांमुळे गोमंतकीय मानस दुभंगले आहे.गोमंतकीयांची दोन गटात विभागणी झाली आहे.त्यामुळेच केळेकर यांच्या सन्मानाबद्दल सार्वत्रिक आत्मीयतेची भावना दृग्गोचर होत नाही.

अगदी अलीकडे केळेकर यांना भारत सरकारचा पद्‌मभूषण सन्मान जाहीर झाला.तेव्हा माझा एक मित्र मला म्हणाला,"जे लोक कोकणीला भाषा म्हणून मान्यता मिळवू शकतात, ते काहीही करू शकतात!

'नकाराची आणि विरोधाची भूमिका घेऊन कोकणीवाद्यांनी समाजात जो दुरावा आणि कडवटपणा निर्माण केला आहे, त्याची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होय.जोवर या भूमिकेत बदल होत नाही,तोवर हा दुरावा आणि कडवटपणाही दूर होणार नाही, याचेही सूचन त्या प्रतिक्रियेत आहे.केळेकर यांच्या सन्मानाने कोकणीवाद्यांच्या गोटात आनंदाचे उधाण आले आहे. पण हा गोव्याचाच सन्मान आहे, या भावनेने सारे मतभेद विसरून आनंदाचे सार्वत्रिक भरते आल्याचे दिसत नाही, हे याच दुभंग स्थितीचे निदर्शक आहे.

केळेकर यांनी भरपूर साहित्य निर्मिती केली. आचार्य काकासाहेब कालेलकर यांचे सान्निध्य आणि वर्ध्याच्या आश्रमातील संस्कार यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडले, असे सांगितले जाते. महात्मा गांधींचे विचार त्यांना प्राणभूत, असेही मानले जाते. गांधीविचारांचे दर्शन, आजच्या युगातही असलेली त्यांची यथार्थता सांगणारे लिखाण त्यांनी केले. गांधीविचारावर भाष्य करणारी अधिकारी व्यक्ती असा लौकिक त्यांनी प्राप्त केला. कोकणीला भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी या भाषेतील साहित्य समृद्ध करण्याचे ध्येय त्यांनी उराशी जपले. आपल्या कोकणीतील स्वतंत्र लेखनाने, महाभारताच्या कोकणीत केलेल्या अनुसर्जनाने, सर्जकाच्या प्रेरणा -ऊर्मीविषयीच्या चिंतनशील लेखनाने त्यांनी कोकणीचे साहित्य समृद्ध करण्यात आपला मोठा सहभाग दिला.कोकणीच्या संदर्भात त्याचे भाषाविषयक कार्य दुर्लक्षिण्याजोगे निश्‍चित नाही.या सर्वांचाच विचार करून त्यांना ज्ञानपीठ दिले गेले असेल. पुरस्कारासाठी निवड करणाऱ्यांनी तेवढ्यापुरताच विचार केलेला असावा. परंतु गोव्यातील भाषावादाचे संदर्भ वगळून त्यांच्या साहित्याची चिकित्सा करणे गोमंतकीयांना शक्‍य नाही. विशेषतः ते गांधीविचारांचा पुरस्कार करणारे आणि त्याविषयी प्रचंड आत्मगौरव बाळगणारे असल्याने त्यांच्या मानाचे मूल्यांकन निखळ साहित्याच्या अनुषंगाने करता येणार नाही. कारण त्यांच्या लेखनातही त्यांनी गांधीविचारांशी प्रतारणा केलेली आहे.

गांधींनी सत्य, अहिंसा, सहिष्णुतेचा विचार सांगितला आणि आचरलाही. मानवजातीवर प्रेम करायला सांगितले, तिरस्कार नव्हे. केळेकर यांनी मराठीचा द्वेष केला. गोव्यात मराठी हवी म्हणणांना चाबकाने फोडले पाहिजे ,अशा शब्दांत मराठीविषयी, इथल्या मराठी भाषकांविषयी गरळ ओकली. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी ही प्रतारणा नव्हे काय? ज्या भाषेने इथली संस्कृती जपली आणि जिच्या स्तन्यावरच केळेकर आणि त्यांच्यासारखे कोकणीतले अनेक म्होरके आणि पुढारी मोठे झाले, नामवंत बनले, त्यांनी मराठीविषयी गोमंतकीयांच्या मनात तिरस्कार पेरण्याचे, रुजविण्याचे काम केले. गांधीविचारांची झूल पांघरून तिरस्काराने अनेकांचे हृदये कलुषित केली. इतकी, की पुढची अनेक वर्षेही गोमंतकातील एका समुदायाच्या मनांतून तिरस्काराची बिजे निघता निघणार नाहीत. मांसाला चिकटलेल्या निखाऱ्यासारखी ही पेरणी झालेली आहे.

ज्ञानपीठ मिळाल्याने आता तरी तिला भाषा मानावी, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातल्या काही विद्वानांनीही असेच मत प्रकट केले आहे. वर्षभरापूर्वी गोवा कला अकादमीच्या बैठकीत चर्चेच्या ओघात कोकणीचा विषय निघाला होता. रोमन कोकणीचे पुरस्कर्ते, त्रियात्रिस्ट आणि माजी सभापती तोमाझिन कार्दोज तिथे उपस्थित होते. कोकणीला साहित्य अकादमीची मान्यता फसवणुकीने मिळविण्यात आल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते.कोकणीचे एक महान नेते उदय भेंब्रे यांनी त्यांना उत्तर देण्याचा निःशक्त प्रयत्न केला.तेव्हा, कोकणीची साहित्य परंपरा सांगताना रोमन कोकणी लेखक आणि त्यांच्या लेखनाचे संदर्भ दिल्याचे ठासून सांगत तोमाझिन यांनी त्यांना निरुत्तर केले होते.1985 ते 1987 या काळात झालेल्या भाषिक आंदोलनात, ज्या ख्रिश्‍चन समाजाच्या पाठबळावर कोकणीवादी जिंकले, त्यांचीही अशीच दिशाभूल करण्यात आली होती. तीही फसवणूक त्या समुदायाला आता कळून चुकली आहे. कोकणी चळवळ अशी मोठ्या असत्यावर आणि फसवणुकीवर आधारलेली आहे.कोकणी चळवळीतले अध्वर्यू असलेल्या केळेकर या असत्याच्या पापात वाटेकरी आहेत. हे सारे असत्य गांधींनी सांगितलेल्या सत्याच्या विचारात बसत नाही. केळेकर यांना ते चालले, तेव्हा त्याही तत्त्वाचा त्यांनी पाडावच केला.

काही महिन्यांपूर्वी उदय भेंब्रे यांनीच कोकणीचे प्रमाणीकरण होण्यासाठी आणखी पन्नास वर्षे जावी लागतील, असे विधान केले होते. त्यासाठी आणखी तीन पिढ्या बरबाद झाल्या, तरी त्याला इलाज नाही, असे उत्तरही त्यांनी दिले होते. जी भाषा प्रमाणरूपात येण्यासाठी पाच दशकांचा काळ जावा लागणार आहे, ती एका पुरस्काराने एका रात्रीत जागतिक दर्जाची भाषा कशी बनू शकते? गांधीविचारांत याचे काही उत्तर असल्यास, त्याचा शोध घ्यावा लागेल; मात्र केळेकरी विचारधारेत त्याचे उत्तर सापडते.

पंचवीसेक वर्षांपूर्वी केळेकर यांनी"नवप्रभा' दैनिकातील आपल्या स्तंभात असे लिहिले होते,"मराठी गोव्याची भाषा आहे,तर बा. भ. बोरकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार का मिळाला नाही?'

एका भाषातज्ज्ञांने मांडलेला हा तर्क आहे.एखादी भाषा ही भाषा आहे की नाही हे भाषिक निकषवार नव्हे, तर पुरस्कारांच्या निकषावर ठरते. आणि पुरस्कार कसे मिळतात, याची अनेक उत्तरे अनेकांना ठाऊक असतात ! केळेकर यांना लागोपाठ, लगबगीने दिल्या गेलेल्या पुरस्कारांमागे, सन्मानांमागे असे काही रहस्य नसावे, अशी आमची,गांधीविचारांना स्मरून, समजूत आहे.
-------पणजी----

Wednesday, November 19, 2008

निचरा

पणजी ः दोन दिवसापूर्वी अकस्मात पाऊस झाला. त्या आदल्या संध्याकाळी काही टपोरे थेंब आकाशातून सांडले होते. वातावरणात उकाडा खूपच होता. रात्रीची झोपही आळसावून लांब थांबल्याचा अनुभव दोन रात्री आला. तो ताजा होता. अंगावर पडलेल्या त्या काही थेंबांनी पावसाच्या अवेळच्या फेरफटक्‍याची आपल्या परीने खरे तर कल्पना दिली होती. लक्षात किती जणांच्या आले कुणास ठाऊक ? रात्र सरताच तेही विस्मृतीत गेले. पुन्हा लक्षात राहिला तो हैराण करणारा उकाडाच.

आमच्या गोव्याला अशा उकाड्याची नवता नाही. अगदी कडाक्‍यांच्या थंडीच्या दिवसातही नको जीव करणारा उकाडा अनेकदा अनुभवावा लागलेला आहे. आता तर जागतिक तापमानच बदलते आहे. वातावरण बदलते आहे. त्यामुळे असे उकाड्याचे दिवस आणि मोसम आता नेहमीच असतील कदाचित !

पाऊस पडला आणि छान वाटले. खरे तर मराठी गीतांचा एक कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी बाहेर पावसाची सर लागली. आत "आंतर्बाह्य काव्यानंद' (कार्यक्रमाचे शीर्षक) आणि बाहेर जलधारा ! छानच सुयोग जुळून आला. शरीर-मनाला आतून बाहेरून सुखावणारा. त्या तेवढ्याशा पावसाने बाहेरच्या उकाड्याचा निचरा झालाच, घामेजून जाणाऱ्या शरीरालाही शीतळतेचा स्पर्श झाला. साहजिक मनालाही तजेला आला.

पाऊस अवचित कसा काय आला ?

या प्रश्‍नाची वैज्ञानिक उत्तरे अनेक असतील. दूर सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे इथपासून ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे ऋतुचक्र विस्कळित झाले आहे, इथपर्यंत अनेक कारणांचा त्यात समावेश असू शकेल.

जीवन हे गुंतागुंतीचे असते. आता नव्या जागतिक व्यवस्थेत आणि नव्या जीवनशैलीमुळे हे गुंते वाढले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव, अडचणी, व्यत्यय, बरीवाईट स्पर्धा यामुळे माणसाची मानसिक कोंडी होण्याचे प्रसंग, वेळ त्याची वारंवारता वाढलेली आहे. त्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडेनासा होण्याची स्थिती अधिक घनदाटली आहे. अशा वेळी कोंदटलेपण आपले सारे मन आणि आपला अवकाश व्यापून राहते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मन मोकळे करणे अपरिहार्य बनते.त्याची निकड इतकी अटीतटीची असते, की आपल्या हक्काचे माणूस, मित्र नाही भेटला तर कधी कधी अनोळखी माणसापुढेही मनातले भडाभड ओकायला होते.त्याचा वेळ प्रसंगही कुठलाही आणि कसलाही असू शकतो. असे अनुभव आपण स्वतः अनुभवले असतील किंवा कुणाला तरी अशा तऱ्हेने मोकळे होताना बघितले असेल.मनातल्या कोंदटलेपणाचा निचरा झाला की मग माणूस शांत होते.ती शांतता मिळविणे अगत्याचे होते, तेव्हा एरव्हीचे शिष्टाचाराचे,आपल्या रुबाब, प्रतिष्ठेचे काही संकेतही डावलले जाऊ शकतात.

माणसाच्या हस्तक्षेपामुळे असेल किंवा नैसर्गिक स्त्रोतांच्या अनिर्बंध वापरामुळे असेल, आवश्‍यक पथ्ये पाळण्याचे टाळून केलेली निसर्ग संपत्तीची लूटमार यामुळे असेल विश्‍वाचे मन आणि अस्तित्व कोंदटून गेले आहे. त्याचे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यालाही निचरा करणे अपरिहार्य बनले आहे. त्यामुळे कधी अवेळच्या पावसाच्या रूपाने कधी वादळ- सुनामीच्या रूपाने तोही कोंदटलेपणातून मोकळा होऊ पाहतो आहे ! त्याने तो शांत होणार की अधिक अशांत बनून मानवजीवनात कायमची अशांती पेरणार आहे ?

प्रश्‍न मोठा चिंताजनक आहे.