Saturday, January 1, 2011

स्वागत नववर्षाचे !


आज आणखी एका नव्या वर्षाला सुरवात झाली.

आपल्या देशात अनेक वेळा नव्या वर्षाला आरंभ होत असतो. ते सगळे साजरे करण्याचे क्षण असतात.तसा हाही एक साजरा करण्याचा क्षण आहे.गंमत म्हणजे प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरवातीला वर्षभरासाठी संकल्प केले जातात.त्याचे काय होते हे विचारायचे नसतेच.कारण ते वर्ष संपायच्या आतच दुसरे नवे वर्ष सुरू होत असते. आता एक जानेवारीला सुरू झालेले वर्ष 31 डिसेंबरपर्यंत आहे.परंतु 31 डिसेंबर यायच्या आतच चैत्राच्या प्रारंभी गुढी पाडव्याला नवे वर्ष सुरू होणार आहे. त्याला अवघे तीनच महिने राहिलेले आहेत.अशी एका कॅलेंडर वर्षांत अनेकांची नववर्षे सुरू होतच असतात.त्याशिवाय व्यावहारिक नवी वर्षेही असतात.उदाहरणार्थ, येत्या एक एप्रिलला नवे वित्तीय वर्ष सुरू होत असते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असते.त्या त्या वर्षांचे संकल्प सोडण्याची प्रथा नाही. किंवा असली तरी त्याची फार चर्चा होत नाही.परंतु, ही नवी वर्षे खरी तोंडाला फेस आणणारी असतात.कारण या नव्या वर्षांच्या प्रारंभी केवळ संकल्प करून भागत नाही, त्या वर्षभरातील आर्थिक व्यवहारांचे पक्के नियोजनच करावे लागते.अन्यथा वेगवेगळ्या खर्चाची भागवणूक करताना प्रचंड धावपळ,प्रसंगी उसनवारी करणे भाग पडते.ते सारे निभावून नेताना आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांचे बजेट आणि हिशेबठिशेब कोलमडून पडतात.त्याने कंबरडे मोडते आणि स्वास्थ्यही हरवते.तसे पाहिले तर एक जानेवारीला वर्ष सुरू होताच राहिलेल्या नव्वद दिवसात सध्याचे आर्थिक वर्ष संपणार असल्याची चाहूल लागते.ज्यांना कर वगैरे भरावे लागतात आणि आधीपासून काही तजवीज केलेली नसते, त्यांना तर ही चाहूल धडकीच भरवणारी असते.अनेकदा अशी आवश्‍यक तजवीज केलेली नसतेच.मग, राहिलेल्या थोडक्‍या अवधीत आवश्‍यक त्या साऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी,गुंतवणुकीसाठी, सगळे नीट मार्गी लावण्यासाठी जी धावपळ करावी लागते, ती अनेकदा झोप उडवणारी नाही तर प्रचंड ताण देणारी असते.इथून जे बजेट बिघडते, ते काही केल्या पुढच्या काळात सुरळीत होत नाही.देशाचे असतील किंवा आपण जिथे राहते त्या राज्याचे असतील, अर्थसंकल्प आणि अर्थमंत्रीही आपल्या विवंचना सोडवू शकत नाही.उलटपक्षी ते त्यात अनेकदा भरच घालतात.त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचा जल्लोष मनात घोळवताना संकल्प करायचा तर काय करायचा याचा विचार करताना मनात आले,की आपण आपले आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन किमानपक्षी नीट केले पाहिजे.स्वतःसाठी म्हणून काही वेळ,उसंत काढण्यासाठी दिवसाच्या चोवीस तासांचे काही गणित मांडले पाहिजे आणि ते अमलातही आणले पाहिजे. एवढे करू शकलो,तर वर्षारंभाच्या पहिल्या दिवसाचा आनंद देऊ शकणारे अनेक दिवस वर्षभरात
आपल्याला भेटत राहतील !
तसे ते सगळ्यांना भेटावेत अशा सर्वांनाच शुभेच्छा!