Thursday, March 4, 2010

"दिलखुलास' सोहळा

साहित्यनिर्मिती आणि प्रकाशन सोहळे, दोन्ही ऐन भरात आहेत.आठ पंधरा दिवसांनी गोव्यात पणजीत, नाही तर अन्य एखाद्या गावात,शहरात पुस्तक प्रकाशनाचा समारंभ ठरलेला.लेखकाचा, रसिकांचा आणि आयोजकांचाही याबाबतीतला उत्साह उतू जाणारा. इतक्‍या सातत्याने आणि सुविहितपणाने हे सोहळे होत आहेत, की एखाद्या कार्यक्रमानंतर लगेचच दुसऱ्या तशाच कार्यक्रमाची वर्दी नाही मिळाली,की चुकल्या चुकल्यासारखे वाटते. एवढी या कार्यक्रमांची आताशा सर्वांनाच सवय लागली आहे.त्याचे स्वागतही तेवढ्याच अप्रूपानिशी चाललेले असते. कार्यक्रमाच्या औपचारिकतेबरोबर नियमाने हजेरी लावणाऱ्यांमध्ये एक जवळिकीचे,आपुलकीचे नाते जुळून आले आहे.ते प्रत्येकवेळी नव्या ताजेपणाने दृढावत चाललेले आहे. गेल्या रविवारी असाच एक प्रकाशन सोहळा मडगावचे आमचे कविमित्र अशोक बोरकर यांनी चक्क नेत्रावळी येथील तानशीकरांच्या कुळागरात आयोजित केला. त्यांच्या "दिलखुलास' या कवितासंग्रहाचे प्रकाशन होते. कवितासंग्रहाच्या नावाप्रमाणेच कवी अशोक हे दिलखुलास व्यक्तिमत्वाचे. पणजीत होणाऱ्या "काव्यसंध्या' या मासिक कवितावाचनाच्या कार्यक्रमाला मडगावहून सपत्निक येऊन नियमित हजेरी लावणारे.त्यांच्या पत्नी कविता याही स्वतः उत्तम कवयित्री.(त्यांची एक कविता "गांधी तुम्ही आऊटडेटेड झालात' मी या ब्लॉगमध्ये दिली होती) कवितेवर इतक्‍या उत्कटतेने प्रेम करणारी माणसे फार क्वचित पाहायला मिळतात. त्यांच्या काव्यप्रेमाविषयी मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे.नेत्रावळीतील कुळागारात झालेल्या त्यांच्या पुस्तक प्रकाशनसोहळ्याचे एक वैशिष्ट्य मनात नोंदवले गेले, ते हे की बंदिस्त खोलीतून निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या वातावरणात होणारा असा हा पहिलाच समारंभ.छानशा मुक्त छंदातल्या कवितेसारखा हा कार्यक्रम होता. औपचारिकतेला बराचसा फाटा दिल्याने तो रंगलाही चांगला.कार्यक्रमानंतर तानशीकरांच्या मेनुतली फणसाची भाजी कित्येक वर्षांमागे बालपणात घेऊन गेली.तिची चव जिभेवर आणि बालपणी बाहेर धो धो पडणाऱ्या पावसामुळे अंगाभोवती रेंगाळणाऱ्या गारठ्याचा मधूनच कुडकुडवणारा स्पर्श अनुभवत ऊनशी भाजी खाण्यातल्या लज्जतीची आठवण मनात रेंगाळत आहे.

"दिलखुलास'च्या प्रकाशनाआधी बुडबडी तळीच्या पटांगणात त्यांच्या "आई ग' या आईविषयी असलेल्या कवितेच्या आणि तिच्याविषयीच्या काही लेखांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ झाला.तो प्रसंग फारच हृद्य होता. अशोक बोरकर यांच्या आईला बुडबुडी तळी पाहायला यायचे होते. आजारपणामुळे त्यांना कधी ते शक्‍य झाले नाही.आता त्या हयात नसल्याने तो विषय राहिलेला नाही. त्यांची तळी पाहायला येण्याची अधुरी राहिलेली इच्छा त्यांच्यावरच्या पुस्तकाचे प्रकाशन करून त्या स्वरूपात पूर्ण केल्याच्या समाधानाचे काही कण कवीने पदरात बांधून घेतले आहेत.एखाद्या उत्कट मनाच्या कवीला, तरल संवेदनशील मनालाच अशी कल्पना सुचू शकते.त्याचे काही अमिट ठसेही माझ्या मनावर
उमटून आहेत.हा सोहळा अनुभवताना आठवणींची एक कविता माझ्या मनात सारखी कूस बदलत राहिली...

No comments: